गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

महाराष्ट्रपुरुष





भारतीय उपखंडातील भाषा, ग्रंथ, इतिहास आणि संस्कृती या संदर्भातील अभ्यासाला ‘भारत विद्या’ (Indology) असं संबोधन वापरलं जातं. किंबहुना ती एक वेगळी आणि स्वतंत्र अशी ज्ञानशाखाच मानली जाते. या ‘भारत विद्या’च्या धर्तीवर जर ‘महाराष्ट्र विद्या’ची संकल्पना कुणी मांडली, तर या ज्ञानशाखेचं आद्यत्व मात्र निसंशय रामचंद्र चिंतामण ढेरे उपाख्य रा. चिं. ढेरे यांना द्यावं लागेल. कारण रा. चिं. ढेरे यांनी महाराष्ट्राच्या मातीचं जेवढं उत्खनन-संशोधन केलं, तेवढं क्वचितच कुणी केलं असेल. अर्थात त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल मतभेद असतील, नव्हे आहेतच. पण ते बाजूला ठेवूनही ढेरे यांच्या कामाचं मूल्यमापन करायचं ठरवलं, तर महाराष्ट्र-संस्कृतीच्या संदर्भात त्यांच्याइतकं मोलाचं काम गेल्या शतकात तरी दुसऱया कुणी केलेलं फारसं आढळत नाही. त्या अर्थाने ते इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचेच उत्तराधिकारी ठरतात. राजवाडे यांनी ज्याप्रमाणे आपल्या संशोधनासाठी महाराष्ट्र पिंजून काढला, त्याचप्रमाणे ढेरे यांनीही अगदी निष्कांचन अवस्थेतही महाराष्ट्रच नव्हे, तर दक्षिण भारतही पिंजून काढला. कारण महाराष्ट्राच्या मातीवर दृश्य प्रभाव उत्तर भारताचा असला, तरी तिची मुळं मात्र दक्षिणी संस्कृतीत खोलवर रुजलीत, अशी त्यांची धारणा होती. कारण भाषेनुसार राज्या-राज्यांच्या सीमा आज बांधल्या गेल्यात. पण सांस्कृतिक एकात्मतेला कधीच सीमा नसते, असं ढेरे यांचं म्हणणं होतं. या न्यायाने कला-संस्कृतीचा शोध घेत ते दक्षिण भारताच्या सीमा लांघत गेले. मात्र त्यांच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी कायम महाराष्ट्र होता. त्या अर्थाने ते महाराष्ट्रपुरुष होते.
महाराष्ट्राची भूमी किती वेगवेगळ्या अंगांनी उकरावी किंवा उकरता येते, याचं रा. चिं. ढेरे हे अस्सल उदाहरण. त्यांनी वेगवेगळ्या चश्म्यांतून महाराष्ट्राकडे पाहिलं. धर्म, इतिहास, लोकपरंपरा, दैवतविज्ञान, मानवशास्त्र अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांचं बळ उभं करून त्यांनी महाराष्ट्रभूमी खणली. या उत्खननांत हाताशी आलेलं सारंच धन अमूल्य होतं - श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, खंडोबा, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, करवीरनिवासिनी महालक्ष्मी, शिखर शिंगणापूरचा शंभुमहादेव... किती नावं घ्यावीत? पण ही झाली निव्वळ लोकदैवतं. या दैवतांनी महाराष्ट्राचा गाभारा उजळून टाकला आहे. तेव्हा त्यांचा शोध घेणं ढेरे यांना महत्त्वाचं वाटणं साहजिकच होतं. पण त्या पलीकडेही ढेरे यांनी पुष्कळ काम केलं आहे. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, लोकदैवतांचे विश्व, लोकसंस्कृतीचे उपासक, भारतीय रंगभूमीच्या शोधात, संतसाहित्य आणि लोकसाहित्य, कल्पद्रुमाचिये तळी... अशी शंभरहून अधिक त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. मात्र या साऱयाचा गाभा महाराष्ट्राचा संस्कृतिशोध हाच राहिलेला आहे.
ढेरे यांचा महाराष्ट्राचा हा संस्कृतिशोध सुखेनैव चालला असं मात्र नाही. किंबहुना या अभ्यासात आणि संशोधनात जुन्याजाणत्यांनी आणि संस्कृतीच्या  तथाकथित ठेकेदारांनी विघ्न आणण्याचंच काम केलं आणि त्याची कैक उदाहरणं देता येतील. विठ्ठल हे आज हरिहरैक्याचं उत्तम उदाहरण मानलं जात असलं, तरी त्याच्यावर मोठा प्रभाव आहे तो वैष्णवधर्माचा. साहजिकच विठोबा म्हणजे विष्णू-कृष्णाचं रूप ही धारणा महाराष्ट्रात चांगलीच बळावलेली आहे. परंतु विठोबा हा वैदिककालीन देव नसून ते गोपालक लोकसमूहांतून उन्नत पावलेलं रूप आहे, अशी ढेरे यांनी मांडणी करताच वारकरीच नाही तर, संतसाहित्याचे अभ्यासकही चिडले. कारण आपल्या इथे देवता या फक्त धर्मकारणाशी संबंधित नाहीत, त्यांचा अर्थकारणाशीही मोठा संबंध आहे आणि जेव्हा एखाद्या देवतेच्या मूळ रूपाची चर्चा होते, तेव्हा भक्तांमधील तिच्या श्रद्धास्थानाला बाधा पोचून तिचे माहात्म्य उणावण्याची शक्यता असते. परिणामी तिच्या निमित्ताने होणाऱया आर्थिक उलाढालीलाही धक्का पोहोचण्याचा संभव असतो. त्यामुळे ढेरे यांनी लिहिलेल्या श्रीविठ्ठल : एक महासमन्वय या ग्रंथाला विरोध होण्यामागे अशी अनेक सामाजिक-सांस्कृतिक कारणं होती.
असंच कारण लज्जागौरीच्या विरोधामागेही होतं. खरंतर लज्जागौरी ही ढेरे यांनीच म्हटल्याप्रमाणे मातृदेवी आहे, महामाता आहे. विश्वसर्जनाची माता म्हणून साऱया भारतात तिची उपासना वेदपूर्व काळापासून चालू होती. ही सर्जनाची देवता असल्यामुळे तिची पूजाही सर्जनेंद्रियाच्या रूपातच केली जात होती. अशा या महामातेचा शोध ढेरे यांनी तिच्या सर्जनेंद्रियाच्या स्वरूपात आढळणाऱया मूर्तीच्याच माध्यमातून घेतला. हा शोध घेणं एका पुरुषासाठी सोपं काम नव्हतं. कारण लज्जागौरीचा शोध घेणं म्हणजे एकप्रकारे मातेच्या गर्भगृहाशी उभं राहून मातृत्वाचे रहस्य आकळण्याचीच इच्छा बाळगणं. पण अतिशय अवघड असतानाही ढेरे यांनी हे संशोधन मातृतत्त्वाविषयी अथांग श्रद्धा मनाशी-बुद्धीशी बाळगून केलं. त्यामुळेच लज्जागौरी पुस्तक वाचताना कुठेही त्यांची लेखणी श्लील-अश्लीलतेच्या काठावरही उभी राहिलेली नाही. उलट ते पुस्तक वाचताना मातृतत्त्वाचा अतिशय उत्कट असा प्रातिभ आविष्कार पाहायला मिळतो आणि वाचकाची दृष्टीही सर्जनाचे महाद्वार असलेल्या योनीमुखाशी, मातेच्या गर्भगृहाशी नतमस्तक होते. असं असताना तथाकथित संस्कृतिरक्षकांना तिथेही अश्लीलता आढळली आणि त्यांनी लज्जागौरी या पुस्तकाच्या नि ढेरेंच्या विरोधात बोंब ठोकली. ढेरे यांनी अक्षरांचा नाइटक्लब सुरू केलाय, अशी बदनामी सुरू केली. परिणामी लज्जागौरी हे चावट पुस्तक असल्याचा समज होऊन अनेक पुस्तकविक्रेत्यांनी ते पुस्तक तेव्हा चक्क पिवळ्या वेष्टणात गुंडाळून विकलं. परंतु लज्जागौरीला होणारा हा विरोध म्हणजे संस्कृतिरक्षकांचा तेव्हाही दांभिकपणा होता आणि आताही दांभिकपणाच आहे. एकीकडे स्त्रीला मातृशक्ती म्हणून नावाजायचं आणि दुसरीकडे तिच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार तेव्हाही होता  आणि आताही आहे. लज्जागौरी ही एकप्रकारे स्त्रीच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, उभ्या विश्वाच्या सर्जनाचं प्रतीक आहे. पण तिच्या या रूपाचीच संस्कृतिरक्षकांना लाज वाटली. आपल्या मातृगर्भाचीच लाज वाटली. परिणामी त्यांनी या लज्जागौरी नष्ट तरी केल्या किंवा त्यांचं रुपडं तरी बदलून टाकलं. ढेरे यांनी आपल्या संशोधनातून अशा काही लज्जागौरी उघडकीला आणल्या. परंतु अंबाजोगाईची योगेश्वरी किंवा माहुरची रेणुका या आजही आपल्या मूळ रूपाच्या प्रतीक्षेत आहेत. अन्यथा परंपरावाद्यांनी शेंदूर फासून फासून मूळ लज्जागौरी असलेल्या या मूर्तींना मुखवट्याचा तांदळा चढवलेलाच आहे आणि त्यांच्या योनिमुखांना सहस्रविडा खाणारं मुख केलेलंच आहे. पण ढेरे यांनी सर्जनेंद्रियांच्या स्वरूपात असलेल्या मातृरूपाचा शोध घेतल्यामुळे आज आपल्याला किमान लज्जागौरींचा थांग तरी लागतो.
जी गत विठोबा, लज्जागौरीची, तीच शिखर शिंगणापूरच्या महादेवाचीही. ढेरे यांनी आपल्या संशोधनातून देवदेवतांचं मूळ रूप उघडं करायचं आणि परंपरावाद्यांनी त्याला विरोध करायचा, हे ठरूनच गेलेलं. साताऱयाजवळचा शिखर शिंगणापूरचा महादेव हे भोसल्यांचं कुलदैवत. या देवतेचा मागोवा घेताना, ढेरे यांनी शिवाजी महाराजांच्याही कुळ-वंशपरंपरेचा मागोवा घेतला. आजतागायतचा इतिहास आपल्याला असं सांगतो की, शिवाजी महाराजांचा वंश थेट उदयपूरच्या शिसोदिया वंशाला जाऊन मिळतो. पण प्रत्यक्षात ढेरे यांनी केलेल्या मांडणीनुसार शिवाजी महाराजांचा वंश हा अस्सल दक्षिणी होता आणि त्याचा संबंध दक्षिणेतील प्रसिद्ध होयसळ राजवंशाशी होता. या संशोधनात ढेरे यांनी शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्ट वगैरे मंडळींनी शिवरायांची खोटी कुंडली कशी तयार केली, याचे अनेक पुरावे दिलेले आहेत. मुळात राज्याभिषेकासाठी ती व्यक्ती क्षत्रियच पाहिजे असा आग्रह का? एखादी कर्तृत्ववान व्यक्ती स्वबळावर राजेपदाला पोचू शकत नाही का? असे प्रश्नही त्यांनी निर्माण केले आहेत. साहजिकच त्यामुळे शिखर शिंगणापूरचा महादेव हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु ढेरे पुराव्याशिवाय काहीच बोलत नसल्यामुळे याचा नंतर फार गाजावाजा झाला नाही. कदाचित ज्यांचा स्वार्थ होता, त्यांनी तो वाढवला नाही. कारण संशोधनात्मक पुस्तक वाचणाऱयांची तशीही कमीच असते. त्यामुळे त्यांनी वाद न करता झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवणंच पसंत केलं.
रा. चिं. ढेरे यांच्या एकूणच देवतासंशोधनाच्या अभ्यासात, ‘उच्च समाजाने लोकदेवतांचं केलेलं सांस्कृतिक उन्नयन’ हा महत्त्वाचा मुद्दा असलेला दिसतो. लोकदेवतांच्या सांस्कृतिक उन्नयनासंबंधी (Culturalization) त्यांनी केलेली मांडणी ही महाराष्ट्राच्या (कदाचित भारताच्याही) पातळीवर तरी पहिल्यांदाच केली गेली. प्रत्येक जनसमूहाच्या आपापल्या म्हणून देवता असतात. या देवता या अनेकदा त्या-त्या समाजात होऊन गेलेल्या लोकोत्तर व्यक्ती असतात, त्यांनाच त्यांच्या मृत्यूनंतर देवत्व लाभतं अशी मांडणी दुर्गा भागवत यांनी करून ठेवली आहे. पण लोकोत्तर व्यक्तींमधून देवत्वपदाला पोचलेल्या या देवतांचं पुढे काय होतं, त्याची मांडणी ढेरे यांनी केली आहे. कधी-कधी त्या-त्या समूहापुरत्या मर्यादित असलेल्या एखाद्या लोकदेवतेची लोकप्रियता हळूहळू वाढत जाते. क्वचित त्या लोकदेवतांची लोकप्रियता एवढी वाढते की त्यांची दखल त्या-त्या काळातील उच्च समाजालाही घ्यावी लागते. कारण या लोकप्रियतेमुळे परंपरावाद्यांच्या वैदिक देवतांना धक्का पोचण्याचा संभव असतो. अशा वेळी वैदिक परंपरांचे ठेकेदार काय करतात, तर लोकमानसातील या लोकदेवतांना हळूच आपल्या गोटात घेतात. मग त्या लोकदेवतेची एखादी स्थानपोथी-स्थळपोथी तयार करून ही लोकदेवता म्हणजे अमुक एखाद्या वैदिक देवतेचा अवतार असल्याच्या आख्यायिका लिहितात. याच आख्यायिका मग हळूहळू जनमानसात प्रसृत होत राहिल्या की कालांतराने त्या लोकदेवतांचं वैदिकीकरण होतं. विठोबा आज संपूर्ण महाराष्ट्राचं उपास्य दैवत झाला आहे, तो त्यामुळेच. कारण त्याचं वैष्णवीकरण  करण्यात आलं आहे. ढेरे यांनी केलेल्या या प्रकारच्या मांडणीमुळेच आज लोकमानसात स्थान मिळवून बसलेल्या विठोबा, खंडोबा, तुळजाभवानी किंवा महालक्ष्मी या देवतांचं मूळ रूप काय होतं, ते समाजासमोर आलं. तुळजाभवानी-महालक्ष्मी या मातृदेवता कशा होत्या आणि विठोबा-खंडोबा हे दक्षिणेतील भटक्या समूहांचे लोकदेव कसे होते, ते त्यांनी साधार सिद्ध केलं आहे. लोकदेवतांच्या सांस्कृतिक उन्नयनासंबंधी त्यांनी केलेल्या मांडणीच्या आधारे महाराष्ट्रातील बहुतेक देवतांचं मूळ आणि कूळ सिद्ध करता येऊ शकतं.
परंतु कधी कधी परंपरावाद्यांचे प्रयत्न पूर्ण सफल होतातच असं नाही. क्वचित ही उन्नयन प्रक्रिया अर्धवटही राहते. ढेरे यांनी तेही विठोबा आणि खंडोबाच्या संदर्भात सुरेख स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात विठोबा हे सफल उन्नयन प्रक्रियेचं उदाहरण आहे, तर खंडोबा हे अर्धसफल. कसं? तर आज विठोबासंबंधीचे सगळे कुळाचार-कुलविधी आणि पूजा वगैरे सारं काही वैदिक पद्धतीने होतं. विठोबाच्या उपासनेत त्याच्या मूळ लोकदैवत रूपाचे काहीच अंश शिल्लक राहिलेले दिसत नाहीत. याउलट खंडोबा ही देवता आज महाराष्ट्रातील बहुतेक समाजांची कुलदेवता असली, तरी तिच्या उपासनेचं-पूजाअर्चेचं वैदिकीकरण होता-होता राहिलं. त्यामुळेच भंडारा भरणे, तळी उचलणे, बगाड लावणे, मांडीला हूक टोचून घेणे यांसारखे मूळ उपासनेतील काही विधी आजही शिल्लक राहिलेले दिसतात. जर खंडोबाचं सांस्कृतिक उन्नयन पूर्ण झालं असतं, तर त्याच्या आजच्या या उपासनांचं नामोनिशाणही मागे उरलं नसतं. तेव्हा लोकदेवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची ही प्रक्रिया सांगून ढेरे यांनी मोठंच काम केलं आहे.
महाराष्ट्रातील विविध देवतांचा शोध घेताना ढेरे यांनी त्या-त्या देवतांची स्थळपोथी आणि त्या देवतांसंबंधी समाजात प्रचलित असलेल्या कथा-गीतं महत्त्वाची मानली आहेत. पण त्यामुळेच अनेक संशोधकांचा त्यांच्यावर रोषही आहे. कारण कुठल्याही संशोधन प्रक्रियेत स्थळपोथी किंवा कथा-गीतं ही एकप्रकारे भ्रांत (म्हणजे खोटी) साधनं मानली जातात. परंतु काटेकोर इतिहासलेखनाच्या दृष्टीने स्थळपोथी किंवा कथा-गीतं ही एकप्रकारे दुय्यम अभ्याससाधनं असली, तरी दैवतशास्त्राच्या अभ्यासात त्यांना अलक्षित ठेवून चालत नाही. कारण कुठल्याही देवतेची वाढ ही समाजमनातील तिच्या धार्मिक अधिष्ठानावरच होत असते. त्यामुळे समाजमनातील त्या-त्या देवतेच्या संदर्भातील हे ‘भाव’बळच कथा-गीतांत उतरत असतं. परिणामी त्यांचा मागोवा घेतला की, देवतांच्या प्रवासाचाही थांग लागतो. स्थळपोथीचंही तसंच आहे. सांस्कृतिक उन्नयन प्रक्रियेतील स्थळपोथी हा पहिला टप्पा असतो. साहजिकच या पोथ्यांत त्या-त्या देवतांचे काही मूळ अवशेष शिल्लक राहिलेले असतात, ज्यांच्या आधारे त्या देवतांची विकासप्रक्रिया अधोरेखित करता येते.
विविध लोकदेवतांची स्पष्ट केलेली सांस्कृतिक विकसनप्रक्रिया हे ढेरे यांचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम आहे. त्यांनी एकप्रकारे महाराष्ट्राच्या गाभाऱयाचीच पुनर्मांडणी केली. त्यात त्यांनी ती अतिशय काव्यात्मक पद्धतीने केली आहे. अन्यथा संशोधनात्मक लेखन म्हणजे क्लिष्ट, जड, रूक्ष असाच सगळ्यांचा समज असतो. पण ढेरे यांनी तो मोडून काढला. त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध आराध्य देवतांची प्रातिभ भाषेत केलेली मांडणी अभ्यासकांच्या बुद्धीलाही चालना देते आणि सर्वसामान्य वाचकांनाही सुखावते. ढेरे यांनी लोकदेवतांचा मागोवा घेत असतानाच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचाही मागोवा घेतला. किंबहुना लोकदेवतांच्या विकसन प्रक्रियेचाच सतत विचार करत असल्यामुळे त्यांना लोकसंस्कृतीचा वेध घेणंही सोपं गेलं. कारण पूर्वापार चालत आलेली लोकसंस्कृती देव-धर्म आणि त्यावरील श्रद्धेच्या अधिष्ठानावरच टिकून असते. त्यामुळे त्या-त्या लोकदेवतांच्या वाघ्या-मुरळी, गोंधळी, आराधी-भराडी, वासुदेव-भुत्ये यांसारख्या असंख्य उपासकांच्या माध्यमांतून जे-जे हाती लागलं, त्याचं ढेरे यांनी सोनं केलं. कारण त्या केवळ लोकपरंपरा नव्हत्या, तर त्या साऱया अभिजन कलापरंपरेला समांतर किंबहुना त्याही आधीपासून चालत आलेल्या बहुजन समाजाच्या कलापरंपरा होत्या. त्यामुळेच ‘लोकसंस्कृतीचे उपासक’ किंवा ‘भारतीय लोकरंगभूमी’ ही ढेरे यांची पुस्तकं वाचताना आपल्याला केवळ लोकदेवतांसंबंधितच कळतं असं नाही, तर एक ठसठशीत अशी कलापरंपराही ज्ञात होते. कारण आज समाजात सादर केल्या जाणाऱया लोककला, या मूळ बहुजन समाजाच्या देवतांच्या पूजाविधीतील विधी-विधानंच आहेत.
महाराष्ट्राचा लोकसांस्कृतिक दस्तावेज ढेरे यांनी अशा पद्धतीने उजळून काढला आहे. लोकसंस्कृतीतील असं क्वचितच कुठलं क्षेत्र असेल, जे ढेरे यांनी नांगरायचं बाकी ठेवलं असेल. अन्यथा ओवीपासून शिवीपर्यंत आणि गोंधळापासून दक्षिणेतील कुरवंजीपर्यंत बहुतेक कलापरंपरा आणि लोकपरंपरांचं त्यांनी उत्खनन केलं आहे... आणि तरीही लोकसंस्कृतीची कितीतरी ठाणी अद्याप अस्पर्शित आहेत, असं त्यांचं स्वतचं म्हणणं होतं. त्याबाबतीत त्यांनी जणू केशवसुतांचाच आदर्श ठेवला होता -
नांगरल्याविण भुई बरी
असे कितितरी! पण शेतकरी
सनदी तेथें कोण वदा?
हजारांतुनी एकादा!
तरी न तेथुनि वनमाला
आणायाला। अटक तुम्हांला;
मात्र गात हा मंत्र चला-
‘झपूर्झा! गडे झपूर्झा!’
केशवसुतांनी वर्णिलेली ही झपुर्झा अवस्था म्हणजे एक भावावस्थाच होती. त्या भावावस्थेत शिरल्याशिवाय काही म्हणजे काही आकळत नाहीत, स्फुरत नाही आणि सुचतही नाही. रा. चिं. ढेरे अखंड महाराष्ट्रभावात डुंबलेले होते. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचं लोकप्रातिभ दर्शन घडलं आणि त्यांनी ते आपल्यालाही घडवलं...
(मुक्त शब्द,  ऑगस्ट २०१६ )