परंपरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परंपरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ५ जुलै, २०१६

आषाढ बिलोरी ऐना…


एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
 

केवळ आषाढाच्या भरवशावर संपूर्ण सजीव सृष्टी सारा वैशाखवणवा सहन करते. आषाढ उंबरठ्यावर आहे, हे तिला दिसत असतं. बघता-बघता आषाढउभ्या धारेने कोसळेल आणि आपल्याला न्हाऊ-माखु घालेल याची तिला खात्री असते. खरंतर आषाढाच्या आधी ज्येष्ठच असतो, वैशाखाला बिलगून. पण तो वैशाखाच्या एवढा कह्यात असतो की, त्याचं स्वतंत्र अस्तित्वच जाणवत नाही. वास्तविक रोहिणीसारखी सुरुवातीची पावसाळी नक्षत्र ज्येष्ठातच लागतात. त्यामुळे गावोगावच्या कृषिकर्मांना सुरुवातही ज्येष्ठातच होते. पण जोवर आषाढधारांनी संपूर्ण सृष्टी धुऊन निघत नाही, तोवर सृष्टी आणि भारतीय जनमानसातही चैतन्य संचारत नाही, वैशाखाने आणलेली मरगळ दूर होत नाही. मात्र एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
... जसे आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाच्या प्रतिभेला फुटले होते. कालिदासाच्या मेघदूतातल्या यक्षाला का माहीत नव्हतं, हत्ती जसा मस्तीत डोंगरांना टकरा देतो, तसा आपल्यासमोर डोंगराच्या शिखराला येऊन भिडलेला हा मेघ निर्जीव आहे...! परंतु प्रियाविरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाला त्या आषाढघनाने भारावून टाकलं. आषढघनांबरोबर आलेल्या आषाढधारांनी त्याला सजर्नत्व बहाल केलं आणि मग... यक्षाने त्या श्यामलसुंदर घननीळालाच बनवला आपल्या निरोप्या. आपला दूत. प्रियेला संदेश घेऊन जाणारा... पाण्याने संपृक्त झालेल्या त्या मेघाला यक्ष म्हणतो-
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद, प्रियायाः
संदेशं मे हर घनपतिक्रोधविश्लेषितस्य... म्हणजे पाण्याने ओतप्रोत भरलेल्या हे मेघा, मी तुला शरण आलेलो आहे. माझ्यासारख्या विरहाग्नीने पोळणा‍ऱ्यांना तुझाच आसरा आहे. मग नेशील का माझा निरोप? आणि मेघाच्या उत्तराची वाटही न पाहता यक्ष त्या मेघाला आपल्या प्रियेचं वास्तव्य असलेल्या अलकानगरीचा मार्ग सांगायला सुरुवातही करतो. हा मार्ग कसा कुठून-कसा जातो आणि मार्गात मेघाला कोणकोण भेटेल, याचं यक्षाने म्हणजेच कालिदासाने जे अप्रतिम वर्णन केलंय, त्याच्या अनुभूतीसाठी मेघदूत प्रत्यक्षच वाचायला हवं. कारण ते वाचताना केवळ मेघच तो सारा प्रवास करत नाही, त्याच्या सोबती-संगतीने वाचकही प्रवास करतो. मेघदूत वाचताना क्षणभर भारतीय मनालाच विसर पडतो की, मेघ निर्जीव आहे. पण यक्ष आणि पर्यायाने कालिदासाला सुचलेली ही कविकल्पनाच इतकी बहारदार आहे की, ही कविकल्पना भारतीय साहित्यातील चिरंतन-सुंदर कल्पना बनून गेलीय. म्हणूनच तर कालिदासाच्या या कल्पनाविलासाचा मोह कुणाकुणाला पडला नाही? सा‍ऱ्यांनाच पडला. कविकुळातील महोदयांना पडलाच. पण काहीशा रुक्ष क्षेत्रांत काम करणार्यांनाही पडला. मराठीतच मेघदूताचे कितीतरी अनुवाद उपलब्ध आहेत. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, वसंत बापट, शांता शेळके यांसारख्या महारथींनी हे अनुवाद केलेले आहेतच, पण अर्थशास्त्रज्ञ असलेल्या सी. डी. देशमुखांनाही मेघदूताचा मोह सुटला नाही. त्यांनीही मेघदूताचा नितांतसुंदर अनुवाद केला आहे. पैकी बा.भ. बोरकर यांना तर संस्कृतही येत नव्हतं. पण मेघदूत त्यांच्या मनाला असं भिडलं की, ते त्यात गुरफटतच गेले. त्यांना मेघदूतातील काव्याचा रात्री चैतन्यमय भास व्हायचा आणि सकाळी ते तो कागदावर उतरवून काढायचे. इतके ते मेघदूताशी तादात्म्य पावले होते. कुसुमाग्रजांनी तर मेघदूताविषयी असे उद्गार काढलेत की-
‘एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करेन. कारण रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदूतात जितके आहे, तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे...’
कालिदासाच्या मेघदूताने भारतीय जनमन असं व्यापून टाकलं आहे. ही किमया त्याच्या प्रतिभेची आहेच. पण त्याची प्रातिभशक्ती जागविणा‍‍‍ऱ्या आषाढाचीही आहे. मेघदूताचा लेखनकाल कुणालाच ठाऊक नाही. जिथे कालिदासाच्या काळाविषयी अजून एकमत झालेलं नाही, तिथे मेघदूत नेमकं कोणत्या काळात (मासात) लिहिलं गेलं, याविषयी सांगणं कठीणच. पण खचितच तो आषाढमास आणि आषाढाचा पहिला दिवस असेल. आषाढाच्या त्या पहिल्याच दिवशी आषाढघनांनी केलेल्या दाटीने कालिदास वेडावून गेला असेल. आषाढ बिलोरी ऐना होऊन कालिदासाच्या तना-मनात उतरला असेल आणि मग सा‍ऱ्या सृष्टीचं प्रतिबिंब त्यात पडून कालिदासाच्या लेखणीतून अलगद शब्द झरले असतील-
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श... म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या यक्षाला तो मेघ दिसला, जो एखाद्या हत्तीप्रमाणे पर्वताच्या शिखराला ढुशा देत होता...
आषाढ म्हटला की भारतीय मनाला कालिदासाचं मेघदूत हे असं हटकून आठवतं. त्या मेघदूताचं गारुड अजून कमी झालेलं नाही, होणारही नाही. कारण चेतनगुणोक्ती अलंकाराचं (अचेतनावर सचेतनाचा आरोप करण्याचं) एवढं सुंदर उदाहरण भारतीय साहित्यात दुसरं नाही. म्हणूनच आषाढ म्हटला की, मेघदूत आठवतं आणि मेघदूताचा उल्लेख निघाला की आषाढसरी बरसायला सुरुवात होते.
अन् तरीही आषाढ लागला की थोडंसं भानावरही यावं लागतं. कारण कालिदासाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी पाऊस भेटला, तसा इथल्या शेतकरी राजाला भेटेलच असं नाही. अन् कधीकधी तर पहिल्याच दिवशी नाही, आषाढ सरत आला तरी भेटत नाही. शेतकरी राजाच नव्हे, तर शहरांतील लोकही आकाशाकडे पाहत बसतात. वरून जाणारे कोरडे ढग दिसले की चुकचुकतात. शेतक‍ऱ्याला शेतीच्या पाण्याची चिंता, तर शहरी माणसाला रोजच्या वापरासाठीच्या पाण्याची.
तरीही आषाढ लागूनही पावसाने ओढ दिली की, धास्तावतो तो भारतीय शेतकरीच... कारण त्याचा गावगाडाच पावसावर आणि त्यातून पिकणा‍ऱ्या शेतीवर अवलंबून असतो. आज शहरातला माणूस नेट-इंटरनेटसारख्या सोयीसुविधांत गुरफटून गेला असेल कदाचित... पण भूक लागली की त्याला अन्नच खावं लागतं. अन्नाविना जगण्याचं तंत्र अजून तरी विकसीत व्हायचंय. निदान तोपर्यत तरी भारतातल्या शेतक‍ऱ्याने आपल्या खळ्यात पिकवलेल्या धनधान्यावरच त्याला अवलंबून राहावं लागणार आहे. आणि भारतातली ऐंशी टक्के जनता अजूनही ग्रामीण भागातच आहे. साहजिकच पावसाची ओढ त्याला दुखावते, चिंताग्रस्त करते. जणू भूमिपुत्राच्या गळ्यालाच फास लागतो. म्हणूनच आषाढाला सुरुवात झाल्यापासूनच तो पाऊसदेवाला आळवायला सुरुवात करतो. जमीन सारवतो, जमिनीवर सुरेखशी रांगोळी रेखतो आणि एका भांड्यात पाणी घेऊन ते सारवलेल्या-सजवलेल्या भूमीवर ठेऊन त्या पाण्याची पूजा करतो. भांड्यातलं हे पाणी त्याच्यासाठी आकाशातलं सर्जनशील पाणीच असतं. ते पावसाच्या रुपाने धरतीवर महामूर बरसावं म्हणूनच त्याची ही पूजा चाललेली असते. कधीतरी वरुणदेव त्याची ही पूजा मान्य करतो आणि एखाद्या साळसूद मुलासारखा धरतीवर बरसतो. पण कधी कधी तो लहरी, हट्टी मुलासारखाही वागतो. अडून बसतो आणि बरसतच नाही. मग मात्र त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आळवणी करण्याशिवाय शेतकरी राजाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.
     पावसाला थोडा जरी विलंब झाला की, शहरी भागांत मंदिरांतून यज्ञयाग करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यासाठी यज्ञातील समिधांवर किलोकिलोने तूप ओतलं जातं. उच्चरवात मंत्रघोष केले जातात. यात पैशाची किती नासाडी होते, ते कुणीच सांगत नाही. म्हणूनच मग शहरांतून होणा‍ऱ्या या वैदिक विधी-विधानांपेक्षा गावाकडे होणारे पाऊसविधी बरे वाटतात. त्यात खर्च काहीच नसतो. फक्त निसर्गाला केलेलं आवाहन असतं. लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे असे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागत तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळेच पाऊस पडतो, हा भ्रम आहे. पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी ऐक्य, साम्य शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एकप्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधीमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते. ही लोकभावना आदिम असते.


     रोहिणी गेल्या, मृग नक्षत्रही कारेडंच आलं नि गेलं की, महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात धोंडी-भुंडी या अज्ञात लोकदेवतांच्या नावाने गा‍ऱ्हाणं गायला सुरुवात होते. गावागावातली मुलं एकत्र येतात आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत गावभर हुंदडतात. याला धोंडी काढणं असंही म्हणतात. मुलांची एक मिरवणूकच निघते. मिरवणुकीतील दोन मुलं निर्वस्त्र असतात. त्यांनी आपल्या अंगाभोवती फक्त कडुलिंबाच्या पाल्याच्या डहाळ्या गुंडाळलेल्या असतात. या दोघांच्या खांद्यावर एक आडवी काठी देऊन त्या काठीला मध्यभागी एक बेडूक उलटा लटकावलेला असतो. या उलट्या लटकावलेल्या बेडकाला गावभर फिरवलं जातं. मिरवणुकीची सुरुवात गावच्या मंदिरातून होते. त्यावेळी केवळ छोटी मुलंच नाही, जाणती माणसंही उपस्थित असतात. मंदिरातून निघाल्यावर
धोंडी धोंडी पाणी दे
धोंडीच्या दिवसात
पाणी भारी येऊ दे
पीक मोठं होऊ दे ... असं म्हणत ही बालसेना गावातील प्रत्येकाच्या घरी जाते आणि ही धोंडी दारात आल्यावर घरातघरातील महिला रिवाजानुसार प्रथम धोंडीच्या काठीवर आणि बेडकावर लोटाभर पाणी ओततात. नंतर हळद-कुंकू वाहून बेडकाची पूजा करतात. यावेळी प्रत्येक घरातून आपापल्या ऐपतीनुसार गहू, ज्वारी किंवा इतर धान्याचा शिधा मुलांना दिला जातो. असं गावातील प्रत्येक घर घेऊन झालं, की ही मिरवणूक पुन्हा देवळात येते. तिथे मिरवणूक काढलेल्या बेडकाला मुक्त केलं जातं. नंतर मिरवणुकीत मिळालेला शिधा एकत्र केला जातो आणि कुणाच्या तरी घरुन जाडसर दळून आणून तिखट-मीठाची फोडणी देऊन तो गावच्या मंदिरातच शिजवला जातो. या शिजवलेल्या प्रसादाला गावकरी कण्या म्हणतात. या कण्यांचाच नैवेद्य गावदेवाला दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून सा‍ऱ्या गावाला वाटला जातो. हा प्रसाद खाताना आता मोठा पाऊस येईल असंच प्रत्येकाला मनोमनी वाटत असतं. कारण उलट्या टांगलेल्या बेडकाचं तरी डराव डराव वरुणदेवापर्यंत पोचलं असेल, असा लोकमानसाचा समज असतो.
     विदर्भात धोंडीच्या नावाने पावसासाठी गा‍ऱ्हाणं घालायची पद्धत आहे, तर कोकणात हेच गा‍ऱ्हाणं भुंडीच्या नावाने घातलं जातं-
भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली डोंगरात
पाऊस पडला आगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली आगरात
पाऊस पडला डोंगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली शेतावर
पाऊस पडला माळावर...भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली माळावर
पाऊस पडला शेतावर...भुंडे भुंडे पाऊस दे
अशा पद्धतीने भुंडीच्या नावाने हाका मारत मुलं संपूर्ण गावाचं रान-शिवार, घर-दार ङ्गिरतात आणि तिच्याकडे पाण्यासाठी गा‍‍ऱ्हाणं घालतात.
धोंडी आणि भुंडीच्या नावाने निघणा‍ऱ्या या मिरवणुका महाराष्ट्रात कदाचित आणखीही वेगवेगळ्या नावाने निघत असतील. कारण धोंडी काय किंवा भुंडी काय यांचं लोकरहाटीत तसं अस्तित्वच नसतं. त्यांच्या नावाचा दगड किंवा मूर्तीही नसते. लोकरहाटीतलाच एखादा रुढ पण वैचित्र्यपूर्ण स्त्रीवाचक शब्द घ्यायचा आणि तिलाच पाऊसदेवता कल्पून तिच्या नावाने पावसाचं गा‍ऱ्हाणं गायचं. असंच पूर्वापार चालत आलंय.
पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रभर केल्या जाणा‍ऱ्या या विधींत खूपच वैविध्यही आहे. कारण प्रत्येक समाजाने आपापल्या समजूतींप्रमाणे निवडलेले हे मार्ग आहेत. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात गाढवाचं लग्न लावलं जातं, विदर्भात बेडकाची मिरवणूक काढली जाते, तर खानदेशात अनेक ठिकाणी पाऊसविधी म्हणून जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली जाते. तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या गावपरिसरात बेडकांची मिरवणूक किंवा गाढवाच्या लग्नाबरोबरच अंधा‍ऱ्या रात्री काही महिला पावसाचं गा‍ऱ्हाणं गात गावभर फिरतात. त्यांचं हे गा‍ऱ्हाणं म्हणजे पावसाची खरोखर केलेली तक्रारच असते. कारण त्या आपल्या गाण्यातून पावसावर राग काढत म्हणतात-
पाऊसराजानं कुणीकडे केलं काळं
वैतागली नार टाकून गेली तान्हं बाळ...
अशी तक्रार करतच लहानथोर सा‍ऱ्या महिला गावातलं घरन् घर घेतात. ही तक्रारीची गाणी म्हणायचीही त्यांची अशी खास पद्धत आहे. या महिलांचं म्होरकेपण करणारी महिला सगळ्यांच्या पुढे असते. तिच्या हातात घुंगरू बांधलेलं मुसळ असतं. हे मुसळ ती प्रत्येक घराच्या दारात वाजवते आणि त्याच्या ताला-सुरावरच पावसाची गा‍ऱ्हाण्याची गाणी गायली जातात. हे गा‍ऱ्हाणं गाताना मुसळच वापरलं जातं कारण मुसळासारखा पाऊस पडावा, अशी त्यांची इच्छा असते.
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशातील ग्रामीण भागात सर्वत्रच असे पाऊसविधी केले जातात आणि त्यात विविधताही आढळते. मात्र या सा‍ऱ्या विधींमध्ये एक समान आदिम तत्त्व दिसतं- ते म्हणजे सारख्यातून सारखं (होमोजिनियस मॅजिक) निघतं, ही आदिम भावना. या भावनेतूनच आपल्या जी गोष्ट हवी आहे किंवा साध्य करायची आहे, त्यासारखाच एक विधी कल्पनेने करायचा. हे विधी म्हणजे सरळसरळ प्रतीकात्मक विधीच असतात.
आषाढ लागला की असं काय काय आठवायला लागतं. आधी मेघदूत काव्य आठवतं. आषाढसरी चांगल्या कोसळल्या तर मेघदूताची रंगत वाढत जाते. कारण तोवर निसर्गाने कात टाकलेली असते. संपूर्ण आषढच सृष्टीत उतरलेला असतो. हिरवं रान, हिरवं मन आणि सुरेख हिरवी हुरहुर... पण आषढसरी कोसळल्या नाहीत, तर मन भयभीत होतं. त्याला अरिष्टाची चाहुल लागते. एकवेळ आषाढ चांगला गेला तरी तो काहीसा निश्चिंत होतो. कारण पेरण्या झालेल्या असतात. पीकपाणी मार्गी लागलेलं असतं. पण जिथे रुजणंच आषाढाच्या भरवशावर असतं, तिथे आषाढसरी कोसळल्या नाही, तर सारं गणितच चुकून जातं. मग नांगरट, पेरण्या, लावण्या... असं परंपरेनं चालत आलेलं शेतीचं सगळंच वेळापत्रक बिघडून जातं.
... याही परिस्थितीत आषाढाची चाहूल लागली की सर्वप्रथम पंढरपूरच्या वाटेवर वारक‍ऱ्यांची पावलं उमटू लागतात. भक्तांचे जत्थेच्या जत्थे विठोबाच्या दर्शनासाठी धावू लागतात. जणू विठोबा त्यांना पहिल्यांदाच भेटणार असतो. पण विठोबा पहिल्यांदा भेटो किंवा वर्षानुवर्षं, त्याची गोडी, त्याची ओढ थोडीच कमी होते... ती कायमच असते.
आषढाचंही तसंच तर आहे. तो दरवर्षीच येतो, बिलोरी ऐन्याचं स्वप्न दाखवत पावसाचं आवतन घेऊन...
(पुनर्प्रकाशित)

बुधवार, १८ मे, २०१६

पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय


तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं खोपटं. कंबरभर उंचीचं. त्यात कोण कुठे झोपलाय त्याचा ठावठिकाणा नसतो. पण चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल्या पुरुषाला आपोआप जाग येते. वर्षानुवर्षाची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपटी काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, क पाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला ८ मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला की, त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो. तर दुसर्या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि निघतो गावमागणीला...

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरच्या चव्हाणवस्तीतील अर्जुन श्यामराव जाधव, सर्जेराव श्यामराव जाधव आणि सोनबा सोपान जाधव या पिंगळ्यांबरोबर पहाटे चार वाजता निघालो, तेव्हा बाहेर मिट्ट काळोख होता. पिंगळ्यांच्या हातात कंदील असले, तरी वाटेतल्या दगड-धोंड्यांनी मला ठेचकाळायला होत होतं. अर्जुन, सर्जेराव, सोनबा मात्र पायाखालचीच वाट असल्यासारखे निश्चिंत, पण तरातरा चालले होते. दिवस उगवण्याआधी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूरमध्ये दान मागून त्यांना पुन्हा वस्तीवर यायचं होतं. त्यामुळे धडपडत चाललेल्या माझी खरंतर त्यांना अडचणच झाली होती. पण वेळापूर परिसरात  भटक्या-विमुक्तांसाठी गेली पंचवीसहून अधिक वर्षं काम करणाऱ्या सूर्यकांत भिसे यांनी, त्यांना सांगून ठेवलं होतं- ‘हा माझा पाव्हणा आहे, नीट सांभाळून आणा.’ म्हणून त्यांचा नाईलाज झाला होता. अन्यथा बाहेरच्या माणसाला भटक्यांच्या वस्तीवर राहायला मिळणं, म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण ओळखीने का होईना, मला ती साध्य झाली होती आणि गैरसोईने का होईना पण, त्या तिघांनी ती मान्य केली होती.
साधारणपणे पाऊणेक तासाच्या तंगडतोडीनंतर वेळापूरची वेस जवळ आली. गावातल्या अर्ध नारीनटेश्वराच्या मंदिराचा कळस मिट्ट काळोखातही त्यांच्या नजरेला पडला. तसे तिघे तीन वाटांनी निघाले. मला कुणाबरोबर जावं, ते कळेना. तरीही मी अर्जुन पिंगळ्याची पाठ पकडली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. गावात शिरताच तिघांनी एव्हाना कुडमुडं वाजवायला सुरुवात केली होती. त्या कुडमुड्याच्या आवाजाने गावाला जणू अवेळीच जाग आली. कुठेकुठे घरात दिवे-लाइटी पेटू लागल्या. ज्यांना जाग आली त्या माय-माऊल्या पिंगळा दारात येण्याआधीच दाराच्या उंबरठ्यात पसाभर डाळ-तांदूळ घेऊन उभ्या राहिल्या. सोबत एक-दोन रुपयाचं एखादं नाणं. आता क्वचित पाच रुपयाचं. हे दान मिळताच अर्जुनराव जागेवरच उडी घ्यायचे आणि दान मिळाल्याची पावती द्यायचे. तोंडानं देवादिकांची नावं घेत आणि तोंडानं शकुन ऐक ग माय म्हणत तासाभरात सगळं गाव घेऊन झालं. शंभर-दीडशे उंबर्याच्या गावात सगळ्यांनीच काही दान दिलं नाही. जेमतेम दहा-पंधरा घरांतून कोरडा शिधा मिळाला. एकाही घरातून शकुन सांगण्याचं निमंत्रण मिळालं नाही, म्हणून अर्जुनराव थोडे हिरमुसले. कारण कुणी शकुन विचारलं, तर थोडी वरकमाई अधिक होते. पण आजच्या विज्ञानाच्या काळात भविष्यावर नि शकुनावर कुणाचा विश्वास उरलेला नाही, याची त्यांनाही आता अनुभवाने माहिती झाली आहे. त्यामुळे तांबडं फुटण्याची चिन्ह दिसताच, त्यांनी गुमान परतीची वाट धरली. इतर दोन दिशांनी गेलेले सर्जेराव आणि सोनबाही गावाच्या वेशीवर येऊन थांबणार होते. ‘पुन्हा वस्तीवर येताय का?’ अर्जुनरावांनी विचारलं. खरंतर मला पुन्हा जायचंच होतं वस्तीवर (त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून घेण्यासाठी, समाजाची आजची स्थिती माहीत करुन घेण्यासाठी), पण लगेच नाही. थोडावेळ गावातच रेंगाळायचं होतं, परंपरेचा मागोवा घेत आणि गावगाड्यात असलेलं पिंगळ्यासारख्या मागत्यांचं स्थान हुडकत. मी लगेच अर्जुनरावांना म्हटलं - तुम्ही व्हा पुढं, दिवस उगवला की मी येतोच चहा प्यायला.’
अर्जुनराव, सर्जेराव आणि सोनबा चव्हाणवस्तीच्या दिशेने जायला लागले आणि माझी पावलं गावातील अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या दिशेने वळली. अजून तसं फटफटायचं होतं. तरीही बाहेरगावी जाणार्यांची वर्दळ सुरू झाली होती. मंदिराजवळ उभ्या असलेल्या माझ्याकडे अनोळखी, संशयी नजर टाकून जो-तो फटफटीवर बसून भुर्रकन निघून जात होता. दुसरीकडे साखरकारखान्यात घालण्यासाठी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टर्सचीही धडधड सुरू होती. या सगळ्या काळ बदलल्याच्या खुणा होत्या. गावगाडा बदलला होता. या बदललेल्या गावगाड्यात आता पहाटेच्या पारी दारी येणाऱ्या पिंगळ्याला काही स्थान नव्हतं. गावगाड्याची थोडीफार धुगधुगी अजून शाबुत आहे, तोपर्यंत पिंगळ्याला कुणीकुणी दान घालत राहील. पण पिंगळ्यांची नवी पिढीही आता दान मागायला तयार नाही. आम्ही का कुणापुढे लाचारीने हात पसरावेत, असा त्यांचा सवाल असतो. त्यामुळे तेही पारंपरिक शकुन-भविष्य सांगण्याचा धंदा सोडून आता वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायाच्या शोधात आहेत. अर्जुन-सोनबा-सर्जेरावांसारखी महाराष्ट्रात आता काही थोडीफारच जुनी खोडं आहेत, जी कधीमधी परंपरेची चाल म्हणून ‘मागतं’ मागायला जातात.



पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तुच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ कुंभाराने मडकी घडवून द्यावीत, सुताराने शेतीची लाकडी अवजारं बनवून द्यावीत, चर्मकारानं चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्याबदल्यात, शेतकर्याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, ज्यांचा शेतकर्याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतीव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे, आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकर्याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला, तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. या मागत्यांच्याच नानाविध भेदांपैकी एक म्हणजे पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ. खरंतर भटक्या-विमुक्तामंध्ये ‘जोशी’ नावाचा एक समाज आहे. वासुदेव-गोंधळी-नंदीबैलवाला आणि पांगुळ ऊर्फ कुडमुडे हे सारे वेगवेगळे व्यवसाय करणारे भटके कलावंतसमाज याच जोशी समाजाच्या अंतर्गत येतात. हे सगळे देवादिकांची गाणी म्हणून भिक्षा किंवा दान मागतात आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. मात्र भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हे भटके समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झाले नाहीत. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती करत राहिले आणि आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय दाते श्रीमंत झाले आणि भटका समाज मात्र कायम गरीबच राहिला. परंतु या मागत्या-भटक्या समाजांचा विशेष म्हणजे त्यांनी कधीच निव्वळ भिक्षा स्वीकारली नाही. भिक्षेच्या-दानाच्या बदल्यात त्यांनी, दान देणाऱ्या दात्याची करमणूक केली किंवा मानसिकदृष्ट्या त्याला स्थिर, शांतचित्त करण्याचं काम केलं. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र तसा अजूनही उपेक्षितच. कारण तो येऊन कधी जातो, हेच कधी कुणाला कळत नाही. अगदी पहाटे उठणारी घरातली ज्येष्ठ मंडळी सोडली, तर त्याचा कुणालाच थांग लागत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा थांग लागला नाही, तरी सर्व भटक्या कलावंतांमध्ये पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी पहिल्या स्थानावर आहे. कारण परंपरेत एकप्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत असतो. त्याच्याइतकी सूक्ष्मनिरीक्षण शक्ती क्वचितच कुणाकडे असेल. त्यामुळेच आज एकूणच मागत्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं, तरी गावगाड्यात कधीतरी-कुठेतरी पहाटेच्या पारी कानावर पिंगळ्याचं गाणं पडतं -            
               
पांगुळ आला वं माय
दान दे वं माय
शकुन जाणून घे वं माय
तुझं भलं व्हईल वं माय...

सोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरुचीही लुडबुड ऐकू येते आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदुळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात येते. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशीणीचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो -

त्रासलेली दिसतेस ग माय
काल रातच्याला भांडण झालं ग माय
मनाला लावून घेऊ नकोस ग माय
सुखाचा संसार करशील ग माय...

त्याने अंदाजाची चंची अशी सोडली की, आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळतो आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.


पिंगळा जात्याच हुशार. एखाद्या घरातली मायबाय शिधा आणायला गेली की, लगेच तो घरादारावर नजर टाकतो. घरादारातले सूक्ष्म बदल नजरेने टिपतो आणि घरातली महिला किंवा पुरुष काहीबाही द्यायला आला की सुरू करतो -

‘पिंगळ्याला दान कराया घेऊ नका हरकत
सोनपावलांनी तुमच्या घराला आलीया बरकत’

किंवा

‘नाव काय पाटीलबुवांचे, पुढील भविष्य सांगेन साचे
एका बायकोची संगत घडली, तेणे तुझी महिमा बुडाली...’

असे अंदाजपंचे काही ठोकताळे मांडले की त्यातलं काही ना काही लागू होतं. मग आपोआपच त्या घरातली महिला किंवा पुरुष पिंगळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि पिंगळा आपला कार्यभाग साधतो. ही एकप्रकारे चलाखीच असते. कारण ‘त’ वरुन ताकभात ओळखण्याची कला पिंगळ्यांना अनुभवाने सिद्ध झालेली असते. पण अडचणीत असणारा माणूस पिंगळ्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचं भविष्य खरो ठरो अथवा खोटं, त्या व्यक्तीच्या मनाला उभारी मिळते, हे मात्र मान्य करावंच लागतं.
ग्रामीण लोकपरंपरेत ‘मागता’ असलेल्या या समाजाच्या अस्तित्त्वाचे पुरावे थेट दहा-बाराव्या शतकापासून सापडतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात, ज्ञानदेव-एकनाथांच्या ओव्या-अभंगांत या समाजाचे उल्लेख आहेत. त्याअर्थी हा समाज प्राचिनच आहे. तसंच तेव्हापासूनच हा समाज भटकाही आहे. महत्त्वाचं म्हणजे हा समाज पिंगळा, पांगुळ, कुडमुड्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या हातातल्या छोट्या डमरूचा ‘कुडमुड’ असा आवाज येतो, म्हणून ते कुडमुडे जोशी. ते भल्या पहाटे ज्या प्रहरी बाहेर पडतात, तो काळ पिंगळा (म्हणजेच घुबड) पक्षाच्या किजबिजण्याचा असतो. ते किजबिजणं म्हणजे बोलणं या समाजाला समजतं आणि त्यावरून ते शुभ-अशुभ शकुन सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी. यांनाच पांगुळ असंही म्हणतात. कारण ते ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात, तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला, तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरूणाचं आगमन झालेलं असतं. हा अरुण पायाने अधू असल्यामुळे त्याला पांगुळ असं लोकभाषेत म्हटलं जातं. साहजिकच त्यावरुन एवढ्या पहाटे बाहेर पडणार्या या समाजालाही ‘पांगुळ’ म्हणजे पांगळा हे नामाभिधान चिकटलं. एकप्रकारे पांगुळ हा अरुणाचा प्रतिनिधीच मानला जातो. लीळाचरित्र आणि नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकारामांच्या काव्यात याच पांगुळाचे दाखले सापडतात. 

मृत्युलोका माझारी गा एक सद्गुरू साचार,
त्याचेनी दर्शने तुटला हा संसार
पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार,
यालागी नाव त्याचे वेदा न कळे पार...

असं पांगुळावर रूपक ज्ञानेश्वरांनी केलं आहे. तर एकनाथांनी ‘मी माझ्या कल्पनेने जाहलोसे पांगूळ, हिंडलो दिशा दाही श्रम जाहला केवळ’ असं भारुड लिहिलं आहे. एकूण लोकपरंपरेत महत्त्वाचा मानला गेलेला लोकप्रतिनिधी पिंगळा किंवा पांगुळ याचं पहाटेपूर्वीच्या अंधःकारमय कालखंडाशी अतूट नातं आहे आणि जणूकाही नव्या दिवसाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी तो गावात येतो.

. . .

अर्जुनराव, सोनबा, सर्जेराव भल्या पहाटे गावात येऊन असंच शुभवर्तमान सांगून आपल्या वस्तीवर परत गेले होते. मागे थांबून त्यांच्या परंपरेचा माग घेईपर्यंत सूर्व्यादेव उगवला होता. मग मी सूर्यकांत भिसे यांना सोबत घेऊन पुन्हा त्यांच्या वस्तीवर जायला निघालो. त्यांच्या वस्तीवर पोचलो, तोपर्यंत सार्यांना जाग आली होती, बाया-बाप्ये आपापल्या कामाला लागले होते. रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर पोचलो, तेव्हा सारं छानछान वाटत होतं. एखाद्या फार्महाऊसवर आल्यासारखंच वाटलं होतं. पण आता दिवसाउजेडी वस्ती पाहताना आमच्या परंपरेने मागत्यांच्या या समाजाला पाडलेली ठिगळं जागोजागी दिसू लागली. परंपरेने यांना कधी एका जागी स्थिर केलंच नाही. पोटा-पाण्याच्या उद्योगासाठी हा समाज महाराष्ट्रभर गाव-दरगाव भटकत राहिला. त्याच्या हक्काचा ना गावात तुकडा होता, ना रानात. नावाला कुठलं तरी एखादं मूळ गाव. पावसाचे चार महिने बुड टेकण्यासाठी. बाकीचे आठ महिने घोडा किंवा गाढवाच्या पाठीवर किडुकमिडुक संसार लादून फिरत राहायचं. गावाच्या वेशीबाहेरची उघड्यावरची पडीक जमीन, किंवा अगदी स्मशान, हीच त्यांची उतरायची हक्काची जागा. ती तरी हक्काची कुठली? अर्जुनराव आणि सूर्यकांत भिसे सांगतात-‘पोलिस पाटलाने उतरायची परवानगी दिली, तरच आजही गावाच्या बाहेर पिंगळ्यांना तळ ठोकता येतो. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद त्यांना आधी पोलीस पाटलाकडे करावी लागते. कारण गावात चोरी-मारी झाली, तर गाववाले सगळ्यात आधी बाहेरुन आलेल्या फिरस्तांवरच संशय घेतात.’
यामुळेच आजवर कधी या समाजाने संसारात फार काही जोडलेलं-सांभाळलेलं नाही. गावात शकुन सांगून जे कमवायचं, ते त्या गावातच खाऊन पुढे निघायचं. म्हणजे कुणाचे आरोपही नकोत आणि कुणाचे शिव्याशापही नकोत. पण त्यामुळेच आजवर हा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्टया मागासलेलाच राहिला. एका जागी स्थिर नसल्यामुळे मुलांना शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेलं त्यांच्यामागचं हे दुष्टचक्र आता भारतीय स्वातंत्र्याला साठ वर्षं होऊन गेल्यावरही संपलेलं नाही. किंबहुना आधीची परिस्थिती बरी होती, असं सोनबा-सर्जेराव सांगतात. कारण तेव्हा देवा-धर्माच्या नावानं समाजात किमान काही मान होता. पिंगळा दारात किंवा गावात आलाय म्हटल्यावर, गावकरी आदराने स्वतःहून काही आणून झोळीत टाकत होते. पण नव्या विज्ञानयुगात, परंपरेने चालत आलेल्या समाजव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. ते साईबाबा-सिद्धिविनायक अशा मंदिरातील दानपेट्यांत लाखो रुपये टाकतील. पण दारावर आलेल्या मागत्याला पाच रुपयेही देणार नाहीत. मग तो स्वतःची काही कला दाखवत असला, तरीही... 

. . .

... एव्हाना अर्जुनरावांनी चहाचा कप पुढ्यात आणून ठेवला होता. मोकळ्या माळरानावरच्या त्यांच्या खोपट्यातल्या चहाला वेगळीच चव होती. दूध दारातच बांधलेल्या म्हशीचं होतं. तर मुंबईवरून आलेला पाव्हणा म्हणून चहात सढळ हाताने साखर घातलेली होती. सकाळचं दान मागून झालेलं असल्यामुळे स्वारी मोकळी होती. दुपारच्या जेवणाला थांबणार का असं विचारुन, वर बोकड कापायचा का? असंही विचारत होती. पै-पाहुण्याच्या आणि सण-वाराच्या निमित्ताने उत्सव करायचा ही या समाजाची वृत्ती. ते साहजिकच होतं. कारण एरव्ही त्यांच्या आयुष्यात आनंदाचे-सुखाचे क्षण कमीच असतात. मग ते आनंद साजरा करण्याची संधीच शोधतात. ती संधी त्यांना कुणा पाव्हण्याचं आगमन, देवीची यात्रा-जत्रा, कुणाचा जन्म, कुणाचं लग्न अशावेळी मिळते आणि अशावेळी मटणाचं जेवण ठरलेलं.
मांसाहार या समाजाला अतिशय प्रिय. त्यामुळे मूल जन्माला आला की त्याच्या पाचवीला या समाजात बोकड कापला जातो. मात्र मुलगा झाला, तर बोकड आणि मुलगी झाली तर बकरी कापण्याची पद्धत आहे. यांच्या लग्न समारंभात भात, वांग्याची भाजी आणि गव्हल्याची लापशी ठेवावीच लागते. पण लग्नातलं एक जेवण बोकडाचं दिल्याशिवाय वधू-वरांच्या घरच्यांची सूटका नसते. या समाजात लग्नानंतर देवीचा गोंधळ किंवा खंडोबाचं जागरण करण्याची पद्धत आहे, तेव्हाही तिखटाचंच जेवण लागतं. मराठ्यांप्रमाणंच खंडोबा-जोतिबा-तुळजापूरची भवानी, ही या समाजाची कुलदैवतं. त्यांची आडनावंही तशीच जाधव, भोसले, मोरे, निकम, शिंदे, सूर्यवंशी. पण या समाजात कुलदेवतांप्रमाणेच जिथे राहतो, पाल ठोकतो, तिथल्या मरीआई-लक्ष्मीआईला मानाचं स्थान असतं. आषाढी एकादशीनंतर या समाजाची या ग्रामदेवतांची जत्रा भरते. त्या जत्रेला सगळा समाज एकवटतो. त्या जत्रेत दावणाचे म्हणजे नवसाचे बोकड कापले जातात.
या गावदेवतांच्या जत्रेला या समाजात मानाचं स्थान आहे. कारण या निमित्ताने सगळा विखुरलेला समाज एकत्र येतो आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांची जातपंचायत भरते. समाजातले न्यायनिवाडे, भांडणतंटे या जातपंचायतीतच मिटवले जातात. लग्न ठरणं आणि मोडण्यासारखे प्रकारही या जत्रेतल्या पंचायतीत होतात. महाराष्ट्रभर विखुरलेल्या पिंगळ्यांच्या अशा भरणाऱ्या जत्रा आणि त्यातल्या जातपंचायतीतून अनेक सामाजिक-आर्थिक उलाढाली होत असतात. गेल्या काही वर्षातील एकूणच सामाजिक प्रबोधनामुळे समाजातील जातपंचायती आता पूर्वीसारख्या ताठर भूमिका घेत नाहीत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या शिक्षाही आता सुनावल्या जात नाहीत. तरीही या समाजाला अद्याप जातपंचायत मात्र हवीशी वाटते. कारण समाजातले काही प्रश्न फक्त समाजाची जातपंचायतच सोडवू शकते, असं या समाजाचं म्हणणं आहे. तसंच एकाच जागी वस्ती नसल्यामुळे न्यायासाठी पोलिसांच्या पाठी कुठे धावायचं, असंही त्यांचं म्हणणं असतं. पिंगळा किंवा त्यांच्यासारख्या मागत्यांच्या या जातपंचायतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या माध्यमातून चालवण्यात येणारी भिशी. जातपंचायतीच्या दिवशी फुटणाऱ्या या भिशीत अक्षरशः लाखोंचे व्यवहार होतात. ही एकप्रकारे या समाजाची पूर्वापार चालत आलेली बचतगट योजना आहे. समाजातील पाटलाच्या हाती या भिशीचे व्यवहार असतात. ज्याला गरज असते, तो उचल घेतो. त्या रकमेवर एक ते दोन टक्के व्याज आकारलं जातं. महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्षं होणाऱ्या या भिशीच्या व्यवहारात आजवर कधीही घोटाळा झालेला नाही किंवा कधी कुणी पैसे बुडवलेले नाहीत. ज्याने उचल घेतलेली असते, तो एकवेळ जिवाचं रान करील, पण ठरल्यावेळी पैशांची परतफेड करणार म्हणजे करणारच. कारण जातपंचायतीत नावाला लागलेला बट्टा, हा या समाजात कलंक मानला जातो. आजही या समाजाला आपल्या जातपंचायतीची भीती वाटते आणि तिच्यात आपली अब्रू जाऊ नये म्हणून हा समाज स्वतःला जपत असतो. आता एकूणच सुधारणेच्या काळातील सामाजिक रेट्यामुळे फिरस्त्या समाजातील जातपंचायती बरखास्त होत आहेत. पण या समाजांचं म्हणणं आहे - ‘आम्हाला आधी एका जागी स्थिर तर करा. तुमच्या समाजव्यवस्थेत आम्हाला सामावून तरी घ्या आणि मग आम्हाला तुमचे कायदेकानून लागू करा.’    

...चहा पीत गप्पा मारता-मारता अर्जुनराव, सोनबा, सूर्यकांत भिसे सामाजिक-सांस्कृतिक माहिती पुरवत होते. या गप्पा चालू असताना मध्येच वस्तीवरचे कोण कोण अर्जुनरावांना काहीबाही विचारायला येत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात होणारी चर्चा मला बिलकूल कळत नव्हती. माझ्याशी बोलताना अर्जुनराव किंवा सोनबा नेहमीच्या, मला समजेल अशा मराठीतच बोलत होते. परंतु समाजातलं कुणी आलं की ते त्यांच्या सांकेतिक बोलीत बोलत होते. पिंगळ्यांची किंवा एकूणच भटक्या-फिरस्त्या समाजाची आपापली सांकेतिक भाषा असते. पिंगळा समाज त्यांच्या या सांकेतिक भाषेला ‘पारोशी’ भाषा म्हणतो. ती फक्त त्यांच्या समाजातल्या लोकांनाच कळते. उदाहरणार्थ माणसं आली पळा, असं म्हणायचं असतं, तेव्हा ते म्हणतात- मानवं आली खपला. किंवा वेळ आली याऐवजी ते ‘बानी आली’ असं म्हणतात. अशावेळी ते आपल्यासमोर आपलीच निंदा करत असतील, तर तेही आपल्याला कळायचं नाही. म्हणूनच तुम्ही माझ्याबद्दल तर काहीबाही बोलत नाही ना, असं विचारल्यावर अर्जुनराव खळखळून हसले आणि म्हणाले- पाव्हण्यांबद्दल आम्ही कधी वाकडा शब्द काढत नाही. समोरच्याला एकदा आपलं म्हटलं की तो आपला. 
ते खरंही होतं. आदल्या दिवशी रात्रीपासून त्यांच्या वस्तीवर ठोकलेल्या मुक्कामातल्या अनुभवातून ते सिद्धच होत होतं. खरंतर परक्या समाजातल्या, किंबहुना अनोळखी शहरी माणसाला फिरस्ते समाज कधीच आपल्या पालावर थारा देत नाहीत आणि त्यांच्याशी फार बोलतही नाहीत. कारण ही पोलिसांची माणसं तर नाहीत, अशीच त्यांना सतत धास्ती असते. आणि आजवर सुशिक्षित समाजानेही त्यांना कधी आपलं मानलं नाही. त्यांच्याकडे कायम संशयानेच पाहिलं. त्यामुळे नागर वस्तीतला कुणी त्यांच्याकडे गेला, की ते सुद्धा त्याच्याकडे संशयानेच पाहतात. पण अर्जुनरावांच्या चव्हाण वस्तीवर मला आलेला अनुभव चांगला होता. आपला माणूस मानून त्यांनी संपूर्ण वस्ती फिरवली. वस्तीतल्या माणसांची गाठभेट घालून दिली.
वेळापूरहून दोन-तीन किलोमीटरवर असलेली ही चव्हाणवस्ती, म्हणजे काही आखीवरेखीव कॉलनी किंवा गावही नाही. किंवा सगळ्यांची अगदी पक्की घरंही नाहीत. पण त्यांना बूड टेकायला हक्काची जागा मात्र आहे. सूर्यकांत भिसे यांनी आपल्या ‘भटके-विमुक्त विकासमंच’ या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळेच गृहमंत्री असताना अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी वेळापूर गावाच्या बाहेर असलेला माळरानाचा एक तुकडा फिरस्त्या जोशी समाजाला दिला. त्यात वासुदेव, नंदीबैलवाले असे सगळेच जोशीसमाज एकत्र आहेत. या सगळ्या पन्नास-शंभर उंबर्याच्या वस्तीत पंधरा-वीस घरं पिंगळ्यांची आहेत. या पिंगळ्यांना याच अकलूज-माळशिरस परिसरातील गावं पंरपरेने मागत्यांची वतनं म्हणून मिळालेली. हक्काचं असं कुठलं गावं नव्हतंच. मग संधी मिळताच इतर जोशीसमाजांबरोबर पिंगळेही वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीत मुक्कामी आले. आता गेली पंधराएक वर्षं त्यांची मुक्काम एकाच जागी आहे. महत्त्वाचं म्हणजे सूर्यकांत भिसे आणि मोहिते-पाटलांमुळे त्यांच्या नावावर आता रेशनकार्ड आहे. त्यातल्या अनेकांची नावं मतदारयादीतही गेलीत. आजवर बूड एका जागी स्थिर नसल्यामुळे त्यांना मत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांना पतही नव्हती. मात्र एकाच जागी स्थिर झाल्यावर त्यांच्याकडे मत आणि पत दोन्ही गोष्टी चालून आल्यात.
सगळ्यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे एका जागी स्थिर झाल्यामुळे सूर्यकांत भिसे यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि नवी पिढी शिकू लागली. यातून चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांच्या कुटुंबातील अनेकजण आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कामाला लागले आहेत. काहीजण सैन्यातही गेलेत. तर जे वस्तीवरच राहिले, त्यांनी घोडे नाचवण्याचं कसब शिकून घेतलं आणि आता ते वरातीत-मिरवणुकीत घोडे नाचवण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी थेट मध्यप्रदेशापासून बेळगाव-बेंगळुरूपर्यंतची काही हजारांची सुपारी घेतात. सूर्यकांत भिसे सांगतात- ‘घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड टाकून हिंडत असल्यामुळे पूर्वापारपासून यांच्याकडे घोडा हाताळायची हातोटी होतीच. पण गेल्या काही वर्षांपासून अकलूजला घोड्यांची जत्रा भरायला लागल्यावर, त्यांच्या या हातोटीचा उपयोग झाला. त्यातून या जत्रेतून त्यांना उधारीवर घोडे विकत मिळू लागले. या घोड्यांना नाचायला शिकवूनच आता या समाजातील तरुण त्याचा व्यवसाय करत आहेत.’
सूर्यकांत भिसे ही माहिती सांगत असतानाच अर्जुनरावांच्या मुलाने त्यांच्या दारातला घोडा आणला आणि त्याला नाचवायला सुरुवात केली. त्या घोड्याची दुडकी चाल पाहताना खरोखर मजा वाटत होती. फक्त त्याची दुडकी चाल पाहतानाच नाही, तर वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या समाजाने एका जागी स्थिर झाल्यावर, स्वतःचा जो उत्कर्ष साधला, तो पाहतानाही आनंद वाटत होता. मग भले त्यांची घरं अजून खूप छान नसतील, अजूनही काहीसं ठिगळं लावलेलं आयुष्यच  त्यांच्या वाट्याला आलेलं असेल, पण त्यांच्या खर्या अर्थाने जगण्याला सुरुवात तर झालेली आहे. त्याचाच आनंद वाटत होता.
अन् तरीही एकीकडे आनंद वाटत असताना, दुसरीकडे दुःखाचेही कढ येतच होते. कारण चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांसारखं भाग्य महाराष्ट्रातील प्रत्येक पिंगळ्यांच्या वाटेला अजून आलेलं नाही. त्यांचं पाल-दर पाल भटकणं अजून सुरूच आहे. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षात या भटक्या कलावंत समाजांच्या विकासासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संघटना उभ्या राहिल्या आहेत. पुण्यात ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटना’ आहे. मराठवाड्यात लातूरला ‘भारतीय भटक्या-विमुक्त जमाती विकास संघटना’ आहे. या संघटनांचे नेते अनुक्रमे दिलीप परदेशी आणि प्रा. सुधीर अनवले भटक्या समाजांसाठी काम करत आहेत. त्यांना एकत्र आणत आहेत. सोलापूरच्या बाळासाहेब रेणके यांच्या ‘लोकधारा’ संघटनेनेही गेल्या काही वर्षांत भटक्यासांठी मोठं काम उभं केलं आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागला आहे. ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटने’चे अध्यक्ष दिलीप परदेशी सांगतात- महाराष्ट्रात फिरस्त्या जोशी समाजाची लोकसंख्या ३ ते ४ कोटी असेल. त्यातून पिंगळासमाजाची लोकसंख्या ५ ते ७ लाख असेल. आजवर हा समाज कधीच एकत्र न आल्यामुळे त्याची ताकद राजकीय पक्षांना अजून कळलेली नाही. म्हणून अाम्ही आधी या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण दर तीन दिवसांनी बदलावं लागणारं गाव, परिणामी शिक्षण नाही, शासकीय सवलती नाहीत. अशी या समाजाची कुचंबणा सुरू होती. पण माझ्या प्रयत्नांमुळे अनेकांना जातीचे दाखले मिळालेत. उर्वरित समाजालाही ते मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य म्हणजे आम्ही आर्थिक विकासाबरोबरच समाजाच्या सामाजिक विकासावरही भर देतोय. कारण सामाजिक विकास झाला नाही, तर समाज इतर समाजांच्या तुलनेत मागासलेलाच राहील. म्हणूनच गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षणाचा प्रसार करतानाच, समाजातील काही जुन्या चालीरिती मागे टाकण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ या समाजात आतापर्यंत विधवाविवाहाची किंवा परित्यक्तेला पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. त्यामुळे समाजातील अनेक महिलांना जगणं म्हणजे ओझं वाटू लागलं होतं. परंतु आता अशा महिलांसाठी म्होतुर लावण्याचा, म्हणजे पुनर्विवाहाचा पर्याय संघटनेने केलेल्या प्रबोधनामुळे समाजाने स्वीकारलेला आहे.’ 
विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे महाराष्ट्रभर विखुरलेला जोशी समाज आणि त्याच्या अंतर्गत पिंगळाही आता एक होऊ लागला आहे. नव्या सामाजिक-आर्थिक-राजकीय बदलाला सामोरं जाण्याची आस त्याच्यातही निर्माण झालेली आहे. त्यासाठी फक्त आपल्या पोटजातीत वस्ती करण्याऐवजी, तो संपूर्ण जोशी समाजात स्वतःला सामावून घेत आहे. अशा जोशी समाजाच्या आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये  मोठ्या कॉलन्याही आता उभ्या राहत आहेत. विशेषतः नगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत तर भटक्या जोशीसमाजाच्या मोठमोठ्या कॉलनीज आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगावमधील जोशी कॉलनीच्या जीवावर तिथला आमदार निवडून येतो. म्हणजे या समाजाला आता आपली समाजातली पत आणि ताकद कळलेली आहे.
आजवर नसलेली ही पत-प्रतिष्ठा हा समाज एकत्र आल्यावर आणि त्याने एकाच जागी वस्तान ठोकल्यावरच त्याला प्राप्त झालेली आहे. वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीवरील अर्जुनरावांच्या घरासमोर बसल्याबसल्या महाराष्ट्रातल्या एकूणच जोशी समाजाची आणि त्यातही पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी ऊर्फ पांगुळ समाजाची नाडीच जणू माझ्या हाती लागली होती. खरंतर एवढी वर्षं इतरांना भविष्य आणि शकुन सांगणार्या या समाजाला स्वतःचंच भविष्य उमगलं नव्हतं.
... पण आता पालापालांवर तांबडं फुटलंय. आपलं भविष्य आपल्याच हातात असल्याचं या भटक्यांनाही उमगलंय...
…..
('अनुभव' मासिकासाठी केलेल्या 'भटक्यांच्या पालावर' या पाच भागांच्या मालिकेतील पिंगळा समाजावरचा लेख)






सोमवार, २२ जून, २०१५

आर्यगंधर्व कौसल्याबाई


विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लावणीच्या क्षेत्रात प्रतिगंधर्व म्हणून ओळखल्या जाणा‍ऱ्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची जणू नावनिशाणीच कालपटलावरुन पुसली गेली आहे. मृत्यूनंतर तब्बल ४०  वर्षांनी पहिल्यांदाच त्यांच्या आठवणींना दिलेला उजळा

लावणीसम्राज्ञी कौसल्याबाई कोपरगावकर
छायाचित्र सौजन्य : अनंत पटवर्धन

१९२०-३० चा सुमार... संपूर्ण महाराष्ट्र बालगंधर्वांच्या गाण्याने आणि त्यांच्या स्त्री-रुपातल्या छबीने वेडावलेला होता. पुरुषवर्गाला बालगंधर्वांच्या गाण्याचा मोह पडला होता. तर महिलावर्ग बालगंधर्वांच्या केवळ वेशभूषेचंच नाही; केशभूषा, त्यांच्या बोलण्या-चालण्याची ढब सा‍ऱ्याचंच अनुकरण करत होता. अन् तरीही उभ्या महाराष्ट्रात प्रतिगंधर्व असं संबोधलं गेलं, ते फक्त कौसल्याबाई कोपरगावकर यांनाच! कौसल्याबाई खरंतर लावणीकलावंत. गंधर्वांचा बहराचा काळ, तो त्यांचा उमेदीचा काळ. पण बालगंधर्वांची वेशभूषा आणि रुपाचा त्यांना असा काही चस्का लागला की, आपल्याही नकळत कौसल्याबाईंनी बालगंधर्वांची नकल केली. अर्थात ही नकल फक्त बाह्यरुपाची म्हणजे वेशभूषेची होती. आपल्या मैफलीत त्यांनी कायम परंपरेनं चालत आलेली आपली घरंदाज लावणीच म्हटली आणि जपली. वेशभूषा मात्र अशी केली की, पाहताक्षणीच बघणा‍ऱ्याच्या तोंडून उद्गार निघावेत- अरे हे तर बालगंधर्व! कपाळावर दोन्ही बाजूना काढलेल्या वळणदार बटा, अंगात नक्षीदार चोळी, चापूनचोपून नेसलेलं पायघोळ लुगडं आणि खांद्यावरून पार कमरेखाली गेलेला पदर. अशाच सोज्ज्वळ वेशात कौसल्याबाई लावणी सादर करायच्या. मग ती लावणी खडी असो वा बैठकीची. आपल्या बालगंधर्वीय वेशभूषेचा आब त्या अशा काही सांभाळायच्या की पाहणाऱ्याला बालगंधर्वांचाच भास व्हायचा. त्यामुळे रसिकांनीच त्यांना उत्स्फूर्तपणे पदवी बहाल केली होती - प्रतिगंधर्व!
... आणि स्वतः बालगंधर्व त्यांना संबोधायचे आर्यगंधर्व! कारण पुण्यातील तत्कालीन आर्यभूषण तमाशा थिएटरवर कोसल्याबाईंचं अनभिषिक्त साम्राज्य होतं. बाईंची पार्टी उभी राहिली की, आर्यभूषणचं आवार रसिकांनी फुलून जायचं. बाई येण्याआधी रंगमंच्यावर तबलजी, ढोलकीवाला आणि पेटीवाल्याने बैठक जमवलेली असायची. त्यांनी जमवलेल्या वाद्यांच्या मेळ्यात आपल्या टाळ्यांच्या नादाची वैशिष्ट्यपूर्ण भर घालत कोसल्याबाई अवतरायच्या आणि बघता बघता लावण्यांचा फड जमून जायचा. दोन हात एकमेकांत गुंफून वाजवलेली टाळी हे बाईंचं खास अस्त्र होतं. बाईंचा हा टाळीनाद ऐकण्यासाठी रसिक हजेरी लावायचे, अशी आठवण पुण्याच्या आर्यभूषण तमाशा थिएटरचे मालक माजिदशेठ तांबे आजही सांगतात. या रसिकांमध्ये कोण नसायचं? मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्लाखाँसाहेब, नामवंत तवलावादक अल्लारखाँ आणि थिरकवाखाँसाहेब, मास्टर भगवान, आचार्य अत्रे, पु. . देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेकांनी कौसल्याबाईंच्या लावण्यांचा आस्वाद अनेकवेळा घेतला.
बाईंनी एकदा लावणी म्हणायला सुरुवात केली की, त्या थांबत नाहीत तोपर्यंत रसिक खिळून असायचे. कधी उभ्याने नाचून म्हटलेली द्रुत लयीतली फक्कडशी छक्कड, तर कधी बसून घोळवत म्हटलेली ठाय लयीतली बैठकीची लावणी आणि सोबत अदेचा नखरा... कौसल्याबाईंचे नृत्य आणि गाननिपुणत्व पाहण्यासाठी रसिक पुनपुन्हा हजेरी लावत. बालगंधर्व तर अनेकदा 'देवा देवा' म्हणत बाईंचं कौतुक करत. आर्यभूषणच नाही, तर बाईंच्या रास्तापेठेतील घरीही गंधर्व जात. बाईंची गायकी त्यांच्या विशेष आवडीची होती. कौसल्याबाईंच्या तरुण, पण दमदार आवाजातल्या लावण्या गंधर्वांना मोहात पाडायच्या. विशेष म्हणजे अनेकदा बाई स्वतः पेटी वाजवून त्यावर बैठकीच्या लावण्या म्हणत. त्यामुळे पुणे मुक्कामी असल्यावर गंधर्व आणि कौसल्याबाईंची भेट झाली नाही असं सहसा होत नसे. या भेटीत कोसल्याबाईंनी बैठकीच्या लावण्या म्हणाव्यात आणि बालगंधर्वांनी व्वा देवा, व्वा देवाम्हणत तारीफ करावी, ही रीत जणू ठरुनच गेलेली. बालगंधर्व नाट्यव्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला जाईपर्यंत या भेटीगाठी कायम होत्या. एवढंच नाही, तर कौसल्याबाईंवर जीव असल्यामुळेच बालगंधर्वांनी बाईंचा घरोबा आपल्या गंधर्व नाटकमंडळीतील गायकनट प्रभाकरपंत पटवर्धन यांच्याशी जुळवून दिला.
बालगंधर्वांनाही लोभावणारी कौसल्याबाईंची ही गायकी खास म्हणावी अशीच होती. त्यांना गोड आवाजाची देणगी निसर्गदत्तच लाभलेली होती. खरंतर त्यांचं घराणं तमाशा किंवा लावणीकलावंतांचं नव्हे. त्या गोंधळी समाजातल्या (आडनाव थिटे) होत्या. त्यांचे वडील माधवराव गोंधळकलावंत म्हणून प्रसिद्ध होते, तर आई म्हाळसाबाईकडेही जुन्या लोकगीतांचा मोठा संग्रह होता. या दोघांच्या प्रभावातून गाण्याची आवड फार लहानपणीच कोसल्याबाईंना लागली. परंपरेनं आलेलं गाणं-बजावणं रक्तातच असल्यामुळे पूर्वापार अनेक गोंधळीकलावंत तमाशा-लावणीच्या क्षेत्रातही नाव कमावून होते. कौसल्याबाईंचा लावणीच्या क्षेत्रातला शिरकावही असाच झाला. मात्र एकदा या क्षेत्रात आल्यावर त्यांनी एकलव्यनिष्ठेने पारंपरिक लावणी शिकून घेतली. त्या काळात बाई सुंदराबाई जाधव, चंदा कारवारकरीण, हिराबाई सासवडकर, शेवंता जेजुरीकर, सरस्वती कोल्हापूरकर अशा अनेक नामवंत लावणीगायिका आपला जम बसवून होत्या. बहुतेकींचे पुण्यात दिवाणखाने होते. संध्याकाळ झाली की, या दिवाणखान्यांतून बैठकीच्या लावण्यांचे दीप उजळायचे. यातल्या बहुतेकींच्या आवाजातील लावण्यांच्या त्या काळी म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रेकॉर्ड निघाल्या होत्या. कौसल्याबाईंचं गाणं या बुजुर्ग लावणीकलावंतांच्या गाण्याशी नातं सांगणारं होतं. त्यामुळेच आजही त्यांची अबोला का रे धरसी, सखया बोला मजसीसारखी तबकडीवरची लावणी कानावर पडली की अवाक् व्हायला होतं. त्यांचं लावणीगायन ऐकताना त्यांना किमान उपशास्त्रीय प्रकारातील गाण्याचं अंग होतं, असं म्हणावं लागतं. कारण ही लावणी ऐकताना तिच्यात ठुमरी-कजरीसारख्या उपशास्त्रीय गानप्रकारातली वै‌शिष्ट्य जाणवत राहतात. ही ठाय लयीतली लावणी ऐकताना आपल्या कानावर बाईंचं नुस्तं गाणं पडत नाही, तर त्यातली बाईंची शब्दांची फेक अशी आहे, गाण्याबरोबरच नजरेसमोर बाईंचं भावकामही सुरू होतं. महत्त्वाचं म्हणजे कोसल्याबाईंचं लावणीगायन एकदम खानदानी होतं. बालगंधर्व संगीत रंगभूमीवर जी घरंदाज करामत करत होते, तीच करामत कौसल्याबाई लावणीच्या रंगमंचावर करत होत्या. योगायोग म्हणजे बालगंधर्वांचा मृत्यूनंतर पुण्यात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बालगंधर्व रंगमंदिर सुरू करण्यात आलं, तेव्हा तिथे कार्यक्रम सादर करण्याचा पहिला मान कौसल्याबाईंनाच देण्यात आला होता.
बालगंधर्वांच्या प्रभावातून कौसल्याबाईंना गाण्याचीदेखील विशेष मर्म आकळली असली पाहिजेत. कारण तीन मुलांच्या पाठीवर झालेली मुलगी कमल हिला गाणं शिकवण्यासाठी कौसल्याबाईंनी खास किराना घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँसाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशबाबू माने यांची नेमणूक केली होती. सुरेशबाबू मानेंकडे कमल वर्षभर शास्त्रीय पद्धतीचं गाणं शिकली. त्यावेळी आपल्याबरोबर सुरेशबाबूंकडे आजच्या नामवंत गायिका प्रभा अत्रेदेखील गाणं शिकत असल्याची याद आज ऐंशीच्या घरात असलेल्या कमलबाई हटकून जागवतात. वर्षभरानंतर आपलं गाणं खंडित झाल्याची रुखरुख कमलबाईंना आजही आहे. पण शास्त्रीय गाणं सुटलं, तरी परंपरेतलं गाणं मात्र कमलबाई गात राहिल्या. परंतु हे गाणं लावण्यांपेक्षा वगनाट्यासाठीचं होतं. उदाहरणार्थ लीला गांधी यांचंसोळावं वरीस धोक्याचं’, निळू फुले यांचंकथा अकलेच्या कांद्याचीयांसारख्या अनेक वगनाट्यांसाठी कमलबाई यांनी गाणी गायली. त्याशिवाय अगदी तरुणपणी भाऊबीज, शिवलीला’, ‘सुदाम्याचे पोहे’, ‘चिमण्यांची शाळाया चित्रपटांत त्यांनी सुलोचना, वसंत शिंदे, आशा काळे यांच्याबरोबर कामही केलं. परंतु या झगमगाटी दुनियेपासून कौसल्याबाईंनी आपल्या लेकीला तसं दूरच ठेवलं होतं. आपल्याबरोबरही त्या क्वचितच तिला घेऊन जात.
कौसल्याबाईंनी मात्र अखेरपर्यंत लावणीशी असलेलं आपलं नातं जपलं आणि वाढवलंही. लावणीगायनाच्या क्षेत्रात येऊ इच्छिणा‍ऱ्या अनेकींना त्यांनी शिकवलं. कौसल्याबाई, राधाबाई बुधगावकर आणि यशोदाबाई वाईकर या तिघींची तर खास दोस्ती होती. तिघींनी महाराष्ट्र गाजवला होता. पैकी आपल्या मुलीच्या मुलाचं लग्न राधाबाईंच्या नातीशी करुन त्यांनी राधाबाई बुधगावकर यांच्याशी तर नातंही जोडलं. महाराष्ट्र शासन आयोजित तमाशा प्रशिक्षण शिबिरात कौसल्याबाईंनी प्रशिक्षकाची भूमिकाही पार पाडली. तसंच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे दिल्लीत १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोरही आपली कला पेश केली. इतकं कौसल्याबाई हे लावणीपरंपरेतलं मानाचं लखलखीत पान आहे.
अन् तरीही कौसल्याबाई कोपरगावकर यांचं नाव आज जणू इतिहासात गडप झालंय. जणू कौसल्याबाई झाल्याच नाहीत.
पण त्यांच्या मुलीचा म्हणजे कमलबाई पटवर्धन यांचा नातू अनंत पटवर्धन याने आपल्या पणजीला पुन्हा वर्तमानाच्या झळाळीत आणण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखाच्या निमित्ताने कौसल्याबाईंच्या आयुष्यातले काही मोजके कप्पे पहिल्यांदाच उघड होत आहेत. प्रतिगंधर्व म्हणून नावारुपाला आलेल्या कौसल्याबाईंची आजच्या रसिकांसाठी ही पहिलीच झलक!

'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये पूर्वप्रकाशित (२१ जून २०१५)

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

रुपखणी बावनखणी


रुपखणी गुणखणी बावनखणी

...................
मुकुंद कुळे
लेखातील चित्र : रोहन पोरे
.................



नजर भिरभिरत असते, दाणेआळीपासून शालुकराच्या बोळापर्यंत आणि ढमढेरे बोळापासून पासोड्या मारुतीपर्यंत... कुठे ओळखीची खूण सापडतेय का ते पाहत. सा‍ऱ्या वस्त्या धुंडाळून होतात. सा‍ऱ्या इमारती निरखून-पारखून होतात. गल्ल्यांतल्या काना-कोप‍ऱ्यांचाही माग काढून होतो. पण कुठेच गवसत नाही, तिच्या अस्तित्वाची एखादीही खूण! ना घुंगरांच्या लयबद्ध किणकिणाटाची, ना तबल्यावर पडलेल्या जडशीळ हाताची, ना सारंगीवर छेडलेल्या नाजुक सुरावटीची, ना गळ्यातून उमटलेल्या अलवार तानेची...

सारंच कसं भग्न आणि भकास. एक बेहोष उदासी सर्वत्र भरुन राहिलेली... जणू पेशवाई बुडाली आणि जाता जाता तिलाही सोबत घेऊन गेली. पण असं तरी कसं म्हणावं, पेशवाईच्या पश्चात किमान शंभर-सव्वाशे वर्षं ती आपला आब राखून होती. कायम महावस्त्रासारखी झळाळत राहिली. अगदीच सात्त्विक-सोज्ज्वळ नव्हतीच ती कधी. पण अगदी बाजारबसवीही नव्हती खास! ज्यानं-त्यानं इज्जतीनं यावं आणि इज्जतीनं जावं, असा तिचा रुबाब. तो तिने अगदी आता-आतापर्यंत म्हणजे पन्नासेक वर्षांपूर्वीपर्यंत जपला आणि मग अचानक गायब झाली. गायब म्हणजे पार परागंदा... अस्तित्वाची एकही खूण मागे न सोडता. मग तिला शोधता शोधता अवस्था थेट वेड्यापिश्यासारखी होऊन जाते. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे- त्रिखंड हिंडुनी धुंडितसे, न परी हरपले ते गवसे...

पण मजा म्हणून गोलगोल फिरवणा‍ऱ्या घुणघुण्याचंच गतिमानतेमुळे तयार व्हावं एक आवर्त, तसंच मनात एकच एक विचार घोळवल्यामुळे विचारच घेतात एक मूर्त रूप आणि ध्यानीमनी नसताना अचानक तीच समोर येऊन उभी ठाकते...साक्षात् नवयौवना. रुपखणी, गुणखणी, बावनखणी!

... आणि बघता-बघता रातीचा अमल असतानाही शुक्रवारपेठ उजळून निघते. पलित्यांच्या प्रकाशात सरदार-दरकदार, तालेवार मंडळींची वर्दळ सुरू होते. कुणी पालखीतून, कुणी घोड्यावरून, तर कुणी पायीच आपापला जामानिमा सांभाळत अवतरतात... थोडसं गांगरून, थोडसं खाकरून, थोडे कावरेबावरे होत, इकडे-तिकडे बघत, अचानक कुणाला काही कळायच्या आत बावनखणीत गुडुप होतात. त्यांच्या आगमनाने मग बावनखणीतली शमादानं-चिरागदानं उजळत जातात. सुरुदार दिवाणखान्यांतल्या चिकाच्या पडद्यांची सळसळ वाढते. रात्रीचे प्रहर चढत जातात, त्याप्रमाणे सारंगीच्या खुंट्या पिळल्या जातात, तबल्याच्या वाद्या आवळल्या जातात. सुरेख घाट साधलेले विडे एका पाठोपाठ एक रिचवून नजाकतदार गाण्याचं मायाजाल उभं केलं जातं. ते मायाजाल एवढं मोहमयी असतं की रामप्रहर होतो, तरी रात्रीचं भान काही सरत नाही. ही भूल असते बावनखणीतल्या गाण्याची आणि गाणारीचीही. अशी ही बेहोष-मदहोष करणारी बावनखणी... पेशवाईतील सर्व तालेवारांचा रंगीला मिजाज आपल्यात सामावून‌घेणारी बावनखणी.

युद्धाची धामधूम असो की सणासुदीची आतषबाजी की पुण्यावर कोसळलेलं एखादं संकट, शुक्रवारातल्या बावनखणीची रौनक कधीच कमी झाली नाही. कारण बावनखणी होती दर्दी आणि छंदी-फंदींच्या विसाव्याचं हक्काचं ठिकाण. अगदी मोक्याचं. भल्याभल्यांना घायाळ करणारी, ही बावननखणी. जणू- अंगी तारुण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारीते लहर, मदनतल्वार...एवढंच नाही, बावनखणी म्हणजे पेशवेकालीन पुण्यातलं सांस्कृतिक ठाणंच!

त्यासाठीच तर निर्मिती झाली होती बावनखणीची. पुणे शहरभर विखुरलेल्या नाच-गाणं करणा‍ऱ्या सा‍ऱ्या कसबिणी आणि कलावंतिणी या बावनखणीत एकत्र आणल्या होत्या. त्यांच्यासाठी शहरभर होणारा दंगा, एकाच ठिकाणी व्हावा म्हणून. खास त्यांच्यासाठी बावन्न खणांची म्हणजे बावन्न खोल्यांची दुमजली-दुपाखी चाळ बांधली गेली. नानासाहेब पेशव्यांच्या काळात बांधण्यात आलेल्या या बावनखणीचं वर्णन १८६८मध्ये प्रकाशित झालेल्या नारायण विष्णू जोशी लिखित पुणे शहराचे वर्णनया पुस्तकात पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे- नानासाहेब पेशवे यांच्या काळात तत्कालीन कोतवाल जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांनी उदमी लोकांस कौल देऊन ही पेठ वसवली व वाडा बांधला. शेजारी बावन्न खणांची दुघई दुमजली चा‍ळ बांधली आणि ती जागा कसबिणी व कलावंतिणी यांस राहण्यासाठी भाड्याने दिली. ह्याच्या पूर्वी कसबिणी सर्व शहरात पसरलेल्या होत्या. त्या सर्व ह्यांनी आपल्या सन्निध आणून ठेवल्या. त्याही सर्व एकदम तेथे राहण्यास आल्या. याचे कारण की त्या गृहस्थाकडे कोतवाली होती. त्यावेळच्या कोतवालाचा अधिकार इतका असे की, आता तितका कोणासही नाही. तेव्हा काही जरबेने, काही खुशीने, काही प्रीतीने व ममतेने आल्या असतील. ही बावन्नखणी पुण्यातील लोकांस व बाहेरील लोकांस माहीत नाही, असे नाहीच. आबालवृद्धांस ही जागा ऐकून अथवा प्रत्यक्ष पाहून माहीत आहेच.

पुणं पाहिलेलं असो वा नसो, पुण्याची पेशवाई आणि तिथल्या बावनखणीची ओळख प्रत्येकाला असतेच. तसा बावनखणीचा हा लौकिक अगदी पहिल्यापासूनचा. ती बदनाम होती-आहे, हे तर खरंच. पण बदनामही तेच होतात, ज्यांना काही नाव असतं. तेव्हा, सुरुवातीच्या काळात बावनखणी म्हणजे पुण्यातलं एक सांस्कृतिक केंद्रच होती. दिवसभर काम करून थकलेल्यांचं घटकाभर मनोरंजन करणारी आणि रगेल व रंगेल असणा‍ऱ्यांची रगही जिरवणारी. पण बावनखणी म्हणजे निव्वळ देहाचा व्यापार करणारं केंद्र कधीच नव्हतं. कला आणि सुरतव्यापार यांचा सुरेख मेळ बावनखणीच्या ठायी होता. म्हणून तर त्या काळात गाजलेल्या कलावंतिणी बावनखणीत एकत्र आल्या होत्या. त्यांना गाण्याची-नाचकामाची चांगली पहेचान होती. एकप्रकारे मीनाबाजारच तर होती बावनखणी...

नाच-गाण्याचे ताफे असलेल्या कसबी-कलावंतिणींसाठी ही बावनखणी उभारण्यात आली होती; तरी या बावनखणीत सुरुवातीपासून नेमक्या किती कलावंतीणी होत्या, त्याची माहिती मिळत नाही. पेशवे दफ्तरातील एका कागदात मात्र तत्कालीन कलावंतिणींच्या ३६ ताफ्यांची नोंद सापडते. या कागदात दिलेली कलावंतिणींची यादी पुढीलप्रमाणे आहे- सिवशानी व आनंदी तेलंगी, बहि‍ऱ्या दोघी तेलंगी, मिठा नाईकीण पुणेकर, लातू तेलंगी, बसंत तेलंगी, देवी तेलंगी, महबूबचंदी सातारकर, रहिमती पुणेकर, नूरंदी तेलंगी, चपटीपना औरंगाबादकर, धना चपटीपनाची बहीण, सावनूरवाली पना, करिमी दादा पोतनिसाची, शामा नाईकिणीची राधी, आजबकुवर मिठो औरंगाबादकर, गुजराथणी नारायणदासवाल्या, मथी थेरकरीण, मत‌ी टोपीवाली, नुरा नाईकीण पुणेकर हिरी गुलाबी, साबी आंबडापूरवाली, फुंदन सातारकर, बना नाईकिणीची जना नाइकीण गाववाली, लालन सभाकुवरीची, बदल रणमली, गंगी थेरकरीण, रतनी सातारकर पिरा नाइकिणीची, वाईवासी रंभा, येवलेवाली लालन रणमली, जिवना नाइकिणीची करिमी, गंगी रणमली‌, दिलवाली आखण, बसंती उजनवाली आणि जमना नाईकीण मुंबईवाली... या सगळ्या कलावंतिणींचे आपापले नाच-गाण्याचे ताफे होते. म्हणजे वादकांपासून नृत्यात साथ देणा‍ऱ्या सहनर्तकीपर्यंत सगळे या ताफ्यात असत. त्यामुळेच बावनखणी म्हणजे एकप्रकारे लखनौमधल्या गाणी-बजावणी करणा‍ऱ्या कोठ्यांसारखी कोठीच होती. फक्त लखनौमधली एकेक कोठी म्हणजे राजवाडाच आणि तिथे कोठेवाली एकाचवेळी अनेक नर्तकींना आश्रय द्यायची. याउलट पुण्यात खुद्द पेशव्यांनीच, म्हणजे नानासाहेब पेशव्यांनीच कलावंतिणींसाठी एक मोठी कोठी बांधली- बावनखणी.

खुद्द पेशव्यांच्या मर्जीनेच ही बावनखणी बांधली गेली, तरी या बावनखणीत कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर व्हायचं याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. त्याच्या नीट नोंदीही कधी झालेल्या नाहीत. मात्र उपलब्ध कलावंतिणींची नावं ज्या पद्धतीने लिहिलेली किंवा रुढ झालेली आढळतात; त्यावरून नंतरच्या काळात महाराष्ट्रात नावारूपाला आलेल्या तमाशा - लावणी कलेची बीजं बावनखणीत आहेत, असं खात्रीने म्हणता येतं. कारण आजही तमाशा क्षेत्रातील महिला कलावंतांची नावं त्याच पद्धतीने उच्चारली वा लिहिली जातात. उदाहरणार्थ कौसल्याबाई कोपरगावकरीण, पारुबाई जेजुरीकरीण, यमुनाबाई वाईकरीण वगैरे... अर्थात यावरून बावनखणीत सादर केल्या जाणा‍ऱ्या तत्कालीन नाच-गाण्याच्या काहीच ठोस अंदाज येत नाही.

मुळात मराठेशाही किंवा पेशवाईच्या काळात महाराष्ट्रात ठोस अशी नाच-गाण्याची परंपराच नव्हती. यादवकाळात महाराष्ट्रात रुजलेली धृपदगायनाची संगीतपरंपरा मुस्लिम आक्रमकांनंतर खंडित झाली होती आणि महाराष्ट्राचं खास प्रातिन‌‌िधिक नृत्य किंवा गायन तेव्हाही नव्हतं. त्यामुळेच बावनखणीत रसिकरंजनासाठी कोणत्या प्रकारचं नाच-गाणं सादर होतं होत, हे कळायला मार्ग नाही. मात्र काही आडाखे जरूर बांधता येतात. उदाहरणार्थ औरंगजेबाच्या कैदेत लहानाचे मोठे झालेल्या सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांना मोगली मनोरंजनाची आणि खिदमतगारीची चांगलीच जानपहेचान होती. वर्षान‌ुवर्षं कुटुंबापासून दूर राहणा‍ऱ्या सरदार-शिपायांच्या मनोरंजनासाठी छावणीतच असलेले कलावंतिणींचे तंबू आणि त्यातील नाच-गाणंही त्यांनी पाहिलं-अनुभवलं होतं. त्यामुळेच महाराष्ट्रात परत येताच त्यांनी मोगलदबारच्या धर्तीवर मराठेशाहीतही नाच-गाण्याला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यासाठी खास उत्तरेहून कलावंतांची आयात करायला त्यांनी सुरुवात केली. पेशवेकालीन महाराष्ट्रया पुस्तकात लेखक वा. कृ. भावे यांनी यासंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात- शाहूमहाराज हा राजश्वैर्यास सर्वस्वी पात्र असा पुरुष असून, त्याला इतर अनेक कलांप्रमाणे संगीताचीही आवड होती. म्हणूनच त्याने मोठ्या प्रयासाने दूरदूरच्या स्थळांहून गवई, नट, भाट, नायकिणी इत्यादिकांचा संच जमविला. दिल्ली, उत्तर हिंदुस्थानातील अनेक शहरे ही गायनवादनाची आगरे होत. यासाठी शाहूने तिकडून गुणिजन मिळवण्याचा प्रयत्न केला. हे काम तो पेशवे व इतर सरदार यांजमार्फत करून घेत असे.

अशा पद्धतीने पर प्रांतातून आणलेल्या कलावंतांचा सुरेख संग्रह शाहूमहाराजांनी त्यांच्या दरबारात केला होता. आणि या कलावतांच्या कलेचा ते नियमितपणे आस्वादही घेत. मात्र याचबरोबर प्रत्येक वेळी परप्रांतातून कलावंत मागवायला नकोत, म्हणूनही शाहूमहाराज प्रयत्नशील असलेले दिसतात. यासंदर्भातील पेशवे दफ्तरातील एका कागदाचा हवाला देऊन वा. कृ. भावे लिहितात- परप्रांतातून नायकिणी आणविण्यास पैसा फार खर्चावा लागतो, असे पाहून महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच चांगल्या होतकरू मुली ‌मिळवून त्यांना नृत्यकलेत तरबेज करण्याचे शाहूने मनास आणिले व कोकणात खंडोजी माणकर या अ‌धिका‍ऱ्याकडे ती कामगिरी सोपवली.

या उदाहरणांवरून शाहूमहाराजांच्या प्रोत्साहनामुळे नंतरच्या काळात महाराष्ट्रातच गायन-नर्तन करणारे चांगले कलाकार निर्माण झाले असतील, असं म्हणण्यास वाव आहे. मात्र हे सारेच कलावंत प्रामुख्याने निम्न जातीतील असण्याची दाट शक्यता आहे. कारण शाहूमहाराजांच्या मागणीनुसार खंडोजी माणकाराला पेशव्यांनी लिहिलेल्या एका पत्रात- बटकीच्या पोरी दोन बहुत चांगल्या, दहा-अकरा वर्षांच्या, निरोगी, नाचावयास लायक अशा पाठवाव्या’, असा स्पष्ट उल्लेख आहे. मराठेशाही किंवा पेशवाईत दासी-बटकींची आणि त्यांच्या मुलांची खुलेआम खरेदी-विक्री होत असे. त्यामुळे नाच-गाण्यात तयार करण्यासाठी या दासी-बटकींच्या मुला-मुलींचाच वापर होत असणार हे नक्की! तसंच धाकटी चंदी सातारकरकिंवा शामा नायकिणीची राधीअशी बावनखणीकालीन कलावंतिणींची नावं आढळतात, ती बहुधा त्यामुळेच!

महाराष्ट्रातच कलावंतांची निर्मिती करण्याच्या शाहूमहाराजांच्या धोरणामुळे एक मात्र नक्की झालं, इथे कलावंत घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. तीही थेट गुरु-शिष्य पद्धतीने. याचाही दाखला पेशवे दफ्तरात मिळतो. शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्यांनी कलावंत घडवण्याचं मनावर घेतलं आणि तशी ताकीद आत्माराम राजाराम नावाच्या आपल्या अधिका‍ऱ्याला केली. हा अधिका‍री नानासाहेब पेशव्यांना एका पत्रात कळवतो- साहेबीं, जातेसमयी ताकित केली की, खबरदार रहाणे, पोरींची निगा करणे. तालीम उत्तमप्रकारे करवीत जाणे. त्यानुसार त्यांसी खाणे जेवणे उत्तम प्रकारे होत आहे. व गावयाची तालीम उत्तम प्रकारे काशीबा पांच-सांत घटका देत आहेत. फकीर महंमदही तालीम उत्तम देत आहे...

शाहूमहाराजांच्या आज्ञेवरून नानासाहेब पेशव्याने स्थानिक कलावंतांना तालीम द्यायला सुरुवात केली, तरी ते गाणं आणि नृत्य नेमकं कोणतं होतं, याचा काही अंदाज बांधता येत नाही. मात्र ते गाणं उत्तरेतील गवयांप्रमाणे धृपदगायकीचं आणि नृत्यही उत्तरेच्या कोठ्यांप्रमाणे कथक स्वरुपाचं असावं. अर्थात ते आजच्या इतकं तयारीचं नसेल कदाचित! किंबहुना ते प्राथमिक स्वरुपाचंच असेल. पण बावनखणीत गाणा‍ऱ्या-नाचणा‍ऱ्या कलावंतिणी ग्रामीण संस्कृतीतील लोकगीतं गात नव्हत्या खास. त्यांचंही गाणं काहीएक तयारीचंच होतं, असेल. कारण पेशव्यांचं पुणे आणि मराठेशाहीची राजधानी असलेल्या साता‍ऱ्यात सांस्कृतिक आणि सांगीतिक वातावरण तयार झालेलं होतं. शाहूमहाराजांचं बालपण मोगलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच या गोष्टी ठाऊक होत्या. तर पेशव्यांना त्या शाहूमहाराज व आपल्या सरदारांमुळे माहीत झाल्या. पहिल्या बाजीरावाने नर्मदा ओलांडून मराठ्यांचं राज्य दिल्लीच्या तख्ताला भिडवलं आणि तिथे जम बसवण्यासाठी शिंदे-होळकर-पवार यांसारख्या सरदारांना तिथेच जहागिरी दिली. परिणामी तिथेच स्थायिक झालेल्या या सरदारांनी उत्तर भारतीय माहौल लवकरच आत्मसात केला आणि त्याची झलक पेशवे-शाहूंनाही दाखवली. पुणे-साता‍ऱ्यातील सांस्कृतिक वातावरण त्यातूनच आकाराला येत होतं. त्यात शाहूमहाराजांचं १५ डिसेंबर १७४९ला निधन झालं आणि कलावंतांची बूज राखण्याचं काम सर्वस्वी नानासाहेब पेशव्यांच्या खांद्यावर आलं. ही बूज त्यांनी उत्तम रीतीने राखली. त्याचा उत्तम दाखला म्हणजे शुक्रवारपेठेत दिमाखात उभी राहिलेली बावनखणी!

नानासाहेबांच्या काळात बावनखणी उभी राहिली, पण त्या बावनखणीतल्या कलेचा प्रत्यक्ष नानासाहेबाने किती उपभोग घेतला शंका आहे. कदाचित विशिष्ट सण-उत्सवकाळात त्याने या बावनखणीतील कलावंतिणींना शनिवारवाड्यावर बोलावलंही असेल, पण तशी नोंद तरी सापडत नाही. अर्थात नानासाहेब पेशव्याची येसू नावाची जी नाटकशाळा होती, ती उत्तम गायची. नानासाहेब पेशव्यापासून दुस‍ऱ्या बाजीरावापर्यंत सर्वच पेशव्यांनी खासगीत बाळगलेल्या बहुतेक नाटकशाळा या नाच-गाण्यात तरबेज होत्या. या नाटकशाळा खुद्द पेशव्यांच्या असल्यामुळे त्यांची राहण्याची-उदरनिर्वाहाची व्यवस्था स्वतंत्र केलेली असायची.

नानासाहेबापासून किमान पुण्यात तरी एकप्रकारचं सांगीतिक वातावरण तयार झालं होतं. खुद्द त्याच्या दरबारात नारो आप्पाजी भावे नावाचे सतारवादक आणि धृपदीये होते. ही संगीत परंपरा शेवटच्या बाजीरावापर्यंत कायम होती. दिवंगत गायक-संगीतसमीक्षक वामनराव देशपांडे यांनी महाराष्ट्रातील संगीताचे कार्यया पुस्तकात यासंबंधी एक नोंद केलेली आहे. ते लिहितात- पेशवाईच्या अखेरपर्यंत पावा भीमराव, राणी शिंपी, विठू गुरव, त्र्यंबक आत्माराम, विठोबा पारनेरकर हे थोरले माधवराव आणि सवाई माधवराव पेशवे यांच्या आश्रयाखाली होते. आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या राजवटीत दावलखान, मेंढूसेन, विलासबरसखान आणि चिंतामणी मिश्र यांसारखे अनेक धृपदगायक संगीताची जोपासना करत होते.म्हणजे पेशवाईत शास्त्रीय संगीतासाठी आश्वासक असं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि ते शुक्रवारातल्या बावनखणीत अगदीच झिरपलेलं नव्हतं, असं म्हणणं कठीण आहे. किंबहुना नानासाहेब पेशव्यांनंतर सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात नावारुपाला आलेल्या व्यकंट नरसी, चंद्री नायकीण, सगुणी कलावंतीण, लक्ष्मी परभीण या कलावंत महिला बावनखणीतल्याच होत्या. फरक एवढाच होता की, नानासाहेब पेशव्याच्या काळात बावनखणी नावाची कलावंतिणींचे दिवाणखाने असलेली एकच वास्तु होती. सवाई माधवराव आणि दुस‍ऱ्या बाजीरावाच्या काळात बावनखणीचा विस्तार होत गेला. एकेका कलावंतिणीची एकेक स्वतंत्र वास्तू म्हणजे दिवाणखाने उभे राहिले आणि शुक्रवाराचा परिसर बावनखणी म्हणून ओळखला जाऊ लागला.

नानासाहेब पेशव्याच्या काळात उभी राहिलेली बावनखणी ‌कशी होती, त्याचं काहीच रेखाचित्र-कल्पनाचित्र उपलब्ध नाही. कुणी कधी काढल्याचंही ऐकिवात वा वाचण्यात नाही. पण आजच्या पुण्यातील शुक्रवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजच्या बाजूला मूळ बावनखणीची जागा असल्याचं म्हटलं जातं. ती दुपाखी-दुमजली इमारत होती, असे उल्लेख मात्र पेशवे दफ्तरांत सापडतात. बावन्न खणांतल्या प्रत्येक खणांत वेगवेगळी कलावंतीण असण्याची शक्यता कमी आहे. किंबहुना प्रत्येक कलावंतिणीबरोबर असलेला कलावंतांचा ताफा बघता प्रत्येकीच्या वाट्याला हमखास तीन-चार खण आले असतील. मात्र ही बावनखणी हमखास पेशवाईच्या तेव्हाच्या इतमामाला साजेशी असेल. एक लांबलचक दिवाणखाना, मध्ये बारीक कोरीवकाम केलेले सुरुदार खांब, छताला हंड्या-झुंबर आणि खासेस्वारीसाठी खास भिंतीला टेकून तयार केलेली गाद्यागिर्द्यांची बैठक. नाच-गाण्याची मै‍फल जमायला याहून अधिक काय हवं? मग त्या मैफलीतून उमटणारे सूर मोरी छोडो डगरीया हो श्यामअसे, तक्रारीचा भाव आळवणा‍ऱ्या ठुरीचे असोत नाहीतर; ‘शहर बडोदे सोडून गेले, वर्षं झाली बारा... सखे बाई गंअशी आर्त हाक घालणा‍ऱ्या लावणीचे असोत. बावनखणीखालून जाताना एखाद्या बाजिंद्या कलावंतिणीचा असा काळीज चिरत जाणारा आवाज ऐकून कुणी बावनखणीची पायरी चढला नसेल, तरच नवल!

नानासाहेब पेशव्यांनी उभारलेल्या बावनखणीची एवढी जादू तर होतीच. नानासाहेबाच्या काळात पेशवाई भरभराटीला आली. मात्र १७६१च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि काही काळ पुण्याची रया गेली. पण थोरल्या माधवरावांनी पेशवाईची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली आणि नाना फडणविसांच्या बौद्धिक कारवायांमुळे सवाई माधवरावाच्या काळात पेशवा आणि पुणं पुन्हा भरभराटीला आलं. या काळात पुणं वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होतं. साहजिकच बावनखणीला पुन्हा बहर आला. हा बहर दुस‍‍ऱ्या बाजीरावाच्या काळात चरमसीमेला पोचला. विशेष म्हणजे दुस‍ऱ्या बाजीरावाने शुक्रवारपेठेत आपल्या मौजमस्तीसाठी वाडा बांधल्यावर नंतर स्वतःच्या मर्जीतल्या कलावंतिणींसाठी बावनखणी परिसरात माड्याही बांधल्या. त्याचे अनेक दाखले पेशवे दफ्तरांत सापडतात. त्याच्या स्वदस्तुरची एक नोंद सापडते ती अशी- शुक्रवारचे वाड्यासमोर जागा, घरे आम्ही पूर्वी खरेदी केल्याच आहेत. त्या मोडून सगुणी कलावंतिणीचे घरचे दक्षिणेस व चंद्रीचे घराचे दक्ष‌िणेस व तालीमखाना नवा शुक्रवारचे वाड्यापुढे रस्ता मधी टाकून बांधिला आहे. त्याचे मुकाबिल्यास पूर्व-पश्चिम लांबीचा रस्ता मधी सोडून आम्ही घर बांधून त्यांत कलावंतिणी बि‍ऱ्हाडासारख्या ठेवल्या आहेत. त्या आमच्या घरास साडे नऊ हजार रुपये लागले असत. लौकिकांत ते घर कलावंतिणीचे म्हणवतो. परंतु ते घर आमचे. कलावंतिणीचे नाही.

या पत्रात पेशवाईतील बावनखणीतील दोन प्रसिद्ध कलावंतीणींची नावं आढळतात. यातली चंद्री नायकीण बाजीरावाच्या खास मर्जीतली होती. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या विश्रामबागवाड्यातील नाचीच्या दिवाणखान्यात हिच्या नृत्याचे अनेक कार्यक्रम झाल्याच्या नोंदी आढळतात. कुणी पाहुणेमंडळी आली की त्यांच्या पाहुणाचारासाठी चंद्रीचा नाच खास आयोजित केला जायचा.

सगुणी कलावंतीण तर सवाई माधवरावाच्या काळापासून आपली सेवा पेशवे दरबारी रुजू करत होती. सवाई माधवरावाची तिच्यावर बहुधा खास मर्जी होती. त्यामुळेच एका पत्रात तो लिहितो- सगुणी कलावंतीण, वस्ती पेठ शुक्रवार, शहर पुणे, इणे दत्ताजी साबळा दाळिंबकर याजपासून दीडशे रुपयांस चहू वर्षांची एक मुलगी खरेदी केली आहे. तिचे जकातीचा आकार माफ केला असे, तरी आकार होईल तो माफ खर्च लिहून जकातीचा तगादा न करणे...

पेशवे रोजनिशींतल्या अनेक पत्रांत अशा कैक कलावंतिणींची नावं सापडतात. पण व्यंकट नरसी या नाचीइतकी लोकप्रियता आणि राजमान्यता क्वचितच कुणाला मिळाली असेल. व्यंकट नरसी होती राजनर्तिका. पण तिचंही वास्तव्य बहुधा बावनखणीतच होतं आणि त्याकाळी ती वारांगना म्हणूनच प्रसिद्ध होती. वाड्यात होणारे मोठमोठे उत्सव असोत किंवा निजाम-इंग्रजांच्या प्रतिचनिधींचं स्वागत करायचं असो, अशा वेळी खास व्यंकट नरसीलाच याद केलं जाई. दुस‍ऱ्या बाजीरावाच्या एका पत्रात एका उत्सवसमयी तीन दिवस सतत व्यंकट नरसीचा नाच आणि रामचंद्र गोसावी पैठणकर यांचं गायन झाल्याचा उल्लेख आलेला आहे. तर एका ठिकाणी बाजीरावाने अहोरात्र दोन दिवस नाचवून तिला २६ हजार रुपये बक्षीस दिल्याचीही नोंद सापडते. हिच्या नावासंबंधीही एक हकिकत आहे. हिचं मूळ नाव नरसी. विश्वगुणादर्श ग्रंथाचा कर्ता पंडित व्यंकटाध्वरी याने तिच्या नाचांत काही दोष काढून ते स्वतः तिला समजावले. तेव्हापासून ती स्वतःला पं. व्यकंटाध्वरी यांची शिष्या मानू लागली आणि आपल्या नावाआधी त्यांचं नाव लावू लागली.

मात्र सगुणी असो, चंद्री असो किंवा व्यंकट नरसी असो, त्या कोणत्या प्रकारचा नाच करीत हे उलगडत नाही. त्यामुळेच बावनखणी म्हणजे निव्वळ शेजेची सोय किंवा छचोरपणा, असा आरोप बावनखणीवर नंतरच्या काळात करण्यात आला. गेल्या शंभर-पन्नास वर्षांत शुक्रवारपेठेचा मूळ बावनखणीचा भाग आणि त्याला जोड मिळालेला बुधवार पेठेचा भाग मिळून जो रेड लाइट एरिया तयार झालाय, तो पाहून कुणाला हा आरोप खराही वाटेल. पण त्यात तथ्य नाही. गायन-नर्तन हीच कायम बावनखणीची मिरास राहिली आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कदाचित बावनखणीतील नाच-गाण्याला डौलदार रूप लाभलं नसेल कदाचित. पण सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव यांच्या काळात बावनखणीत लावणीचा शिरकाव झाला आणि बावनखणीने कात टाकली. ती अक्षरशः झळाळून उठली. याचं श्रेय ख‍ऱ्या अर्थाने जातं दुसरा बाजीराव आणि शाहीर होनाजीबाळाला. कारण दुस‍ऱ्या बाजीरावाने उत्तरतेल्या ठुमरी-कजरीसारख्या ठाय लयीतील गाण्याच्या धर्तीवर लावण्या रचायला होनाजीबाळाला सांगितलं आणि त्याने ते शिवधनुष्य पेललं. एकाच सुरात म्हटल्या जाणा‍ऱ्या पारंपरिक लावणीगीताचे सूर होनाजीबाळाने असे काही खेचले की उत्तरेतल्या बैठक की ठुमरीच्या धर्तीवर महाराष्ट्रात बैठकीची लावणी निर्माण झाली. बावनखणीत अवतरलेल्या या लावणीयुगाचं वर्णन दिवंगत संगीतसमीक्षक अशोक रानडे यांनी आपल्या संगीतविचारया पुस्तकात विचक्षणपणे केलं आहे. ते लिहितात- लावणीचा उगम जरी १५६० पर्यंत मागे जात असला, तरी उत्तर पेशवाईत लावणी भरभराटली. त्याला होनाजीने लावणीत घडवून आणलेला तांत्रिक व कलात्म बदल कारणीभूत ठरला. हा बदल पुढीलप्रमाणे नोंदवता येईल. होनाजीने ढाल्या स्वरात गाण्याची ढब स्वीकारली. गाण्याची लय ठाय केली. आश्रयदात्याच्या इच्छेनुसार होनाजीने राग-तालांत लावण्या बांधायला सुरुवात केली. लावणीगायनाकरता लय-ताल साथ देण्याकरता तबला वापरण्यावर होनाजीने भर दिला. लावणीगायिकेने खाली बसून लावणी सादर करण्याची प्रथा होनाजीने उचलून धरली. या व यांसारख्या इतर सर्व विशेषांनी बैठकीच्या लावणीच्या रुपास कलात्मकता प्रदान करण्यात सहाय्य केले. खेचली गेलेली लय आणि बसून गाण्याच्या प्रघातामुळे अदाकारी-ठुमरी गायकांनी प्रसृत केलेल्या गायनाबरोबरच अभिनय संभवला.

एकूण होनाजीबाळाने लावणी कलेचं रंगरूपच पालटून टाकलं. महाराष्ट्रातील गतिमा‌न लावणीला ठुमरीचा भावोत्कट साजबाज चढवला. मग ही बैठकीची लावणी, हेच पुण्यातील बावनखणीचं वैशिष्ट्य ठरली. बावनखणीतील खणाखणांत आणि दिवाणखान्यांत बैठकीच्या लावणीचेच सूर गुंजायला लागले-

अहो भाऊजी मी कोरा माल मुखी विडा लाल

नरम गोरे गाल, वर तीळ झळझळी

जशी फुलली चाफ्याची कळी गं... बाई गं

आणि वर कलावंतिणीची दिलखेचक अदा. बावनखणी नुस्ती गजबजून गेली. होनाजीसकट सारे शाहीर बाजीरावाचे आश्रित. त्यामुळे सा‍ऱ्यांनीच त्याचा अनुनय करण्यासाठी अश्लील लावणीरचना केली. पण बावनखणीतल्या कलावंतिणींनी त्यात आपल्या भावकामाने असा काही रस ओतला की, बैठकीच्या लावणीचं शास्त्रीय घराणंच निर्माण झालं. आज महाराष्ट्रात रुजलेल्या आणि अजून टिकून असलेल्या बैठकीच्या लावणीचं श्रेय बावनखणीलाच द्यायला हवं. पेशवाईच्या अस्तानंतर सारेच शाहीर देशोधडीला लागले. कुणी बडोद्याला गेलं, कुणी ग्वाल्हेर-इंदुर संस्थान जवळ केलं. पेशवाईनंतर पुणं असं सांस्कृतिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेलं असताना फक्त बावनखणीतल्या बायांनीच नानासाहेब पेशवांच्या काळात पुण्यात रुजलेली सांगीतिक मुळं घट्ट पकडून ठेवली.

म्हणूनच बावनखणी म्हणजे एक कलासंस्कृतीच! आणि ती कलासंस्कृती असल्यामुळेच पेशवाई बुडाल्यावर ब्रिटिश अंमल सुरू झाला तरी, बावनखणीची मिजास कमी झाली नाही. संस्कृतीचे ठेकेदार म्हणवणा‍ऱ्यांनी तिला नावं ठेवली. प्रसंगी नाकंही मुरडली. पुणे शहराचे वर्णनपुस्तकात, बावनखणी कुणी वसवली याचं वर्णन करणा‍ऱ्या नारायण विष्णू जोशी यांनीच या वस्तीला दुगाण्या देण्याचंही काम केलं आहे. ते म्हणतात-शुक्रवारपेठेत दोन रस्ते आहेत. त्यात एक मुख्य रस्ता बावनखणीचा. मागे ज्या बावनखणीविषयी सांगितले आहे, तिजविषयी येथे थोडे लिहिले पाहिजे. ज्या सभ्य खासगीवाल्याने कसबिणींची सोय करून दिली, त्याने सर्वथैव वाईट केले. ह्या भ्रष्ट बायकांची अशी सोय केल्याने दुस‍ऱ्या बायकांस त्याप्रमाणे होण्यास उत्तेजन आले. पूर्वी पो‍ऱ्यांचे तमाशे रस्त्यांत होत, तेणे करून जसा लोकांस त्रास होत होता, तसा किंबहुना त्याहून अधिक ह्या बावन्नखणींकडून होतो, असे म्हणण्यास चिंता नाही.या नाटकशाळांकडे पाहून मुले बिघडतात. त्यांच्या नादी लागतात. येणेकडून पुष्कळ वाईट परिणाम होतात.

नारायण विष्णू जोशी यांनी आणि त्यांच्याप्रमाणे अनेकांनी या बावनखणीला नावं ठेवली. पण बावनखणी आपलं काम चोख बजावत राहिली. इतरांच्या भोगांनी प्रसंगी स्वतः भ्रष्ट होत संस्कृतीवहन करत राहिली. ती नुस्तीच बाजारबसवी नव्हती. तिच्या ठायी तसं घेण्याजोगं काही नसतं, तर भालाकार भोपटकरांपासून कृष्णशास्त्री चिपळूणकरांपर्यंत अनेकांनी बावनखणीचे उंबरठे झिजवले नसते. मुख्य म्हणजे ग. त्र्यं. माडखोलकर यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकानेही यासंदर्भात पुण्याच्या रंगेलपणालाच जबाबदार धरलं आहे. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं छोटेखानी चरित्र लिहिलं आहे. त्यात तत्कालीन पुण्याचं वर्णन करताना माडखोलकर म्हणतात- शास्त्रीबुवांच्या वेळचे पुणे जसे रसिकतेबद्दल तसेच रंगेलपणाबद्दलही विख्यात होते. रावबाजीचे राज्य जरी पुण्यातून गेले, तरी त्याचा रंगेलपणा मात्र मागे राहिला. पुण्यातील सामान्य लोक आणि सुशिक्षित यांच्यात हा रंगेलपणा जवळजवळ सारख्याच प्रमाणात वसत होता. रात्रीच्या वेळी हातात फुलांचे गजरे घेऊन, मशालींच्या झगझगीत प्रकाशात प्रियाराधनार्थ बाहेर पडणे, हे त्यावेळी कमीपणाचे समजले जात नसे. तत्कालीन सुशिक्षितांप्रमाणेच कृष्णशास्त्री चिपळूणकर हेही रसिक तसेच रंगेलही होते. शास्त्रीबुवांचे एक स्नेही आणि शिक्षणव्यवसायातील पहिले वरिष्ठ बाबा गोखले यांची अशी गोष्ट सांगतात की, त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केव्हा केव्हा आपल्या या गुरुला त्याच्या प्रेमपात्राच्या महालातून आणायला जावं लागत असे.

या उदाहरणांवरुन बावनखणीला दोष देण्यात किती अर्थ आहे, ते जाणकारांना कळेलच. अर्थात मीनाबाजार काय किंवा बावनखणी काय, नाच-गाणं म्हटलं की तिथे शौकीन रसिकांची चहलपहल असणारच. मग पुढे त्यातून उद्भवणा‍‍ऱ्या परिस्थितीसाठी केवळ बावनखणीला दोष देण्यात काय अर्थ? उलट बावनखणीने जेवढं धरून ठेवता येईल तेवढं गाणं धरून ठेवलं. प्रसिद्ध गायिका बाई सुंदराबाई यांचा दिवाणखाना बावनखणीतच होता. या सुंदराबाईंना प्रसिद्ध गायकनट बालगंधर्व बहीण मानायचे. तसंच पं. भास्करबुवा बखले नियमितपणे सुंदराबाईंकडे त्यांच्या लावण्या ऐकायला यायचे. त्यांच्या लावण्यांच्या चालींवरूनच त्यांनी संगीत मानापमान नाटकातील पदांना चाली लावल्या आहेत. एवढंच नव्हेतर पंढरपूरच्या उत्पात मंडळींनी जपलेल्या बैठकीच्या लावणीच्या अस्सल चीजांचा स्रोत बावनखणीच आहे.

पेशवाईत जन्माला आलेली बावनखणीतली ही नृत्य-संगीतपरंपरा १९६०-६५ पर्यंत कायम होती. कौसल्याबाई कोपरगावकर, गोदावरीबाई पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर या लावण्यखणींचे दिवाणखाने याच बावनखणीत होते. तबला आणि सारंगीच्या साथीने रोज संध्याकाळी त्यांची बैठकीची तेजपुंज लावणी उगवत होती आणि चंद्राच्या साक्षीनेच मावळत होती. नामांकित तबलिये आणि सतारिये या बायांच्या साथीला दिमाखात बसत होते. प्रसिद्ध दिवंगत संगीतकार दत्ता डावजेकर यांचे वडील गोदावरीबाई पुणेकर यांच्या बैठकीत त्यांना तबल्याची साथ करायचे. खुद्द डावजेकरांनीही लहानपणी भामाबाई पंढरपूरकरांना तबल्याची साथ केली होती.

या अर्थाने बावनखणी संस्कृतीची खाणच होती. यादव काळानंतर तुटलेला महाराष्ट्रातला संगीताचा दुवा जोडून ठेवण्याचं काम खरंतर बावनखणीनेच केलं. पार अगदी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर उत्तर भारतात संगीताचं शिक्षण घेऊन परत महाराष्ट्रात येईपर्यंत. बाळकृष्णबुवा ख्यालगायकीचं शिक्षण घेऊन आले आणि त्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. पण म्हणून बावनखणीला बोल लावण्याचं काम नाही. बानवखणीने मराठी मातीत संगीताची धुगधुग जागती ठेवण्याचं काम नक्कीच केलं. म्हणून तर वामनराव देशपांडे म्हणतात- दुस‍ऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत लावणीगायनाचा उत्कर्ष झाला. पोवाडे रचणारे शाहीर आणि लावण्यांचे अनेक प्रतिभावंत रचनाकार यावेळी निर्माण झाले. पोवाड्यांच्या सुबोध, पण रांगड्या भाषेला अनुसरून लावलेल्या साध्या चालीला खास गायकीत प्रवेश मिळाला नाही. मात्र लावणी या महाराष्ट्राचे वैशिष्ट्य ठरलेल्या गानप्रकारात माफक प्रमाणात का होईना, रागदारीचा समावेश होऊ शकला.

वामनरावांसारख्या संगीताच्या जाणकाराने ही पावती दिल्यावर तर, बैठकीची लावणी आणि तिला तगवणा‍ऱ्या बावनखणीकडे कुणी नजर उचलून पाहण्याचंही कारण नाही. बैठकीची लावणी ही बावनखणीने उभ्या महाराष्ट्राला दिलेली सांस्कृतिक-सांग‌ीतिक देणगी आहे.

कालौघात माणसं-संस्था काळाच्या पडद्याआड जातात. तसे बावनखणीचेही बुरुज ढासळले. तिच्या आश्रयाला असलेले कलावंत आपल्या प्रतिभेची झलक दाखवत गावोगाव पांगले. मग ज्यांच्याकडे कला नव्हती, अशांनी या पडक्या बुरुजांचा आधार घेतला. त्यांच्याकडे कला नव्हती, तरी शरीर होतं. मग तेच त्यांचं भांडवल झालं. हेही कुणी हौसेने नसेलच करत. पण त्यामुळे बावनखणी मात्र पार बदनाम झाली...

... इतकी की तिच्या आत आता उगवतच नाही, सर्जनाचं एखादं गाणं, एखादं नृत्य. मग उगाचच तिचा शोध घेत फिरावं लागतं. तरीही लागत नाहीच ती हाती. शोधणा‍ऱ्यालाच व्हावं लागतं मग बावनखणी आणि काढावं लागतं तिला पुन्हा बाहेर भूतकाळाच्या गर्भातून... उद्याच्या कलेचं बीजारोपण करण्यासाठी!
(महाराष्ट्र टाइम्सच्या २०१३च्या दिवाळी अंकातील माझा लेख)