सोमवार, ८ मे, २०१७

विहिरीच्या खोल तळाशी...


विहीर मला कायम थेट पाताळात उतरण्याची शिडी वाटत आलीय. तिच्यात डोकावलं की वाटतं, हिच्यात बुडी मारली तर आपण थेट जाऊ पृथ्वीच्या तळाशी. जिथे भरुन राहिलेला असेल आदिम काळोख. सृष्टीच्या निर्माणाच्या क्षणी असलेला सर्जनशील काळोख. एकाच वेळी भयकारी आणि शुभंकर काळोख...                  ('नवे-गांव आंदोलन' मासिकाच्या मे महिन्याच्या विहीर विशेषांकात छापून आलेला माझा लेख...)


मला पाण्यात डोकावायला खूप आवडतं. पण अथांग पसरलेल्या समुद्राच्या पाण्यात नाही, नदीच्या प्रवाही पाण्यात नाही, आणि तलावाच्या साठवलेल्या पाण्यातही नाही. मला आवडतं किर्रर्र जंगलातल्या, एखाद्या आडोशाच्या विहिरीतील कभिन्न काळ्या पाण्यात डोकावायला. त्यात डोकावताना खरंतर मनात प्रचंड भीती असते, आपण डोकावायला गेलो आणि आत पडलो तर... आजूबाजूला कुणीच नसेल आणि त्या विहिरीच्या पाण्यातच बुडून आपण मेलो तर... पण तरीही विहिरीत डोकावून पाहण्याचं औत्सुक्य मात करतं, मनातील या भीतीवर... आणि सोबत कुणी असो वा नसो, रानावनांत-गावात-वाड्या-पाड्यात कुठेही विहीर दिसली की मी हटकून डोकावतो त्या विहिरीत. त्या विहिरीचा आणि तिच्यात साठवलेल्या युगानुयुगाच्या भूतकाळाचा अदमास घ्यायला...
विहिरींच्या खोलीचा कितीही अंदाज असला, तरी विहीर मला कायम थेट पाताळात उतरण्याची शिडी वाटत आलीय. तिच्यात डोकावलं की वाटतं, हिच्यात बुडी मारली तर आपण थेट जाऊ पृथ्वीच्या तळाशी. जिथे भरुन राहिलेला असेल आदिम काळोख. सृष्टीच्या निर्माणाच्या क्षणी असलेला सर्जनशील काळोख. एकाच वेळी भयकारी आणि शुभंकर काळोख.
विहिरीत डोकावत असताना अशा मी कितीदा तरी डुबक्या मारल्यात, मनाशीच. नि गेलोय खोल खोल विहिरीत आत आत. जिथे नुस्तं पाण्याचं मधाळ मोहोळ असतं. जड पाणी. शरीरापेक्षा जड. या पाण्याचा वेढाच पडतो असा, ज्याच्या स्पर्श असतो सुस्तावलेल्या अजगरासारखा थंडगार. तो थंडपणा आधी रोमारोमांत शिरुन  जिवाला सुखावतो. पण हळूहळू तो थंडपणा असह्य होतो. थंडपणाच नाही, विहिरीतला काळोखही. कारण डोळ्यांत बोटं खुपसली तरी दिसत नाही, या पाण्यात काही. मग भीतीची-वेदनेची एकच लहर थरारुन जाते शरीरात. अन् अचानक नाका-तोंडात पाणी जाऊन जीव घुसमटायला लागतो. कधी एकदा पण्याबाहेर येऊन मोकळा श्वास घेतोय, यासाठी जीव आसुसतो... पण तरीही नवी विहीर दिसली की पुन्हा तीत डुबकी मारण्याची ओढ काही कमी होत नाही.
... पहिली विहीर पाहिली होती आमच्या गावचीच, आईचा हात धरुन. पाचेक वर्षांचा असेन तेव्हा. इतस्ततः निखळून पडलेले चिरे आणि मोडलेलं रहाटगाडगं बघताना आधीच तिची उध्वस्तता अंगावर आली होती. विहिरीत हळूच डोकावून पाहिल्यावर तर अंगावर सरकन् काटाच आला. विहिरीवर डोकावलेल्या झाडाची गडद सावली विहिरीतल्या पाण्यावर पडली होती. मुळातच काळं असलेलं पाणी त्यामुळे काळं-निळं-जांभळं दिसत होतं. भरपूर जांभळं खाल्ल्यावर काळी-निळी पडलेली जीभ एखाद्याने हातभर लांब बाहेर काढावी आणि ती आपल्याला आता ओढून आत घेणार असं वाटावं, तसं तत्क्षणी वाटलं होतं. मी घाबरुन आईला बिलगलो होतो. अन् तरीही पुन्हा एकदा तिचा हात घट्ट धरुन विहिरीत डोकावलो. मला विहिरीतल्या त्या काळ्या-निळ्या पाण्याची भुरळ पडली होती.
त्यानंतर जेव्हा जेव्हा गावी गेलो, तेव्हा तेव्हा त्या विहिरीत डोकावलो, कधी आईचा हात धरुन, तर कधी गावालाच राहणाऱ्या बहिणीचा. प्रत्येक  वेळी ती विहीर मला अधिक भकास वाटायची आणि त्यातलं पाणी अधिकाधिक गहिरं, काळं-निळं. पण ओढ तीच पहिल्या वेळेची. पाण्याला कवटाळण्याची.
दुसरी विहीरही आईनेच दाखवलेली. तिच्या माहेरची. आकाराने मोठी नि निवळशंख पाण्याची. उघड्या माळरानावर असल्यामुळे कुठल्याच झाडाची सावली तिच्यावर पडलेली नसायची. अन् तरीही तिचा तळ मात्र दिसायचा नाही. नितळ पाण्यामुळे दिवसा थेट आभाळच तिच्या तळाशी उतरलेलं असायचं. दुपारी भर मध्याह्नी तर पाणी असं चमकायचं, जणू विहिरीच्या तळाशी रत्नांच्या राशीच पडल्यात. त्यातच तो एक मासा फिरायचा म्हणे, नाकात मोती असलेला. सहसा तो कुणाला दिसायचा नाही, पण एकदा का दिसला की, त्याचा मोहच पडायचा. मग कुणी तरी एखाद-दोन दिवसात विहिरीचा तळ जवळ करायचा. आईचा हात धरुन या विहिरीत डोकावताना आईने  खसकन् मागे ओढून घेतलं होतं. पण मी हट्टाने त्या विहिरीत पाहत राहिलो. मला तो नाकात मोती असलेला मासा पाहायचा होता. पण  तो नाहीच दिसला कधी. तेव्हाही आणि नंतरही. तरीही त्या विहिरीची ओढ मात्र कायम राहिली.
लहानपणी आई-बाबांबरोबर जाईन तिथे असलेल्या विहिरीत डोकावत राहिलो, त्यांचा तळ शोधत राहिलो. आईही त्या-त्या विहिरींच्या काहीबाही कहाण्या सांगत राहिली. कधी देवाची विहीर, कधी नाकात मोती असलेल्या माशाची विहीर, तर कधी सात आसरांचा निवास असलेली विहीर. या कहाण्यांचं गारुडच व्हायचं मनावर. मोठेपणी किंवा अजूनही कुठलीही विहीर बघताना हेच गारुड येतं दाटून... नि मग विहिरीत डोकावताना खुणावू लागतं कोण कोण आतून. जणू आवाज-हाकारे येऊ लागतात विश्वाच्या खोल तळातून. बेंबीच्या दिठीपासून कुणी तरी साद घालत असल्यासारखे.
                                                                                                                                                          एकदा तंजावरला गेलो होतो. तिथल्या रामदासी मठाचे आणि सरस्वतीमहाल ग्रंथालयातील मराठी विभागाचेही प्रमुख असलेल्या भीमराव गोस्वामी यांच्या घरी उतरलो होतो. घरी पोचल्या पोचल्या त्यांनी घरामागील परसात असलेल्या विहिरीतून पाणी काढून हातपाय धुऊन घ्यायला सांगितलं. मला वाटलं असेल नेहमीप्रमाणे आडमाप विहीर. पण जाऊन पाहतो, तर विटांनी कसबीपणे बांधून काढलेली अवघी दोन-अडीच फुटांची ती विहीर होती. हळूच विहिरीत डोकावलो, तर पाण्याचा काही थांगच लागेना. नुस्ता अंधार-अंधार आत भरुन राहिलेला. विहिरीच्या काठावर ठेवलेला पोहरा मी हळूच आत सोडला, तर तो खोल खोल जातच राहिला. मनात आलं हा बहुधा पृथ्वीच्या तळाशी जाऊनच थांबणार. खूप वेळाने बद्द असा पाण्यावर काही तरी आपटल्याचा आवाज आला. पोहऱ्याला बांधलेला दोरखंड हलवून मी तो भरल्याची खात्री केली. मग सरसर वर ओढून घेतला. त्यातलं पाणी पायावर ओतून घेतलं मात्र... थेट पृथ्वीच्या पोटातलं अमृतच अंगावर घेतल्याचा भास झाला. त्यानंतर कितीतरी वेळ पोहरा पाण्यात सोडत होतो, बाहेर काढत होतो. विहिरीत डोकावून पाहत होतो. त्या विहिरीच्या खोलीची आणि त्यातल्या खोल गूढ-गहिऱ्या पृथ्वीतत्त्वाची जणू मला भूल पडली होती.
अशीच भूल नगर जिल्ह्यातील जामगावला शिंदेसरकारच्या वाड्यातील विहिरीचीही पडली होती. प्रचंड आणि अगडबंब विहीर. नुस्तं आत डोकावण्याच्या कल्पनेनेही एखाद्याला धडकी भरेल. कारण तिचा आकारच अंगावर येतो. एरव्ही दगडांत सुरेख बांधून काढलेली ती विहीर. परंतु आत डोकावून पाहिलं, तर तिचं काळंशार पाणी नजरबंदीच करतं. तिच्यात डोकावताना मनात आलं, किती अन् काय काय दडलं असेल, हिच्या तळाशी?
खरंतर खरोखरच काय काय दडलं असेल प्रत्येकच विहिरीच्या तळाशी… कुणाचे श्वास, कुणाचे निःश्वास, कुणाचे भास, कुणाचे आभास…? आणखीही बरंच काय काय. एकेक स्तर तासत जावा जमिनीचा, तर एकेक संस्कृती दडलेली असते म्हणे प्रत्येक स्तरात. म्हणूनच कुठे स्वच्छतेसाठी जरी विहीर उपसत असले, तरी मला होतो आनंद, एखादं उत्खनन सुरू असल्यासारखा. मी जाऊन उभा राहतो त्या विहिरीजवळ. बघत राहतो, त्या विहिरीतून उपसलेला गाळ, एकटक. त्यातून काही जुने अव‍शेष मिळोत वा न मिळोत, माझ्यासाठी ती माती यत्किंचितही कमी महत्त्वाची नसते, मोहेनजोदारोहून. कारण किती तरी पिढ्या नांदून गेलेल्या असतात, हिच्याही पाण्याखालून!      
विहिरीची अशी गाढ अन् गूढ मोहिनी माझ्यावर आहे. एखादी विहीर पायवाट सोडून, कितीही आडवाटेला असली, तरी ती बघितल्याशिवाय चैन पडत नाही. सोबत असलेल्या कुणालाही घेऊन त्या विहिरीजवळ जातो. खरंतर अनेकदा या विहिरी ढासळलेल्या असतात. विहिरीचे घडीव दगडी चिरे निखळून पाण्यात पडलेले असतात. कधी काळची नांदती विहीर अगदी भयाण दिसत असते. रानातला गळलेला पालापाचोळा, व‌िहिरीच्या सांदीकोपऱ्यात आत उगवून आलेली झाडंझुडपं आणि त्यावर लटकणारी पक्ष्यांची घरटी… अशा वेळी शांतताही असह्य होते. किंबहुना शांतताच विहिरीच्या भीषणतेत अधिक भर घालते. तिथून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्यासाठी मन आक्रंदू लागतं, अन् तरीही त्या विहिरीत डोक्यावल्याशिवाय चैन पडत नाही. मग हळूच मी विहिरीत डोकावतो, आत काही दिसतंय का ते पाहत राहतो. अनेकदा दिसत तर काहीच नाही, जाणवतही काही नाही. विहिरीचा घेर-आकार-उकार काही काही कळत नाही. पण म्हणून खेप फुकट गेलीय, असं मला आजवर कधीच वाटलेलं नाही. कारण प्रत्येक विहीर, विशेषतः आडवाटेवरची नि ढासळलेली माझ्यासाठी असते, एक गर्भाशय. खूप खूप गडद काळोख आपल्या आत जपून ठेवणारी, नि तिथूनच वळवळणारं काही तरी प्रसवणारी…!           

६ टिप्पण्या:

  1. अगदी जिवाच्या तळापासून पटलं, भिडलं.

    उत्तर द्याहटवा
  2. हिची फार आठवण झाली तुमचा लेख वाचताना. बघा आवडते का - https://augusttowngirl.blogspot.in/2017/05/blog-post_46.html

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम..अलीकडे इतकी सुंदर भावनिक डूब असलेलं ललित लेखन वाचायला मिळत नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. )विहिरीच्या तळाला काय दिसू लागले? *

    उत्तर द्याहटवा