गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

दिवाळी : कृषिसंस्कृतीचा जागर



शहरात प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते. पण ग्रामीण जीवनात आजही दिवाळी म्हणजे कृषिसंस्कृतीचा उत्सव आहे. कृषिसंस्कृतीतील दिवाळीची ही अनोळखी ओळख.
...
नागर संस्कृतीत मनामनावर होणारा दिवाळीचा पहिला संस्कार कुठला असेल तर तो म्हणजे, बालपणी हातात देण्यात येणारी फुलबाजी आणि ती गोलगोल फिरवत म्हटलेलं गाणं-
दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी
गायी-म्हशी कुणाच्या, लक्षुमनाच्या
लक्षुमन कुणाचा, आईबापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी...
... जणुकाही हे गाणं म्हणजे दिवाळीगीतच! एका अर्थाने ते खरंही आहे, पण हे गाणं शहरी संस्कृतीत आलं कुठून? कारण गायी-म्हशी ही आजही खेड्यातलीच धनदौलत. साहजिकच या गाण्यात गुरांचं औक्षण केलं आहे, तर त्यांना भय असलेल्या रानातल्या वाघोबाच्या पाठीत काठी घालायची बात केली आहे. ग्रामीण संस्कृतीत रुजलेलं हे गाणं आज तेवढ्याच जोरकसपणे नागर संस्कृतीशीही एकजीव झालं आहे. मात्र गायी-म्हशी आणि वाघाच्या उल्लेखामुळेच हे गाणं शहरी संस्कृतीतलं नसल्याचं कोडं उलगडतं. अन्यथा नागर संस्कृती, आपल्याला जेजे हवं ते सारं अनागर संस्कृतीकडून आयात करते, आणि नंतर त्याची मूळ ओळखच पुसून टाकते. पण कधी कधी या अवस्थांतरातही अनागर संस्कृतीतले काही अवशेष तसेच कायम राहतात. 'दिन दिन दिवाळी गायी-म्हशी ओवाळी' या गाण्यातही ते असेच कायम राहिलेत.
पण हे गाणंच नाही, तर दिवाळी हा सणच अनागर संस्कृतीतून नागर संस्कृतीत आयात झालेला आहे. मात्र तो जसाच्या तसा झालेला नाही. म्हणूनच मूळ कृषी-उत्सव असलेला हा सण शहरी संस्कृतीत मात्र दिव्यांचा उत्सव झालेला आहे. शहरात वसूबारसपासून दिव्यांच्या या उत्सवाला सुरुवात होते. नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवस या सणाची रंगत वाढवत नेतात. शहरात या सणाला जो झगमगाट दिसतो, तो ग्रामीण भागात नसतो. त्यांच्यासाठी हा सण केवळ दिव्यांचा उत्सव नसतो, तर तो एक प्रकृती उत्सव असतो. शेतीचा पावसाळी हंगाम संपलेला असतो, दारापुढचं खळं शेतात पिकलेल्या धनधान्याने भरून वाहात असतं. नव्याने घरात आलेल्या या धान्याधुन्याची आणि ते ज्यांच्यामुळे आलं, त्या गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो. त्यामुळेच नागर संस्कृतीत दिवाळीला घरोघरी फराळाची लज्जत, फटाक्यांची आतषबाजी सुरू असते, तेव्हा अनागर संस्कृतीत मात्र निसर्ग, गुरं आणि ज्याच्या काळात भूमिपुत्र सुखासीन आयुष्य जगत होता, त्या बळीराजाची पूजा बांधली जाते.
महाराष्ट्रात मराठवाड्यातील गुराखी समाज धनत्रयोदशीपासून लव्हाळ्याची दिवटी विणायला सुरुवात करतो. लव्हाळी म्हणजे पुरुषभर उंचीचं वाढलेलं गवत. या गवताच्या हिरव्या काड्यांपासून प्रत्येक घरातील गुराखी एक सुबक गवती दीपमाळ विणतो. रोज दीपमाळेचा एक थर, याप्रमाणे पाच दिवसात तो पाच थर विणतो. रोज नव्याने विणलेल्या दीपमाळेच्या खणात दिवा ठेवून त्या दिव्याने गुराखीराजा रोज आपल्या गुरांना ओवाळतो.
                                                  छायाचित्रं : अतुल मळेकर

मराठवाड्यातीलच गुराखी-शेतकरी समजातील महिला दिवाळीच्या या पाच दिवसात रोज शेणाच्या गवळणी तयार करतात. पहिल्या-दुसऱ्या दिवशी नुसत्याच मानवी आकाराच्या गवळणी केल्या जातात. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी दही-दुधाचे हंडे डोक्यावर घेऊन जाणाऱ्या गवळणी बनवल्या जातात. तर पाचवा दिवस पांडवांचा मानून शेणाचेच पाच पांडव केले जातात. शेणापासून रोज बनवण्यात येणाऱ्या गवळणींच्या पुतळ्यांची रोज पूजा करून त्यांना दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. पाडव्याच्या दिवशी मात्र पाच पांडवांसाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. दिवाळीचे हे पाचही दिवस गुरांचा मान राखण्यासाठी म्हणून त्यांचीही रोज पूजा केली जाते. तसंच पाचही दिवस दह्याने गुरांच्या पुढच्या पायावर चंद्र आणि मागच्या पायावर सूर्य काढण्याची या समाजात प्रथा आहे. या मागे चंद्र-सूर्य असेतोपर्यंत हे गोधन आपल्या घरी कायम राहो हा हेतू असतो. तर पाचव्या दिवशी शेणाने केलेले पांडव सुकले, की नंतर ते शेतात नेऊन जाळले जातात. यावेळी पांडव जाळताना निर्माण होणाऱ्या धगीवर दूध तापवलं जातं आणि ते मुद्दाम उतूही जाऊ दिलं जातं. त्यामागचा प्रतीकात्मक हेतू हा की शेतात येणारं पिकही असंच भरभरून येऊ दे आणि ओसंडून वाहू दे.
अनागर संस्कृतीत प्रत्येक समाज आपापली जगण्याची स्वतंत्र शैली राखून असतो. ती रोजच्या व्यवहारातच असते असं नाही, तर सण-उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीतही असते. उदाहरणार्थ गुराखी समाज लव्हाळ्याची दिवटी पाजळतात. तसंच आदिवासी समाज दिवाळीत निवडुंगाच्या कापाची दिवटी पाजळतात. निवडुंगाचे जाड काप करून ते आतून कोरले जातात आणि त्यातच तेलवात लावून तयार केलेल दिवे हा समाज दिवाळीत दारापुढे लावतो. आदिवासी समाजात बलिप्रतिपदेचा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी आदिवासी बांधव ढोरं उठवण्याचा सण साजरा करतात. त्यासाठी गावाबाहेर आयताकृती आखाडा तयार करून, त्यात गवत पसरवून तो आखाडा पेटवून देतात. गवत पेटून धूर झाला की गुरंढोरं त्या धुरातून पळवली जातात. त्यामुळे त्यांना कसला आजार होत नाही, अशी त्यांची समजूत आहे.

आदिवासी समाज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाड्यातील हिरव्यादेव, वाघदेव, कनसरीमाता अशा निसर्गातील देवतांची पूजा करतो. या देवतांना रानात सहजच मिळणाऱ्या ऊस, काकडी अशा पदार्थांपासून बनवलेला प्रसाद दाखवला जातो. दिवाळी हा कृषी उत्सव असल्यामुळे लोकरहाटीतील बहुतेक समाज या सणाला आपल्याला उपयोगी पडणाऱ्या पशूला विशेष मान देतात. गुराखी आणि आदिवासी दिवाळीत गुरांना आणि बकऱ्यांचं औक्षण करतात, तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची दिवाळी ही खास त्यांच्या मेढ्यांसाठीच असते. धनगर समाजात पाडव्याच्या दिवशी मेंढा आणि मेंढीचं प्रतीकात्मक लग्न लावण्याची पद्धत आहे. त्यासाठी पाडव्याला मेंढा-मेंढीला स्वच्छ आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं. खरोखरच्या वधू-वरांना सजवावं, तसं मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधला जातो. तर मेंढ्याच्या गळ्यात                    पान-सुपारीचा गोफ बांधतात. त्यानंतर खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत मेंढा-मेंढीचं दणक्यात लग्न लावलं जातं.
कोकणातला अलिबाग-मुरुड परिसरातील आगरी समाज तर दिवाळीत शेणाच्या गोळ्याची बळीराजा म्हणून पूजा करतो. विशेषत: पाडव्याचा दिवस बळीराजाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला तांदळाचं पीठ व रांगोळीचं मिश्रण करून त्यापासून अंगणात कणे म्हणजे रांगोळी काढण्याची प्राचीन पद्धत आहे. चौकोनी आकाराच्या या कण्यात चार दिशांना चार, तर एक मध्यभागी असे शेणाचे पाच गोळे ठेवतात. शेणाच्या प्रत्येक गोळ्यावर गोंड्याचं फुल ठेवून त्याला बळीराजाचं प्रतीक मानून त्या गोळ्यांची पूजा केली जाते. पूजाविधी यथासांग पार पडल्यावर हे शेणाचे गोळे घराच्या कौलांवर फेकण्यात येतात. यामुळे बळीराजाची आपल्या घरावर कृपा राहाते, अशी या समाजाची श्रद्धा आहे.
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा मानला जात असल्यामुळे अनागर संस्कृतीत त्याचं आणि कृषिकर्माचं गुणगान करणारी अनेक गाणी गायली जातात. मराठवाडा-विदर्भात तर अशी अनेक गाणी गुराख्यांना तोंडपाठ असतात. त्यातलंच एक गाणं म्हणजे-
दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी
गाईचा गोऱ्हा, चौपाय मोरा
चौक कुणाचा, लक्षुमनाचा
लक्षुमनानं काय दिलं, लक्षुमनानं दिला डबा
डब्यात काय सुतोई, त्यानं गाय पुतोई
ज्यान्या गाईचे, व्हंडे व्हंडे गोऱ्हे
त्याला लावले चौर गोंडे
चौर गोंड्यांची सावली, तिफन माझी माऊली
तिफनीला तीन फणं, मोगड्याला दोन फणं
दाबीन बुक्की, फोडीन नारळ
आलं आलं मर्दाचं घोडं
उघडा उघडा बळीराजाचं कवाडं
इडापिडा जाऊ दे नि बळीचं राज्य येऊ दे... 
लोकरहाटीतली दिवाळी अशी कृषिसंस्कृती जागवणारी असते. शेतशिवाराची भरभराट होवो, घरात गुरा-ढोरांची समृद्धी येवो म्हणणारी आणि बळीराजाच्या राज्याचं दान मागणारी!
(पूर्वप्रकाशित लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा