गुरुवार, १२ मार्च, २०१५

देवदासीनृत्याचे अंतरंग

भारतातील बहुधा सर्वच शास्त्रीय नृत्यांच्या मुळाशी देवदासीनृत्य आहे. परंतु कालौघात देवदासीनृत्यावर संस्कार करून, मूळ नृत्याची छाप पुसून टाकण्यात आली आहे. शास्त्रीय नृत्यामागील या देवदासीनृत्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाटी कार्यरत असलेल्या यशोदा राव-ठाकूर आणि त्यांच्या देवदासीनृत्याविषयी…

देवदासी परंपरेतून आलेल्या प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना बालसरस्वती
अभिजन आणि बहुजन हा संघर्ष केवळ सामाजिक-राजकीय पातळीवर नसतो; किंबहुना त्यापेक्षा अधिक तो सांस्कृतिक पातळीवर असतो. कारण परंपरेतून झिरपत जाणारा संस्कृतीचा प्रभाव समाजात खोलवर रुजतो आणि वर्षानुवर्षं टिकतो. त्यामुळेच अभिजनांनी पूर्वापार बहुजनांची विठोबा-खंडोबासारखी दैवतंच नाही, तर त्यांच्या संगीत-नृत्यादी कलाही आत्मसात केल्या. पण कालौघात या देवतांवर आणि कलांवर चढलेली, देवत्वाची नि शास्त्राची‌पुटं खरवडून काढली की त्यांचं मूळ रूप झळझळीतपणे सामोरं येतं; नव्हे त्या देवता आणि कला आपल्या मूळ उद्गात्यांचा जयघोष अधिक उच्चरवाने करू लागतात. नुकत्याच मध्यप्रदेशातील खजुराहो येथे पार पडलेल्या नृत्यमहोत्सवात हैद्राबादच्या नृत्यांगना यशोदा राव-ठाकूर यांनी 'देवदासीनृत्य' सादर केलं आणि अभिजनांनी कुचीपुडी, विलासिनीनाट्यम आणि भरतनाट्यमसारख्या भल्याभल्या नावांनी गौरवलेल्या नृत्याचं मूळ रूप उघड केलं.

कधी काळी भारतात धार्मिक बाब म्हणून मंदिरात देवाच्या सेवेसाठी म्हणून देवदासी प्रथेला प्रारंभ झाला. या सेवांअंतर्गत या देवदासी कधी गाणं म्हणून, तर कधी नृत्य करुन देवाचं मनोरंजन करू लागल्या. मंदिरातली ही संगीत-नृत्याचीच परंपरा कालांतराने राजदरबारात जाऊन स्थिरावली. जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तेव्हा केवळ या देवदासीच होत्या, ज्यांना अपवादात्मक स्थितीत लिहिण्या-वाचण्याचा अधिकार होता. त्या अधिकारातूनच आधी मंदिरात आणि नंतर दरबारात आपली सेवा रुजू करताना त्यांनी आपल्या कलांचा परिपोष केला. आपली संगीत-नृत्यकला 'कला' या अभिधानापर्यंत पोचवली. मात्र त्यांच्या 'देवदासीनृत्या'तूनच उन्नत पावलेल्या  भरतनाट्यम, ओडिसी, मोहिनीअट्टम, कुचीपुडी यांसारख्या शास्त्रीय नृत्यांत आज मूळ रुपाची साधी झलकही पाहायला मिळत नाही. किंबहुना मूळ ओळख लवपण्याचाच अधिक प्रयत्न केला जातो. कारण 'देवदासीनृत्य' म्हटलं या शास्त्रीयनृत्यांच्या प्रतिष्ठेला बाध येतो. या खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाडण्याचंच काम जणू यशोदा राव-ठाकूर यांनी खजुराहो नृत्य महोत्सवात केलं.

यशोदा राव-ठाकूर या मूळच्या कुचीपुडीनर्तिका. वयाच्या ६व्या वर्षापासून सलग चौदा वर्षं त्या कुचिपुडी नृत्य शिकल्या. परंतु नृत्यात एम.ए. करत असतानाच एकदा त्यांनी मदुरालक्ष्मी नारायणन या ८० वर्षांच्या देवदासीचं विलासिनीनाट्यम पाहिलं. त्यावेळी मदुरालक्ष्मींनी सलग चार तास सादर केलेला 'अभिनय' नावाच्या कलाप्रकाराने यशोदा राव भारावून गेल्या. कारण त्या चार तासात त्यांनी वेगवेगळ्या पदांवर कायिक, वाचिक आणि मौखिक अभिनयाचे अक्षरशः असंख्य प्रकार करुनव दाखवले. केवळ बसून सादर केल्या जाणा‍ऱ्या 'अभिनय' या देवदासीनृत्यातील कलाप्रकाराने यशोदा राव या नृत्याकडे ओढल्या गेल्या आणि त्यांनी विलासिनीनाट्यम या सुप्रतिष्ठित नावाने ओळखलं जाणारं देवदासीनृत्य तत्कालीन प्रसिद्ध कलावंत स्वप्नसुंदरी यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. मात्र स्वप्नसुंदरी यांच्याकडे 'विलासिनीनाट्यम' शिकत असतानाच देवदासीनृत्याला देण्यात येत असलेलं आधुनिक रूप त्यांना खटकायला लागलं. त्यांना देवदासीनृत्याच्या मुळाशी जायचं होतं. मग त्यांनी देवदासीनृत्याची मौखिक-लिखित परंपरा शोधायला, तपासायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्या त्याच्या मु‍ळाशी पोचल्या. तेव्हा देवदासीनृत्याच्या अंगभूत झळाळाने त्यांना दिपवून टाकलं.

महत्त्वाचं म्हणजे या अभ्यासाने त्यांना तंजावरच्या कलासक्त भोसले राजांपर्यंत पोचवलं. शिवाजीमहाराजांचे सावत्रभाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजीराजांनी तंजावरच्या नायकराजाचा पराभव केला आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात तंजावरच्या गादीवर शहाजी, प्रतापजी, तुळोजी, सरफोजी जेवढे भोसलेराजे होऊन गेले, त्या सा‍ऱ्यांनी स्थानिक संगीत-नृत्यकलेला प्रोत्साहन दिलं. त्यातच चोल राजवटीपासून दक्षिणेकडील मंदिर परिसरात देवदासींकडून जोपासल्या गेलेल्या गायन-नृत्य कलेलाही त्यांनी मदत केली. एवढंच नाही, तर देवदासींना त्यांनी राजाश्रयही दिला. त्यांच्या दरबारातस म्हणजेच सदरेत हे देवदासीनृत्य म्हणजेच देवदासीआटम (आटम म्हणजे खेळ) सादर होऊ लागलं, त्यामुळे त्याला सादिरआटम असं नाव मिळालं. भोसल्यांच्या राजवटीत स्थानिक भाषा तमीळ होती, तर भोसल्यांच्या आधीचे नायकराजे तेलुगु असल्यामुळे राजभाषा तेलुगू होती. साहजिकच देवदासीनृत्याची सगळी पदं तेलुगु आणि तमीळ भाषेत होती. मात्र  भोसलेराजांनी आपली जेत्यांची मराठी भाषा स्थानिक समाज व कलावंतांवर न लादता, उलट त्यांची भाषा शिकून घेतली. त्यामुळेच तंजावरच्या अनेक भोसलेराजांनी या सादिरआटमसाठी तेलुगू-तमीळ-मराठी भाषेत लिहिलेली पदं सापडतात. तंजावरच्या मराठा राजांनी देवदासीनृत्याला दरबारात स्थान दिलं म्हणूनच त्यावरून विकसीत झालेलं भरतनाट्यमच शास्त्रोक्त रुप आज पाहायला मिळत आहे.

परंतु देवदासीआटम ते भरतनाट्यम हे परिवर्तन होताना, मूळ कलावंतसमाजाचं अस्तित्वच पुसलं गेलं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रुक्मिणदेवी अरुंडेल यांनी गौरी अम्मा या देवदासीकडून भरतनाट्यम शिकून घेतलं. मात्र या नृत्याला तथाकथित अभिजन समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी  देवदासींच्या पारंपरिक नृत्यातील आक्रमकता, शृंगारिकता काढून टाकली. परिणामी आज दक्षिणेकडे भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारावर ब्राह्मण समाजाचं वर्चस्व आहे. रुक्मिणीदेवी अरुंडेल यांना त्यावेळी टी. बालसरस्वती या जगप्रसिद्ध नर्तिकेने जोरदार विरोध केला होता. कारण बालसरस्वती स्वतः देवदासीपरंपरेतील होत्या. त्यांची आजी वीणा धनमाल या तंजावरच्या दरबारच्या गायिका होत्या आणि बालसरस्वती परंपरेने चालत आलेलं नृत्यच शिकल्या होत्या. विशेष म्हणजे 'अभिनय' ही बालसरस्वती यांचीही खासीयत होती. ही 'अभिनय'परंपरा जोपासण्याचाच प्रयत्न यशोदा राव-ठाकूर करत आहेत.

खजुराहो नृत्यमहोत्सवात यशोदा राव-ठाकूर यांनी मुद्दाम देवदासीपरंपरेतला शृंगाररसाने ओतप्रोत भरलेला 'अभिनय' कलाप्रकार सादर केला. तो बघताना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण देवदासीपंरपरेतील हा 'अभिनय'प्रकार म्हणजे आपली महाराष्ट्राची बैठकीची लावणीच होती. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गोदावरी पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर, गुलाबबाई संगमनेरकर यांनी परंपरेतून आलेल्या इरसाल चावट लावण्या आपल्या अप्रतिम अदाकारीने कलेच्या पातळीवर पोचवल्या. त्याचप्रमाणे यशोदा राव-ठाकूर शरीराच्या अंगप्रत्यंगाचं रसभरीत वर्णन करणा‍ऱ्या तेलुगू पदावर सुरेख भावकाम करत होत्या. त्याही बेठकीच्या लावणीप्रमाणेच बसून पदांवरचा हा अभिनय सादर करत होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्या पदांतला आशय अभिजनांच्या दृष्टीने अतिशय चावट असतानाही, त्यांनी आपल्या संयत, पण ठोस सादरीकरणातून वाचिक, कायिक आणि आंगिक अभिनयाचा  नितांतसुदर आविष्कार घडवला. किंबहुना आज अभिनय ही संज्ञा रंगभूमीवरील अभिनेत्यासाठी मुख्यत्वे वापरली जात असली, तरी ती मूळ देवदासी बसून सादर करत असलेल्या 'अभिनय' या कलाप्रकारासाठी असावी, असं क्षणभर वाटून गेलं.

देवदासीनृत्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या यशोदा राव-ठाकूर
रंगमंचावर आल्यावर सर्वप्रथम गणेशवंदना किंवा सरस्वतीवंदना करण्याची प्रथा आहे. पण यशोदा राव यांनी तिथेही देवदासीनृत्यपरंपरेतील सलामनृत्य केलं. सलाम म्हणजे एक प्रकारचा देवाला किंवा ज्या राजाने आश्रय दिला, त्या राजाला केलेला सलाम. यशोदा राव यांनी सादर केलेल्या सलामनृत्याची खासीयत म्हणजे तो  सलाम तंजावरच्या भोसलेराजांना केलेला होता. याचं कारण सांगताना त्या म्हणाल्या, 'तंजावरच्या भोसलेराजांनी ही देवदासीनृत्याची परंपरा जोपासली. त्यामुळे देवदासींच्या अनेक तमीळ-तेलुगु पदांत त्यांना सलाम केलेला आहे.'

आपल्या नृत्याचा शेवटही यशोदा राव यांनी मुद्दाम जावळीनृत्याने केला. हे जावळीनृत्यही देवदासीनृत्यातील एक मुख्य नृत्यप्रकार होता. पण तो काहीसा आक्रमक आणि शृंगारिक असल्यामुळे, जेव्हा देवदासीनृत्याची नव्याने मांडणी करण्यात आली, तेव्हा त्यालाही फाटा देण्यात आला. पण भरतनाट्यम, कुचिपुडी किंवा विलासिनी नाट्यममध्ये मूळ देवदासीनृत्य परंपरेतील जे-जे बाजूला सारण्यात आलं, त्याला यशोदा राव-ठाकूर यांनी आपल्या देवदासीनृत्यात स्थान दिलं आहे. इतकंच नाही तर, संशोधनातून सिद्ध केलेल्या नृत्याला त्यांनी 'देवदासीनृत्य' असंच नाव दिलं आहे. त्या म्हणतात,'देवदासी परंपरेतील महिला या नृत्याला आमची कला एवढंच म्हणतात. त्यांनी या नृत्याला काहीही नाव दिलेलं नाही. म्हणून मग मीच या नृत्यकलेचं नाव देवदासी नृत्य असं केलं. तसंच आज वेगवेगळ्या शास्त्रीय नृत्यप्रकारासाठी जी केशभूषा, वेशभूषा केली जाते तीही मी नाकारली. कारण ती अलीकडच्या काळातली आहे. पूर्वी देवदासी नेहमीची साडी कंबरेला खोचूनच नृत्य सादर करीत असत. म्हणून मीही ती नैसर्गिक पद्धतच अवलंबली आहे.'

भारतीय नृत्यपरंपरा जोपासणा‍ऱ्या देवदासींच्या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा यशोदा राव-ठाकूर यांचा प्रयत्न आहे. मुख्य म्हणजे अश्लीलतेचं लेबल लावून तुम्ही एखाद्या गोष्टीला बाद कसं करू शकता? असा त्यांचा सवाल आहे. कारण गाण्यातला-पदांतला आशय अश्लील वा शृंगारिक असला, तरी तो नृत्यातून सादर करताना देवदासी नृत्यकलेचा उच्च प्रतीचा आनंद देत असत. मग आशय महत्त्वाचा मानणार की अभिव्यक्ती? असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी स्वतः देवदासींची अभिव्यक्ती मानली आणि आता त्याच अभिव्यक्तीचा प्रसार त्यांना करायचा आहे. शास्त्रीय नृत्यांच्या मुळाशी असलेल्या देवदासीनृत्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. अभिजनांनी लाटलेली बहुजनांची नृत्यकला त्यांना मुक्त करायची आहे.

1 टिप्पणी: