मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

सुर्व्यांच्या विद्यापीठात...

कविवर्य नारायण सुर्वे जाऊन आज सहा वर्षं झाली. त्यानिमित्ताने ते गेल्यावर त्यांच्यावर लिहिलेलं हे लेखवजा टिपण. या टिपणात वेगवेगळ्या तीन भेटींतले सुर्वे आहेत. त्या-त्या वेळी ते जे बोलले, ते पुढं कायम जसंच्या तसं लक्षात राहिलं. ते सुर्वे यांचे दृष्टान्तच होते, असं आता वाटतंय...

कुठून कुठे?


थोडे साहिलेले पाहिलेले जोखिलेले आहे
माझ्या जगाची एक गंधवेणाही त्यांत आहे
केव्हा चुकलो, मुकलो, नवे शिकलोही आहे
जसा जगत आहे मी तसाच शब्दांत आहे...

.. अठराएक वर्षापूर्वी लोकलमध्ये नारायण सुर्वेंची झालेली पहिली भेट थेट अशी होती. प्रत्यक्ष जगण्यात आणि कवितेत जराही अंतराय नसलेली. सेकंड क्लासचा डबा. कविवर्य नेमके समोर बसलेले. कुठूनसे कुठेतरी चाललेले. अंगात बिन इस्त्रीचे कपडे आणि हातात चणे-शेंगदाण्याची पुडी. चेहऱ्यावर विश्वाची चिंता. अगदी कुठल्याही सामान्य घरातले म्हणून सहज खपून जातील असे. आपल्या कवितेच्या रचनेसारखेच काहीसे ओबडधोबड. अनघड. पण म्हणूनच दिसताक्षणीच एकदम ‘आपले’ वाटणारे. या जवळिकीतूनच प्रत्यक्ष नारायण सुर्वे समोर बसलेत, याचं औत्सुक्य लपवताच येत नाही. अन् स्वत:च्याही नकळत प्रश्न बाहेर पडतो, ‘नारायण सुर्वे ना?’
मग तेही ओळखीचं हसतात. हातातली चण्याची पुडी पुढे करतात. नकळत औपचारिकतेचे सारेच संकेत गळून पडतात नि एका संवादाला सुरुवात होते. हा संवाद नारायण सुर्वे यांचं कवी म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून मोठेपण अधोरेखित करण्यासाठी पुरेसा असतो. मोठे नावाजलेले कवी असतानाही महाविद्यालायत शिकणा-या एका विद्यार्थ्यांशी ते सहज संवाद साधतात. नेहमीच्या खर्जातल्या आवाजात, पण संथ लयीत कोण-कुठचा म्हणून चौकशी करतात आणि ट्रेनमधून प्रवास करत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्यावर म्हणतात, 
‘‘आपण कुठल्या वाहनाने प्रवास करतो, 
ते महत्त्वाचं नाही बरं का; 
आपला व्यक्तिगत प्रवास 
कुठून कुठे झाला ते महत्त्वाचं! 
बस, रेल्वेचा सेकंड क्लासचा डबा 
आणि दोन पायांची गाडी, 
हेच सर्वसामान्य कष्टक-यांना परवडतं बाबा! 
मी तर बोलूनचालून त्यांचाच प्रतिनिधी... 
मग त्यांच्या-माझ्या जगण्यात 
फरक असून कसं चालेल? 
कवितेत जे बोलतो-लिहितो, 
त्याच्या विरोधात वागून कसं चालेल? 
मग माझ्या कवितेवर विश्वास कोण ठेवेल?’’ 
चणे खात गप्पा सुरू राहतात. आपलं जगणंच कविता कसं झालं, ते सांगत राहतात. मध्येच बोलता बोलता गप्पा चण्यांवरच सुरू होतात. तेव्हा ते म्हणतात,
‘‘घामाच्या पैशातून
चार आण्याची घेतलेली 
चणे-शेंगदाण्याची पुडी म्हणजे 
कष्टक-याला मोठंच सुख. 
लोखंडाचे चणेच गोड लागतात बाबा, गरिबाला. 
थोरा-मोठ्यांसारखं आणावं कुठून? 
अपु-या पैशात हातात पडेल ते खावं नि गप्पगुमान -हावं. 
माझ्या रस्त्यावरच्या विद्यापीठात मी 
कष्टक-यांच्या याच गोष्टी शिकलो. 
त्यांच्या त्या दु:खाचे ताणेबाणेच 
आता मी कवितेत सांगतो, बाबा.’’

त्यांना मी कसा दिसलो?

पहिल्यांदा रेल्वेत भेटलेले कविवर्य नारायण सुर्वे ब-याच वर्षांनी परभणीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भेटले, अध्यक्ष म्हणून! भोवती माणसांची तुंबळ गद्दळ. पहिल्या दिवशी छान बैलगाडीतून सुर्वेची मिरवणूक निघते. मिरवणुकीला ही तोबा गर्दी. फेट्यातले सुर्वे बाहुलाबाहुलीच्या लग्नातल्या नवरदेवासारखे वाटतात. संध्याकाळी उद्घाटनाच्या कार्यक्रमातही माणसांची गर्दी. संमेलनाच्या मंडपात मावत नाहीत एवढी माणसं. तीनही दिवस संमेलनस्थळ माणसांनी असंच ओसंडून वाहत असतं. कधी नव्हे तो श्रमक-यांचं जगणंच कवितेत मुखर करणारा फाटका माणूस अध्यक्ष झालेला असतो, त्याचं मराठी सारस्वतालाच कौतुक वाटलेलं. म्हणून मग सुर्वेचं किती करू नि किती नको असं प्रत्येकाला झालेलं.
संमेलनाच्या तिस-या दिवशी मात्र समारोपाच्या कार्यक्रमाच्या आधी सुर्वे एका खुर्चीत जरा निवांत बसलेले सापडतात. चेह-यावर थकल्याचे, पण कृतज्ञतेचे भाव असतात. ‘एकदम झकास झालं संमेलन सुर्वे’, असं बोलल्यावर हसतात नि म्हणतात, 
‘‘बघितलास ना रे बाबा हा प्रेमाचा गोतावळा.. 
नुस्त्या कवितेने जोडलेली ही माणसं बाबा. 
कविता कवीला कुठवर घेऊन जाते बघ! 
माझ्या कवितेचे हे पांग मी कसे फेडू बाबा! 
खरंच सांगतो, 
संमेलनातल्या कौडकौतुकाचं काही खरं नाही. 
त्याचं मला कवतिकही नाही. 
पण परवा उद्घाटनाला 
दहा हजार पोरं सायकलीवरून आली होती! 
पाठ्यपुस्तकातल्या माझ्या कविता वाचल्यावर, 
नारायण सुर्वे कसा दिसतो ते 
त्यांना बघायचं होतं म्हणे! 
पण जसा कवितेत, 
तसाच प्रत्यक्षात मी दिसलो असेन ना त्यांना.’’

एकोणीस पीएचड्या, पाच डॉक्युमेंट्र्या...

‘डिम्पल पब्लिकेशन’ने कृष्णाबाईंचं ‘मास्तरांची सावली’ हे पुस्तक प्रकाशित केलं. त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई खास नाशिकहून मुंबईत आलेले. जिथे उतरले होते, तिथे भेटायला गेलो... तर मास्तर थकलेले. कवितावाचनासाठी भिरभिरणारे पाय एकाच जागी थांबलेले. 
‘‘काय करणार बाबा, 
कवितेसाठी शरीर खूप राबवलं. 
ऊन-पाऊस, गाडी-घोडा 
काही पाहिलं नाही. 
कुणीकुणी जिथे बोलावलं तिथे गेलो. 
पण आता शरीर तक्रारी करायला लागलंय. 
माझी मात्र काही तक्रार नाही. 
कवितेने मला खूप दिलंय.’’ 
मास्तर सांगतात. मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरूच राहतात. मध्येच सुर्वे कृष्णाबाईंकडे वळतात आणि म्हणतात, 
‘‘बरं का कृष्णाबाई, 
कविता करून फार धन नाही मिळवलं, 
पण संपूर्ण महाराष्ट्रात पोरं खूप मिळाली.
हे त्यातलंच एक पोरगं! आता मोठं झालंय. 
पहिल्यांदा भेटला तेव्हा केवढासा होता!’’
मास्तरांच्या कौतुकाने कससंच होतं. त्यांचा कौतुकाचा ओघ थांबवण्यासाठी त्यांना नवीन काही लिहिलंय का विचारतो. त्यांच्या कवितेच्या आठवणी जागवतो. त्यावर मास्तर खुलतात, म्हणतात, 
‘‘काय सांगू तुला.. 
इनमिन चार कवितासंग्रह. 
पण त्यांच्यावर केवढे मोठाले ग्रंथ निघाले बाबा.. 
एकोणीस तर पीएचडय़ाच झाल्या... 
पाच डॉक्युमेंट्रय़ा निघाल्या... 
आणखी बरंच काय काय सुरू आहे. 
हे सारं बघितल्यावर मनात येतं, 
बा नारायणा, बघ तुझी कविता कितीला पडली!’’

LikeShow more reactions
Comment

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा