बुधवार, १८ मे, २०१६

पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय


तांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं खोपटं. कंबरभर उंचीचं. त्यात कोण कुठे झोपलाय त्याचा ठावठिकाणा नसतो. पण चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल्या पुरुषाला आपोआप जाग येते. वर्षानुवर्षाची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपटी काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, क पाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला ८ मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला की, त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो. तर दुसर्या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि निघतो गावमागणीला...

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरच्या चव्हाणवस्तीतील अर्जुन श्यामराव जाधव, सर्जेराव श्यामराव जाधव आणि सोनबा सोपान जाधव या पिंगळ्यांबरोबर पहाटे चार वाजता निघालो, तेव्हा बाहेर मिट्ट काळोख होता. पिंगळ्यांच्या हातात कंदील असले, तरी वाटेतल्या दगड-धोंड्यांनी मला ठेचकाळायला होत होतं. अर्जुन, सर्जेराव, सोनबा मात्र पायाखालचीच वाट असल्यासारखे निश्चिंत, पण तरातरा चालले होते. दिवस उगवण्याआधी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूरमध्ये दान मागून त्यांना पुन्हा वस्तीवर यायचं होतं. त्यामुळे धडपडत चाललेल्या माझी खरंतर त्यांना अडचणच झाली होती. पण वेळापूर परिसरात  भटक्या-विमुक्तांसाठी गेली पंचवीसहून अधिक वर्षं काम करणाऱ्या सूर्यकांत भिसे यांनी, त्यांना सांगून ठेवलं होतं- ‘हा माझा पाव्हणा आहे, नीट सांभाळून आणा.’ म्हणून त्यांचा नाईलाज झाला होता. अन्यथा बाहेरच्या माणसाला भटक्यांच्या वस्तीवर राहायला मिळणं, म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण ओळखीने का होईना, मला ती साध्य झाली होती आणि गैरसोईने का होईना पण, त्या तिघांनी ती मान्य केली होती.
साधारणपणे पाऊणेक तासाच्या तंगडतोडीनंतर वेळापूरची वेस जवळ आली. गावातल्या अर्ध नारीनटेश्वराच्या मंदिराचा कळस मिट्ट काळोखातही त्यांच्या नजरेला पडला. तसे तिघे तीन वाटांनी निघाले. मला कुणाबरोबर जावं, ते कळेना. तरीही मी अर्जुन पिंगळ्याची पाठ पकडली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. गावात शिरताच तिघांनी एव्हाना कुडमुडं वाजवायला सुरुवात केली होती. त्या कुडमुड्याच्या आवाजाने गावाला जणू अवेळीच जाग आली. कुठेकुठे घरात दिवे-लाइटी पेटू लागल्या. ज्यांना जाग आली त्या माय-माऊल्या पिंगळा दारात येण्याआधीच दाराच्या उंबरठ्यात पसाभर डाळ-तांदूळ घेऊन उभ्या राहिल्या. सोबत एक-दोन रुपयाचं एखादं नाणं. आता क्वचित पाच रुपयाचं. हे दान मिळताच अर्जुनराव जागेवरच उडी घ्यायचे आणि दान मिळाल्याची पावती द्यायचे. तोंडानं देवादिकांची नावं घेत आणि तोंडानं शकुन ऐक ग माय म्हणत तासाभरात सगळं गाव घेऊन झालं. शंभर-दीडशे उंबर्याच्या गावात सगळ्यांनीच काही दान दिलं नाही. जेमतेम दहा-पंधरा घरांतून कोरडा शिधा मिळाला. एकाही घरातून शकुन सांगण्याचं निमंत्रण मिळालं नाही, म्हणून अर्जुनराव थोडे हिरमुसले. कारण कुणी शकुन विचारलं, तर थोडी वरकमाई अधिक होते. पण आजच्या विज्ञानाच्या काळात भविष्यावर नि शकुनावर कुणाचा विश्वास उरलेला नाही, याची त्यांनाही आता अनुभवाने माहिती झाली आहे. त्यामुळे तांबडं फुटण्याची चिन्ह दिसताच, त्यांनी गुमान परतीची वाट धरली. इतर दोन दिशांनी गेलेले सर्जेराव आणि सोनबाही गावाच्या वेशीवर येऊन थांबणार होते. ‘पुन्हा वस्तीवर येताय का?’ अर्जुनरावांनी विचारलं. खरंतर मला पुन्हा जायचंच होतं वस्तीवर (त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून घेण्यासाठी, समाजाची आजची स्थिती माहीत करुन घेण्यासाठी), पण लगेच नाही. थोडावेळ गावातच रेंगाळायचं होतं, परंपरेचा मागोवा घेत आणि गावगाड्यात असलेलं पिंगळ्यासारख्या मागत्यांचं स्थान हुडकत. मी लगेच अर्जुनरावांना म्हटलं - तुम्ही व्हा पुढं, दिवस उगवला की मी येतोच चहा प्यायला.’
अर्जुनराव, सर्जेराव आणि सोनबा चव्हाणवस्तीच्या दिशेने जायला लागले आणि माझी पावलं गावातील अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या दिशेने वळली. अजून तसं फटफटायचं होतं. तरीही बाहेरगावी जाणार्यांची वर्दळ सुरू झाली होती. मंदिराजवळ उभ्या असलेल्या माझ्याकडे अनोळखी, संशयी नजर टाकून जो-तो फटफटीवर बसून भुर्रकन निघून जात होता. दुसरीकडे साखरकारखान्यात घालण्यासाठी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टर्सचीही धडधड सुरू होती. या सगळ्या काळ बदलल्याच्या खुणा होत्या. गावगाडा बदलला होता. या बदललेल्या गावगाड्यात आता पहाटेच्या पारी दारी येणाऱ्या पिंगळ्याला काही स्थान नव्हतं. गावगाड्याची थोडीफार धुगधुगी अजून शाबुत आहे, तोपर्यंत पिंगळ्याला कुणीकुणी दान घालत राहील. पण पिंगळ्यांची नवी पिढीही आता दान मागायला तयार नाही. आम्ही का कुणापुढे लाचारीने हात पसरावेत, असा त्यांचा सवाल असतो. त्यामुळे तेही पारंपरिक शकुन-भविष्य सांगण्याचा धंदा सोडून आता वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायाच्या शोधात आहेत. अर्जुन-सोनबा-सर्जेरावांसारखी महाराष्ट्रात आता काही थोडीफारच जुनी खोडं आहेत, जी कधीमधी परंपरेची चाल म्हणून ‘मागतं’ मागायला जातात.



पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तुच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ कुंभाराने मडकी घडवून द्यावीत, सुताराने शेतीची लाकडी अवजारं बनवून द्यावीत, चर्मकारानं चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्याबदल्यात, शेतकर्याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, ज्यांचा शेतकर्याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतीव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे, आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकर्याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला, तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. या मागत्यांच्याच नानाविध भेदांपैकी एक म्हणजे पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ. खरंतर भटक्या-विमुक्तामंध्ये ‘जोशी’ नावाचा एक समाज आहे. वासुदेव-गोंधळी-नंदीबैलवाला आणि पांगुळ ऊर्फ कुडमुडे हे सारे वेगवेगळे व्यवसाय करणारे भटके कलावंतसमाज याच जोशी समाजाच्या अंतर्गत येतात. हे सगळे देवादिकांची गाणी म्हणून भिक्षा किंवा दान मागतात आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. मात्र भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हे भटके समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झाले नाहीत. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती करत राहिले आणि आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय दाते श्रीमंत झाले आणि भटका समाज मात्र कायम गरीबच राहिला. परंतु या मागत्या-भटक्या समाजांचा विशेष म्हणजे त्यांनी कधीच निव्वळ भिक्षा स्वीकारली नाही. भिक्षेच्या-दानाच्या बदल्यात त्यांनी, दान देणाऱ्या दात्याची करमणूक केली किंवा मानसिकदृष्ट्या त्याला स्थिर, शांतचित्त करण्याचं काम केलं. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र तसा अजूनही उपेक्षितच. कारण तो येऊन कधी जातो, हेच कधी कुणाला कळत नाही. अगदी पहाटे उठणारी घरातली ज्येष्ठ मंडळी सोडली, तर त्याचा कुणालाच थांग लागत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा थांग लागला नाही, तरी सर्व भटक्या कलावंतांमध्ये पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी पहिल्या स्थानावर आहे. कारण परंपरेत एकप्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत असतो. त्याच्याइतकी सूक्ष्मनिरीक्षण शक्ती क्वचितच कुणाकडे असेल. त्यामुळेच आज एकूणच मागत्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं, तरी गावगाड्यात कधीतरी-कुठेतरी पहाटेच्या पारी कानावर पिंगळ्याचं गाणं पडतं -            
               
पांगुळ आला वं माय
दान दे वं माय
शकुन जाणून घे वं माय
तुझं भलं व्हईल वं माय...

सोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरुचीही लुडबुड ऐकू येते आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदुळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात येते. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशीणीचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो -

त्रासलेली दिसतेस ग माय
काल रातच्याला भांडण झालं ग माय
मनाला लावून घेऊ नकोस ग माय
सुखाचा संसार करशील ग माय...

त्याने अंदाजाची चंची अशी सोडली की, आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळतो आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.


पिंगळा जात्याच हुशार. एखाद्या घरातली मायबाय शिधा आणायला गेली की, लगेच तो घरादारावर नजर टाकतो. घरादारातले सूक्ष्म बदल नजरेने टिपतो आणि घरातली महिला किंवा पुरुष काहीबाही द्यायला आला की सुरू करतो -

‘पिंगळ्याला दान कराया घेऊ नका हरकत
सोनपावलांनी तुमच्या घराला आलीया बरकत’

किंवा

‘नाव काय पाटीलबुवांचे, पुढील भविष्य सांगेन साचे
एका बायकोची संगत घडली, तेणे तुझी महिमा बुडाली...’

असे अंदाजपंचे काही ठोकताळे मांडले की त्यातलं काही ना काही लागू होतं. मग आपोआपच त्या घरातली महिला किंवा पुरुष पिंगळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि पिंगळा आपला कार्यभाग साधतो. ही एकप्रकारे चलाखीच असते. कारण ‘त’ वरुन ताकभात ओळखण्याची कला पिंगळ्यांना अनुभवाने सिद्ध झालेली असते. पण अडचणीत असणारा माणूस पिंगळ्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचं भविष्य खरो ठरो अथवा खोटं, त्या व्यक्तीच्या मनाला उभारी मिळते, हे मात्र मान्य करावंच लागतं.
ग्रामीण लोकपरंपरेत ‘मागता’ असलेल्या या समाजाच्या अस्तित्त्वाचे पुरावे थेट दहा-बाराव्या शतकापासून सापडतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात, ज्ञानदेव-एकनाथांच्या ओव्या-अभंगांत या समाजाचे उल्लेख आहेत. त्याअर्थी हा समाज प्राचिनच आहे. तसंच तेव्हापासूनच हा समाज भटकाही आहे. महत्त्वाचं म्हणजे हा समाज पिंगळा, पांगुळ, कुडमुड्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या हातातल्या छोट्या डमरूचा ‘कुडमुड’ असा आवाज येतो, म्हणून ते कुडमुडे जोशी. ते भल्या पहाटे ज्या प्रहरी बाहेर पडतात, तो काळ पिंगळा (म्हणजेच घुबड) पक्षाच्या किजबिजण्याचा असतो. ते किजबिजणं म्हणजे बोलणं या समाजाला समजतं आणि त्यावरून ते शुभ-अशुभ शकुन सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी. यांनाच पांगुळ असंही म्हणतात. कारण ते ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात, तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला, तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरूणाचं आगमन झालेलं असतं. हा अरुण पायाने अधू असल्यामुळे त्याला पांगुळ असं लोकभाषेत म्हटलं जातं. साहजिकच त्यावरुन एवढ्या पहाटे बाहेर पडणार्या या समाजालाही ‘पांगुळ’ म्हणजे पांगळा हे नामाभिधान चिकटलं. एकप्रकारे पांगुळ हा अरुणाचा प्रतिनिधीच मानला जातो. लीळाचरित्र आणि नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकारामांच्या काव्यात याच पांगुळाचे दाखले सापडतात. 

मृत्युलोका माझारी गा एक सद्गुरू साचार,
त्याचेनी दर्शने तुटला हा संसार
पांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार,
यालागी नाव त्याचे वेदा न कळे पार...

असं पांगुळावर रूपक ज्ञानेश्वरांनी केलं आहे. तर एकनाथांनी ‘मी माझ्या कल्पनेने जाहलोसे पांगूळ, हिंडलो दिशा दाही श्रम जाहला केवळ’ असं भारुड लिहिलं आहे. एकूण लोकपरंपरेत महत्त्वाचा मानला गेलेला लोकप्रतिनिधी पिंगळा किंवा पांगुळ याचं पहाटेपूर्वीच्या अंधःकारमय कालखंडाशी अतूट नातं आहे आणि जणूकाही नव्या दिवसाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी तो गावात येतो.

. . .

अर्जुनराव, सोनबा, सर्जेराव भल्या पहाटे गावात येऊन असंच शुभवर्तमान सांगून आपल्या वस्तीवर परत गेले होते. मागे थांबून त्यांच्या परंपरेचा माग घेईपर्यंत सूर्व्यादेव उगवला होता. मग मी सूर्यकांत भिसे यांना सोबत घेऊन पुन्हा त्यांच्या वस्तीवर जायला निघालो. त्यांच्या वस्तीवर पोचलो, तोपर्यंत सार्यांना जाग आली होती, बाया-बाप्ये आपापल्या कामाला लागले होते. रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर पोचलो, तेव्हा सारं छानछान वाटत होतं. एखाद्या फार्महाऊसवर आल्यासारखंच वाटलं होतं. पण आता दिवसाउजेडी वस्ती पाहताना आमच्या परंपरेने मागत्यांच्या या समाजाला पाडलेली ठिगळं जागोजागी दिसू लागली. परंपरेने यांना कधी एका जागी स्थिर केलंच नाही. पोटा-पाण्याच्या उद्योगासाठी हा समाज महाराष्ट्रभर गाव-दरगाव भटकत राहिला. त्याच्या हक्काचा ना गावात तुकडा होता, ना रानात. नावाला कुठलं तरी एखादं मूळ गाव. पावसाचे चार महिने बुड टेकण्यासाठी. बाकीचे आठ महिने घोडा किंवा गाढवाच्या पाठीवर किडुकमिडुक संसार लादून फिरत राहायचं. गावाच्या वेशीबाहेरची उघड्यावरची पडीक जमीन, किंवा अगदी स्मशान, हीच त्यांची उतरायची हक्काची जागा. ती तरी हक्काची कुठली? अर्जुनराव आणि सूर्यकांत भिसे सांगतात-‘पोलिस पाटलाने उतरायची परवानगी दिली, तरच आजही गावाच्या बाहेर पिंगळ्यांना तळ ठोकता येतो. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद त्यांना आधी पोलीस पाटलाकडे करावी लागते. कारण गावात चोरी-मारी झाली, तर गाववाले सगळ्यात आधी बाहेरुन आलेल्या फिरस्तांवरच संशय घेतात.’
यामुळेच आजवर कधी या समाजाने संसारात फार काही जोडलेलं-सांभाळलेलं नाही. गावात शकुन सांगून जे कमवायचं, ते त्या गावातच खाऊन पुढे निघायचं. म्हणजे कुणाचे आरोपही नकोत आणि कुणाचे शिव्याशापही नकोत. पण त्यामुळेच आजवर हा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्टया मागासलेलाच राहिला. एका जागी स्थिर नसल्यामुळे मुलांना शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेलं त्यांच्यामागचं हे दुष्टचक्र आता भारतीय स्वातंत्र्याला साठ वर्षं होऊन गेल्यावरही संपलेलं नाही. किंबहुना आधीची परिस्थिती बरी होती, असं सोनबा-सर्जेराव सांगतात. कारण तेव्हा देवा-धर्माच्या नावानं समाजात किमान काही मान होता. पिंगळा दारात किंवा गावात आलाय म्हटल्यावर, गावकरी आदराने स्वतःहून काही आणून झोळीत टाकत होते. पण नव्या विज्ञानयुगात, परंपरेने चालत आलेल्या समाजव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. ते साईबाबा-सिद्धिविनायक अशा मंदिरातील दानपेट्यांत लाखो रुपये टाकतील. पण दारावर आलेल्या मागत्याला पाच रुपयेही देणार नाहीत. मग तो स्वतःची काही कला दाखवत असला, तरीही... 

. . .

... एव्हाना अर्जुनरावांनी चहाचा कप पुढ्यात आणून ठेवला होता. मोकळ्या माळरानावरच्या त्यांच्या खोपट्यातल्या चहाला वेगळीच चव होती. दूध दारातच बांधलेल्या म्हशीचं होतं. तर मुंबईवरून आलेला पाव्हणा म्हणून चहात सढळ हाताने साखर घातलेली होती. सकाळचं दान मागून झालेलं असल्यामुळे स्वारी मोकळी होती. दुपारच्या जेवणाला थांबणार का असं विचारुन, वर बोकड कापायचा का? असंही विचारत होती. पै-पाहुण्याच्या आणि सण-वाराच्या निमित्ताने उत्सव करायचा ही या समाजाची वृत्ती. ते साहजिकच होतं. कारण एरव्ही त्यांच्या आयुष्यात आनंदाचे-सुखाचे क्षण कमीच असतात. मग ते आनंद साजरा करण्याची संधीच शोधतात. ती संधी त्यांना कुणा पाव्हण्याचं आगमन, देवीची यात्रा-जत्रा, कुणाचा जन्म, कुणाचं लग्न अशावेळी मिळते आणि अशावेळी मटणाचं जेवण ठरलेलं.
मांसाहार या समाजाला अतिशय प्रिय. त्यामुळे मूल जन्माला आला की त्याच्या पाचवीला या समाजात बोकड कापला जातो. मात्र मुलगा झाला, तर बोकड आणि मुलगी झाली तर बकरी कापण्याची पद्धत आहे. यांच्या लग्न समारंभात भात, वांग्याची भाजी आणि गव्हल्याची लापशी ठेवावीच लागते. पण लग्नातलं एक जेवण बोकडाचं दिल्याशिवाय वधू-वरांच्या घरच्यांची सूटका नसते. या समाजात लग्नानंतर देवीचा गोंधळ किंवा खंडोबाचं जागरण करण्याची पद्धत आहे, तेव्हाही तिखटाचंच जेवण लागतं. मराठ्यांप्रमाणंच खंडोबा-जोतिबा-तुळजापूरची भवानी, ही या समाजाची कुलदैवतं. त्यांची आडनावंही तशीच जाधव, भोसले, मोरे, निकम, शिंदे, सूर्यवंशी. पण या समाजात कुलदेवतांप्रमाणेच जिथे राहतो, पाल ठोकतो, तिथल्या मरीआई-लक्ष्मीआईला मानाचं स्थान असतं. आषाढी एकादशीनंतर या समाजाची या ग्रामदेवतांची जत्रा भरते. त्या जत्रेला सगळा समाज एकवटतो. त्या जत्रेत दावणाचे म्हणजे नवसाचे बोकड कापले जातात.
या गावदेवतांच्या जत्रेला या समाजात मानाचं स्थान आहे. कारण या निमित्ताने सगळा विखुरलेला समाज एकत्र येतो आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांची जातपंचायत भरते. समाजातले न्यायनिवाडे, भांडणतंटे या जातपंचायतीतच मिटवले जातात. लग्न ठरणं आणि मोडण्यासारखे प्रकारही या जत्रेतल्या पंचायतीत होतात. महाराष्ट्रभर विखुरलेल्या पिंगळ्यांच्या अशा भरणाऱ्या जत्रा आणि त्यातल्या जातपंचायतीतून अनेक सामाजिक-आर्थिक उलाढाली होत असतात. गेल्या काही वर्षातील एकूणच सामाजिक प्रबोधनामुळे समाजातील जातपंचायती आता पूर्वीसारख्या ताठर भूमिका घेत नाहीत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या शिक्षाही आता सुनावल्या जात नाहीत. तरीही या समाजाला अद्याप जातपंचायत मात्र हवीशी वाटते. कारण समाजातले काही प्रश्न फक्त समाजाची जातपंचायतच सोडवू शकते, असं या समाजाचं म्हणणं आहे. तसंच एकाच जागी वस्ती नसल्यामुळे न्यायासाठी पोलिसांच्या पाठी कुठे धावायचं, असंही त्यांचं म्हणणं असतं. पिंगळा किंवा त्यांच्यासारख्या मागत्यांच्या या जातपंचायतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या माध्यमातून चालवण्यात येणारी भिशी. जातपंचायतीच्या दिवशी फुटणाऱ्या या भिशीत अक्षरशः लाखोंचे व्यवहार होतात. ही एकप्रकारे या समाजाची पूर्वापार चालत आलेली बचतगट योजना आहे. समाजातील पाटलाच्या हाती या भिशीचे व्यवहार असतात. ज्याला गरज असते, तो उचल घेतो. त्या रकमेवर एक ते दोन टक्के व्याज आकारलं जातं. महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्षं होणाऱ्या या भिशीच्या व्यवहारात आजवर कधीही घोटाळा झालेला नाही किंवा कधी कुणी पैसे बुडवलेले नाहीत. ज्याने उचल घेतलेली असते, तो एकवेळ जिवाचं रान करील, पण ठरल्यावेळी पैशांची परतफेड करणार म्हणजे करणारच. कारण जातपंचायतीत नावाला लागलेला बट्टा, हा या समाजात कलंक मानला जातो. आजही या समाजाला आपल्या जातपंचायतीची भीती वाटते आणि तिच्यात आपली अब्रू जाऊ नये म्हणून हा समाज स्वतःला जपत असतो. आता एकूणच सुधारणेच्या काळातील सामाजिक रेट्यामुळे फिरस्त्या समाजातील जातपंचायती बरखास्त होत आहेत. पण या समाजांचं म्हणणं आहे - ‘आम्हाला आधी एका जागी स्थिर तर करा. तुमच्या समाजव्यवस्थेत आम्हाला सामावून तरी घ्या आणि मग आम्हाला तुमचे कायदेकानून लागू करा.’    

...चहा पीत गप्पा मारता-मारता अर्जुनराव, सोनबा, सूर्यकांत भिसे सामाजिक-सांस्कृतिक माहिती पुरवत होते. या गप्पा चालू असताना मध्येच वस्तीवरचे कोण कोण अर्जुनरावांना काहीबाही विचारायला येत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात होणारी चर्चा मला बिलकूल कळत नव्हती. माझ्याशी बोलताना अर्जुनराव किंवा सोनबा नेहमीच्या, मला समजेल अशा मराठीतच बोलत होते. परंतु समाजातलं कुणी आलं की ते त्यांच्या सांकेतिक बोलीत बोलत होते. पिंगळ्यांची किंवा एकूणच भटक्या-फिरस्त्या समाजाची आपापली सांकेतिक भाषा असते. पिंगळा समाज त्यांच्या या सांकेतिक भाषेला ‘पारोशी’ भाषा म्हणतो. ती फक्त त्यांच्या समाजातल्या लोकांनाच कळते. उदाहरणार्थ माणसं आली पळा, असं म्हणायचं असतं, तेव्हा ते म्हणतात- मानवं आली खपला. किंवा वेळ आली याऐवजी ते ‘बानी आली’ असं म्हणतात. अशावेळी ते आपल्यासमोर आपलीच निंदा करत असतील, तर तेही आपल्याला कळायचं नाही. म्हणूनच तुम्ही माझ्याबद्दल तर काहीबाही बोलत नाही ना, असं विचारल्यावर अर्जुनराव खळखळून हसले आणि म्हणाले- पाव्हण्यांबद्दल आम्ही कधी वाकडा शब्द काढत नाही. समोरच्याला एकदा आपलं म्हटलं की तो आपला. 
ते खरंही होतं. आदल्या दिवशी रात्रीपासून त्यांच्या वस्तीवर ठोकलेल्या मुक्कामातल्या अनुभवातून ते सिद्धच होत होतं. खरंतर परक्या समाजातल्या, किंबहुना अनोळखी शहरी माणसाला फिरस्ते समाज कधीच आपल्या पालावर थारा देत नाहीत आणि त्यांच्याशी फार बोलतही नाहीत. कारण ही पोलिसांची माणसं तर नाहीत, अशीच त्यांना सतत धास्ती असते. आणि आजवर सुशिक्षित समाजानेही त्यांना कधी आपलं मानलं नाही. त्यांच्याकडे कायम संशयानेच पाहिलं. त्यामुळे नागर वस्तीतला कुणी त्यांच्याकडे गेला, की ते सुद्धा त्याच्याकडे संशयानेच पाहतात. पण अर्जुनरावांच्या चव्हाण वस्तीवर मला आलेला अनुभव चांगला होता. आपला माणूस मानून त्यांनी संपूर्ण वस्ती फिरवली. वस्तीतल्या माणसांची गाठभेट घालून दिली.
वेळापूरहून दोन-तीन किलोमीटरवर असलेली ही चव्हाणवस्ती, म्हणजे काही आखीवरेखीव कॉलनी किंवा गावही नाही. किंवा सगळ्यांची अगदी पक्की घरंही नाहीत. पण त्यांना बूड टेकायला हक्काची जागा मात्र आहे. सूर्यकांत भिसे यांनी आपल्या ‘भटके-विमुक्त विकासमंच’ या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळेच गृहमंत्री असताना अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी वेळापूर गावाच्या बाहेर असलेला माळरानाचा एक तुकडा फिरस्त्या जोशी समाजाला दिला. त्यात वासुदेव, नंदीबैलवाले असे सगळेच जोशीसमाज एकत्र आहेत. या सगळ्या पन्नास-शंभर उंबर्याच्या वस्तीत पंधरा-वीस घरं पिंगळ्यांची आहेत. या पिंगळ्यांना याच अकलूज-माळशिरस परिसरातील गावं पंरपरेने मागत्यांची वतनं म्हणून मिळालेली. हक्काचं असं कुठलं गावं नव्हतंच. मग संधी मिळताच इतर जोशीसमाजांबरोबर पिंगळेही वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीत मुक्कामी आले. आता गेली पंधराएक वर्षं त्यांची मुक्काम एकाच जागी आहे. महत्त्वाचं म्हणजे सूर्यकांत भिसे आणि मोहिते-पाटलांमुळे त्यांच्या नावावर आता रेशनकार्ड आहे. त्यातल्या अनेकांची नावं मतदारयादीतही गेलीत. आजवर बूड एका जागी स्थिर नसल्यामुळे त्यांना मत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांना पतही नव्हती. मात्र एकाच जागी स्थिर झाल्यावर त्यांच्याकडे मत आणि पत दोन्ही गोष्टी चालून आल्यात.
सगळ्यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे एका जागी स्थिर झाल्यामुळे सूर्यकांत भिसे यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि नवी पिढी शिकू लागली. यातून चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांच्या कुटुंबातील अनेकजण आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कामाला लागले आहेत. काहीजण सैन्यातही गेलेत. तर जे वस्तीवरच राहिले, त्यांनी घोडे नाचवण्याचं कसब शिकून घेतलं आणि आता ते वरातीत-मिरवणुकीत घोडे नाचवण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी थेट मध्यप्रदेशापासून बेळगाव-बेंगळुरूपर्यंतची काही हजारांची सुपारी घेतात. सूर्यकांत भिसे सांगतात- ‘घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड टाकून हिंडत असल्यामुळे पूर्वापारपासून यांच्याकडे घोडा हाताळायची हातोटी होतीच. पण गेल्या काही वर्षांपासून अकलूजला घोड्यांची जत्रा भरायला लागल्यावर, त्यांच्या या हातोटीचा उपयोग झाला. त्यातून या जत्रेतून त्यांना उधारीवर घोडे विकत मिळू लागले. या घोड्यांना नाचायला शिकवूनच आता या समाजातील तरुण त्याचा व्यवसाय करत आहेत.’
सूर्यकांत भिसे ही माहिती सांगत असतानाच अर्जुनरावांच्या मुलाने त्यांच्या दारातला घोडा आणला आणि त्याला नाचवायला सुरुवात केली. त्या घोड्याची दुडकी चाल पाहताना खरोखर मजा वाटत होती. फक्त त्याची दुडकी चाल पाहतानाच नाही, तर वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या समाजाने एका जागी स्थिर झाल्यावर, स्वतःचा जो उत्कर्ष साधला, तो पाहतानाही आनंद वाटत होता. मग भले त्यांची घरं अजून खूप छान नसतील, अजूनही काहीसं ठिगळं लावलेलं आयुष्यच  त्यांच्या वाट्याला आलेलं असेल, पण त्यांच्या खर्या अर्थाने जगण्याला सुरुवात तर झालेली आहे. त्याचाच आनंद वाटत होता.
अन् तरीही एकीकडे आनंद वाटत असताना, दुसरीकडे दुःखाचेही कढ येतच होते. कारण चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांसारखं भाग्य महाराष्ट्रातील प्रत्येक पिंगळ्यांच्या वाटेला अजून आलेलं नाही. त्यांचं पाल-दर पाल भटकणं अजून सुरूच आहे. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षात या भटक्या कलावंत समाजांच्या विकासासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संघटना उभ्या राहिल्या आहेत. पुण्यात ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटना’ आहे. मराठवाड्यात लातूरला ‘भारतीय भटक्या-विमुक्त जमाती विकास संघटना’ आहे. या संघटनांचे नेते अनुक्रमे दिलीप परदेशी आणि प्रा. सुधीर अनवले भटक्या समाजांसाठी काम करत आहेत. त्यांना एकत्र आणत आहेत. सोलापूरच्या बाळासाहेब रेणके यांच्या ‘लोकधारा’ संघटनेनेही गेल्या काही वर्षांत भटक्यासांठी मोठं काम उभं केलं आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागला आहे. ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटने’चे अध्यक्ष दिलीप परदेशी सांगतात- महाराष्ट्रात फिरस्त्या जोशी समाजाची लोकसंख्या ३ ते ४ कोटी असेल. त्यातून पिंगळासमाजाची लोकसंख्या ५ ते ७ लाख असेल. आजवर हा समाज कधीच एकत्र न आल्यामुळे त्याची ताकद राजकीय पक्षांना अजून कळलेली नाही. म्हणून अाम्ही आधी या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण दर तीन दिवसांनी बदलावं लागणारं गाव, परिणामी शिक्षण नाही, शासकीय सवलती नाहीत. अशी या समाजाची कुचंबणा सुरू होती. पण माझ्या प्रयत्नांमुळे अनेकांना जातीचे दाखले मिळालेत. उर्वरित समाजालाही ते मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य म्हणजे आम्ही आर्थिक विकासाबरोबरच समाजाच्या सामाजिक विकासावरही भर देतोय. कारण सामाजिक विकास झाला नाही, तर समाज इतर समाजांच्या तुलनेत मागासलेलाच राहील. म्हणूनच गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षणाचा प्रसार करतानाच, समाजातील काही जुन्या चालीरिती मागे टाकण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ या समाजात आतापर्यंत विधवाविवाहाची किंवा परित्यक्तेला पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. त्यामुळे समाजातील अनेक महिलांना जगणं म्हणजे ओझं वाटू लागलं होतं. परंतु आता अशा महिलांसाठी म्होतुर लावण्याचा, म्हणजे पुनर्विवाहाचा पर्याय संघटनेने केलेल्या प्रबोधनामुळे समाजाने स्वीकारलेला आहे.’ 
विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे महाराष्ट्रभर विखुरलेला जोशी समाज आणि त्याच्या अंतर्गत पिंगळाही आता एक होऊ लागला आहे. नव्या सामाजिक-आर्थिक-राजकीय बदलाला सामोरं जाण्याची आस त्याच्यातही निर्माण झालेली आहे. त्यासाठी फक्त आपल्या पोटजातीत वस्ती करण्याऐवजी, तो संपूर्ण जोशी समाजात स्वतःला सामावून घेत आहे. अशा जोशी समाजाच्या आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये  मोठ्या कॉलन्याही आता उभ्या राहत आहेत. विशेषतः नगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत तर भटक्या जोशीसमाजाच्या मोठमोठ्या कॉलनीज आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगावमधील जोशी कॉलनीच्या जीवावर तिथला आमदार निवडून येतो. म्हणजे या समाजाला आता आपली समाजातली पत आणि ताकद कळलेली आहे.
आजवर नसलेली ही पत-प्रतिष्ठा हा समाज एकत्र आल्यावर आणि त्याने एकाच जागी वस्तान ठोकल्यावरच त्याला प्राप्त झालेली आहे. वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीवरील अर्जुनरावांच्या घरासमोर बसल्याबसल्या महाराष्ट्रातल्या एकूणच जोशी समाजाची आणि त्यातही पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी ऊर्फ पांगुळ समाजाची नाडीच जणू माझ्या हाती लागली होती. खरंतर एवढी वर्षं इतरांना भविष्य आणि शकुन सांगणार्या या समाजाला स्वतःचंच भविष्य उमगलं नव्हतं.
... पण आता पालापालांवर तांबडं फुटलंय. आपलं भविष्य आपल्याच हातात असल्याचं या भटक्यांनाही उमगलंय...
…..
('अनुभव' मासिकासाठी केलेल्या 'भटक्यांच्या पालावर' या पाच भागांच्या मालिकेतील पिंगळा समाजावरचा लेख)






७ टिप्पण्या:

  1. छान लेख आहे.खूप महत्वाची माहिती दिली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप आभार मानतो, महत्वाची माहिती दिली. मी पण एक पांगुळ आहे,

    उत्तर द्याहटवा
  3. महत्वाची माहिती आहे. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा