सोमवार, ११ मे, २०१५

लावणी 'शास्त्रीय' होऊ शकते?

महाराष्ट्राने शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्याची चांगली जोपासना केली आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवणारे कलाकार इथल्या मातीत जन्माला आलेले आहेत.तरीही महाराष्ट्राचं स्वतःचं असं शास्त्रीय नृत्य आकाराला आलेलं नाही. मात्र आजवर पांढरपेशा समाजाने गावकुसाबाहेर ठेवलेल्या लावणीत शास्त्रीय नृत्याची सगळी लक्षणं दिसतात...
(संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर, छाया : श्रेयांश जाधव)
(संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर, छाया : श्रेयांश जाधव)
शास्त्रीय संगीत असो वा शास्त्रीय नृत्य, या कलांच्या संगोपन-संवर्धनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आहे. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरेतून ख्यालगायकी शिकून महाराष्ट्रात आले आणि इथे महाराष्ट्र देशी संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. तसंच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पं. मोहनराव कल्याणपूरकर, आचार्य पार्वतीकुमार यांसारख्या नृत्यगुरुंनी महाराष्ट्रात कथक, भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांची पायाभरणी केली आणि आज उभा महाराष्ट्र विविध शास्त्रीय नृत्यांचं प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्राची भूमीच अशी आहे की इथे कलांची नीट निगराणी आणि जोपासना होते. इतर कुठल्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्राची रसिकता संपन्न आणि जाणकार आहे. त्यामुळेच शास्त्रीय संगीतातील अनेक नामवंत बुजुर्गांनी महाराष्ट्राची कायम सराहनादेखील केली आहे... आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की, शास्त्रीय संगीत-नृत्याची जोपासना करणा‍ऱ्या महाराष्ट्रात स्वतःचं शास्त्रीय नृत्य का आकाराला आलं नाही? महाराष्ट्राला स्वतःची अशी खास नृत्यशैली नव्हती का? किंवा एकही अशी नृत्यशैली नव्हती, जी इतर शास्त्रीय नृत्यांच्या शेजारी ठामपणे उभी राहील? तर याचं उत्तर ठामपणे ‘अशी नृत्यशैली महाराष्ट्रात होती आणि आहे’, असंच द्यावं लागेल. महाराष्ट्रात नृत्यशैली तर अनेक आहेत आणि त्या प्रादेशिकतेनुसार भिन्न भिन्न आहेत. परंतु ‘शास्त्रीय नृत्य’ या नामाभिधानाला साजेशी अशी एकच नृत्यशैली महाराष्ट्रात आहे आणि ती म्हणजे, तमाशा या लोककलाप्रकाराचं एक उपांग असलेली आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणारी — लावणी! मात्र आजतागायत महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेल्या लावणीला शास्त्रीय साज चढवण्याचा प्रयत्न कुणी केलेला नाही आणि ज्या कुणी क्वचित केला, त्यांना धमकी दिली गेली — ‘ही महाराष्ट्राची मोकळीढाकळी लोककला आहे, तिला तशीच ठेवा.’ यातल्या ‘मोकळीढाकळी’ या शब्दाला वेगळाच वास होता. जर लावणी मोकळीढाकळी राहिली नाही, तर तिचा (लावणीचा आणि लावणीनर्तकीचा) मोकळाढाकळा आस्वाद आम्हाला घेता येणार नाही, असा गर्भित हेतू त्यामागे होता. मात्र लावणीला शास्त्रीय बाज चढवण्यामागे असे कुणाकुणाचे अंतस्थ हेतू असले, तरी लावणीत शास्त्रीय नृत्य होण्यासाठीचे निकष खरोखरच आहेत की नाहीत, हे मात्र नक्कीच तपासून पाह्यला पाहिजे. कारण कुणी कितीही स्वतःहून ठरवलं, म्हणून लावणीला शास्त्रीय नृत्याचा दर्जा प्राप्त होणार नाही. त्यासाठी संगीत नाटक अकादमीने आखून दिलेल्या निकषात तुमची नृत्यशैली बसायला हवी. काय आहेत, हे संगीत नाटक अकादमीचे निकष? तर, संगीत नाटक अकादमीने भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ यासाठी प्रमाण मानला आहे. वास्तविक भरतमुनींनी आपल्या नाट्यग्रंथात आजच्या कुठल्याही शास्त्रीय नृत्यशैलींचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी आपल्या ग्रंथात दाक्षिणात्य, अर्धमागधी, अवंती आणि पांचाली या चार नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख केलेला आहे. या नृत्यप्रवृत्तींचा मागोवा घेतला, तर दाक्षिणात्य या नृत्यप्रवृत्तीत दक्षिणेकडच्या नृत्यशैलींचा समावेश होतो. अर्धमागधी नृत्यप्रवृत्तीत आजच्या इशान्येकडील ओडिसी, मणिपुरी किंवा शास्त्रीय नृत्यांच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या सत्तारिया या नृत्यांचा समावेश होऊ शकतो. अवंती किंवा पांचाली या नृत्यशैली म्हणजे नेमक्या कोणत्या, याबद्दल मात्र संशोधकांमध्ये एकमत नाही. तसंच नाट्यशास्त्रात या नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख असला, तरी त्यांची एकच सर्वसमावेशक किंवा वेगळेपणाची व्याख्या त्यात नाही. त्यामुळे भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सरसकट नृत्याविषयी जे विवेचन केलं आहे, तेच शास्त्रीय नृत्यासाठीचे निकष मानले जातात. उदाहरणार्थ भरतमुनींनी नर्तकाला (स्त्री-पुरुष दोन्ही) नट मानून त्याने आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनयातून व्यक्त झालं पाहिजे, त्याने आपल्या अंग-उपांगांचा भावप्रदर्शनासाठी वापर केला पाहिजे, त्याने आपल्या नृत्यात एकल आणि संयुक्त हस्तमुद्रांचा वापर केला पाहिजे, तसंच त्याच्या सादरीकरणात नवरसांचा (भरतमुनींनी प्रत्यक्षात आठच रस सांगितले आहेत) परिपोष असला पाहिजे, असं म्हटलं आहे, भरतमुनींनी कुठल्याही प्रकारच्या नर्तनासाठी सांगितलेले हे निकषच, आजच्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचे निकष आहेत. याच निकषांवर भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी आणि आसामचं सत्तारिया या आठ नृत्यशैलींची आज भारतीय शास्त्रीय नृत्यांत गणना केली जात आहे. ...आणि हेच निकष लावायचे, तर महाराष्ट्राची लावणीदेखील बहुतांशी हे सगळेच निकष पूर्ण करते. तब्बल साडेचारशे वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राची लावणी कुठेच मागे नाही. भावप्रदर्शनासाठी लावणीनर्तिका आपल्या अंगउपांगांचा वापर करते, त्याला लावणीच्या परिभाषेत ‘अदा’ म्हटलं जातं. शास्त्रीय नर्तनात चेह‍ऱ्यावरील भावाभिव्यक्तीला ‘अभिनय’ म्हणण्याची पद्धत आहे, लावणीपरंपरेत त्याला ‘भावकाम’ म्हणतात. गोल फिरण्याला कथकच्या शास्त्रीय परंपरेत चक्री म्हटलं जातं, तर लावणीवाले तिला ‘गिरकी’ म्हणतात. शास्त्रीय नृत्यात ज्याप्रमाणे तबला किंवा घटमवर तोडे वाजवून पदन्यासातलं कौशल्य दाखवलं जातं, त्याचप्रमाणे लावणीनृत्यात ढोलकीवर तोडे वाजवून नर्तकी आपलं पदन्यासकौशल्य दाखवते. एवढंच नव्हे, तर शास्त्रीय संगीताप्रमाणेच शास्त्रीय नृत्यात जसं धीम्या आणि जलद संगीतावर नृत्याचं सादरीकरण होतं, तसंच ते लावणीतही होतं. खडी म्हणजे उभ्याने सादर केलेली लावणी ही गतिमान नृत्यासाठी प्रसिद्ध आहे, तर बैठकीची लावणी संथ लयीतील अदाकारी सादर करते. अगदी शास्त्रीय नृत्याप्रमाणेच लावणीत हस्तमुद्राही आहेत. फक्त या हस्तमुद्रांना आजवर नाव देण्याचा प्रयत्न झाला नाही. तसंच शास्त्रीय नृत्यातून जसं विविध रसांचं दर्शन घडवलं जातं, तसंच ते लावणीतूनही घडतं. फक्त लावणीचा कल श्रृंगाररसाकडे अधिक आहे. कारण ती रसिकाश्रयी कला आहे. आणि खरं सांगायचं तर आज ज्या नृत्यशैली ‘शास्त्रीय नृत्य’ या अभिधानाला पोचल्या आहेत, त्या सा‍ऱ्याच नृत्यशैलींचा गाभा हा मूलतः शृंगाररसाचाच होता. कारण या बहुतांशी नृत्यशैली मूळच्या देवदासी नृत्याचंच परिष्कृत रूप आहे. भारतातील देवदासीपरंपरा प्राचीन आहे. देवपत्नी म्हणून त्यांना जेव्हा रोज देवासमोर, त्याची झोपायची वेळ झाली की, रंगभोग सादर करावा लागायचा, तो रंगभोग वैषयिकच असायचा. आज जरी त्याला आध्यात्मिकतेचा आणि सात्त्विकतेचा मुलामा चढवण्यात आलेला असला, तरी देवदासींचं मूळ गाणं आणि नृत्याचा आशय श्रृंगारिकच होता. त्याचे अनेक दाखले आजही दक्षिणेतील मूळ परंपरेत सापडतात. महाराष्ट्रातला त्याचा एक उत्तम दाखला म्हणजे नवरात्रीत आजही जेजुरीच्या कडेपठारावर (गडावर नव्हे), जिथे खंडोबाचं मूळ ठाणं आहे; तिथे लावणीपरंपरा जपणा‍ऱ्या कलावंत महिला जातात आणि त्याला पारंपरिक श्रृंगारिक लावण्या ऐकवतात. मुख्य म्हणजे द‌क्षिणेकडे किंवा भारतात सर्वत्रच देवासमोर सादर होणारा रंगभोग कला म्हणूनच नावाजला गेला आणि रक्षिलाही गेला. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र त्याला अश्लील ठरवून तो त्यागला गेला. परिणामी देवदासींचंच नृत्य पुढे शास्त्रीय म्हणून ओळखलं जायला लागलं, परंतु त्याचा श्रृंगारसाचा आत्मा मात्र त्यातून काढून टाकण्यात आला. कारण तो श्रृंगार पांढरपेशा समाजाला मानवणारा नव्हता. हाच श्रृंगाररसाचा आत्मा लावणीला बाधक ठरू शकतो. शास्त्रीय नृत्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्वच निकषांवर लावणी कदाचित पात्र ठरेल. परंतु तिचा थेटपणा मात्र संगीत नाटक अकादमीच्या समितीवर बसलेल्यांना मान्य होणार नाही. अर्थात लावणीला शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळावी म्हणून महाराष्ट्रातून आजवर रीतसर प्रयत्न झालेले नाहीत. तसंच शास्त्रीय नृत्याच्या रूपबंधात लावणीला बांधण्याचा प्रयत्नही कुणी केलेला नाही. तसा प्रयत्न झालाच, तर मात्र लावणीपुढे श्रृंगारिकतेचं काय करायचं, हा प्रश्न उभा राहू शकतो. कारण याच कारणासाठी आंध्रप्रदेशातील विलासिनीनाट्यम या देवदासींच्या नृत्यावर ते प्राचिन असतानाही शास्त्रीय नृत्य म्हणून मोहोर उमटलेली नाही. तसंच दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर कुणी लावणीला शास्त्रीय नृत्याच्या कसोटीत बांधण्याचा प्रयत्न केला, तर ही कला आजवर ज्या समाजाने जपली, तो कोल्हाटी समाज याला मान्यता देणार का? कारण आजही तमाशा किंवा लावणी हाच या समाजाचा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय आहे. तेव्हा महाराष्ट्राचं शास्त्रीय नृत्य म्हणून लावणी या नृत्यशैलीचा विकास होऊ शकतो. पण तो कोण आणि कसा करणार हा खरा प्रश्न आहे! 
(१० मेच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा