बुधवार, २० मे, २०१५

दोन टिपणं : पाणी आणि नागाची


पाण्याची ओढ आणि भीती

.

ज्याची भीती वाटते, त्याचीच ओढ माणसाला का लागते? हे कसलं जीवघेणं आकर्षण आहे? काय नातं आहे भीतीचं न् ओढीचं? की एक मन नको नको म्हणत असताना, दुसरं मन तेच पुनःपुन्हा करायला धजावतं... ? पाण्याविषयी अशीच ओढ न् भीती मनात खोलवर रुजलीय. एकीकडे पाण्यात जाणंही नकोसं वाटत असताना, दुसरीकडे मात्र पाण्याच्या गूढगर्भी जाऊन त्याचं अंतरंग जाणून घ्यावंसं वाटतं. एका क्षणी पाण्याला दूर लोटावंसं वाटत असताना, दुसऱ्याच क्षणी त्यात गुरफटून जावंसं वाटतं.

कधी निर्माण झाली असेल, पाण्याची ही ओढ न् भीती मनात? काय नातं असेल पाण्याचं नि माझं? की जीवनदायी पाणी अचानक मरणदायी वाटू लागावं!

आठवणींचे डोह उपसायला लागलं की थेट बालपणात जायला होतं. शांत मौनाची रात्र असते. आईच्या कुशीत नितांतगाढ झोप लागलेली असते...

... आणि अचानक पाण्याचे तरंग भोवती उमटू लागतात. आधी मजा वाटते, पाण्यात हात आपटत थबक थबक करताना. पण लवकरच लक्षात येतं, पाणी नेहमीप्रमाणे जमिनीवर पसरलेलं नाही. त्यानं कोंडाळं केलंय आपल्याभोवती. मग आधीची पाण्याच्या ओढीची जागा भीती घेते आणि लहानग्या जीवाचा एकच आटापिटा सुरू होतो, जीव वाचवण्याचा. तो बालजीव जोरजोराने पाण्यात हात आपटू लागतो, पाणी पसरून जावं म्हणून. पण पाणी नाहीच हटत. ते घालत राहतं वेढा आणि घुसमटत जातो मग जीव...नि तोंडातून फुटते एक प्राणांतिक किंकाळी!

ती किंकाळी ऐकून आई जागी होते नि विचारते- बा सपान पाह्यलास? नीज, घाबरू नकोस. सटवाय आली असंल माझ्या लेकराला खेळवायला!

तो सटवाईचा खेळ होता की कुणाचा ठाऊक नाही, पण पाण्याची ओढ आणि भीती तिथेच निर्माण झाली एवढं नक्की! जी पुढे वाढतच गेली... किंबहुना वाढत्या वयात पावलोपावली भेटत राहिली. कधी गावातल्या नदीत असलेल्या डोहाच्या निमित्ताने, कधी आईनेच दाखवलेल्या तिच्या माहेरच्या विहिरीच्या निमित्ताने, तर कधी भटकंतीत गावोगावी भेटणाऱ्या तलावांच्या निमित्ताने.

नदी, डोह, विहीर, तलाव... सगळ्याच एका परीने पाणवठ्याच्या जागा. सगळ्यांची तृष्णा भागवणाऱ्या. पण तहानलेल्यांची तहान भागवतानाच, अडल्या-नडलेल्यांच्या जीवाचा स्वाहादेखील करणाऱ्या. म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारकही. पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा चित्तचक्षुचमत्कारिक कथा आईने लहानपणी कितीतरी सांगितलेल्या.  स्वप्नांत पाहिलेल्या पाण्याची ओढ अन् भीती त्या कथांतून अधिकच गडद होत गेलेली.

आजही सगळ्यात पहिला आठवतो तो, तिने दाखवलेला गावच्या नदीतला गिऱ्होबाचा डोह. खोल खोल काळंशार पाणी असलेला. सबंध विश्वातला काळोख जणू त्या डोहाच्या तळाशी साठवलेला असावा, असं तो डोह पाहून वाटायचा. त्या काळोख्या पाण्याची भीती आजही मनातून गेलेली नाही. पण त्या काळ्याशार पाण्यातच काहीतरी सर्जनशील होतं, असं मात्र कायम वाटत आलंय. कदाचित विश्वाचं आर्त त्यातच सामावलेलं होतं की काय कुणास ठाऊक... आणि आर्ततेतच सर्जन दडलेलं असतं.

तिने दाखवलेली माहेरची विहीरही खास होती. तिच्या माहेरच्या वाटेवरच होती. पहिल्यांदा बालसुलभ वृत्तीने डोकावलो विहिरीत, तिने खसकन् मागे ओढलं. पण नंतर त्या विहिरीची कथा सांगितली. त्या विहिरीचा तळ खुणावतो म्हणे कुणाकुणाला. त्या विहिरीत एक मासा होता आणि त्याच्या नाकात मोती होता, म्हणे... तो मासा कुणाला दिसला की त्याला विहिरीत उडी घेण्याचा मोह व्हायचा.

लोकरहाटीतल्या पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा अनेक गोष्टी आई सांगायची. तिच्या तोंडून त्या ऐकताना सगळ्यात आधी त्या सगळ्याची भीती वाटायची. पाणी आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतंय असं वाटत राह्यचं. पण पाण्याच्या गोष्टींचा शेवट ती गोड करायची, सात आसरांची गोष्ट सांगून. ती सांगायची- पाणवठ्यांच्या तळाशी कितीही बुडालेले आत्मे असले, तरी त्यांच्या काठाशी मात्र असतात सात आसरा. या आसरा म्हणजेच जलअप्सरा. पाण्यात उतरताना त्यांची आठवण ठेव, त्या सगळ्यांपासून तुझं रक्षण करतील!

...तेव्हापासून पाण्याची भीती असली, तरी आईने सांगितलेल्या जलअप्सरा असतीलच, पाठीशी, याची खात्रीही असते....

................................

नागाच्या माणूसपणाच्या गोष्टी


लहानपणी श्रावणात कधीतरी गावाला असताना आईबरोबर नाग पूजायला गेलो होतो. गावाबाहेर नदीच्या काठावर कळकीचं बेट होतं. त्या बेटात कंबरभर उंचीचं आडवं पसरलेलं वारुळ होतं. लालभोर मातीचं. आडव्या पसरलेल्या त्या वारुळात लहान-मोठ्या उंचीची आठ-दहा शिखरं होती. आडवा पसरलेला छोटा हिमालयच जणू! आईसकट जमलेल्या सगळ्या महिलांनी पूजा करून वारुळावर लाह्या-फुलं उधळली. लोटीत आणलेलं दूध वेगवेगळ्या शिखरांत ओतलं. अन् नंतर वारुळाभोवती फेर धरून साऱ्याजणी गाणी म्हणू लागल्या. गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काहीतरी हालचाल दिसली. थोड्याच वेळात दहाचा आकडा असलेला फडा उभारून काळा कुळकुळीत नाग बाहेर आला. मी घाबरून पटकन आईला बिलगलो. तसं लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून ती लगेच म्हणाली- घाबरू नको. आम्हा बहिणींना भेटायला आलाय तो. आलाय तसा जाईल. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून... त्यानंतर आई कितीतरी गोष्टी सांगत राहिली. नागाच्या माणूसपणाच्या! कधी तो भाऊ म्हणून कसा येतो, तर कधी प्रियकर म्हणून कसा येतो, त्याच्याही. आणि तेव्हापासून नाग हा माझ्या कल्पनासृष्टीतला एक अविभाज्य घटक झालाय. तो मला सर्पकुळातला वाटतच नाही. आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस वाटतो. तो दिसला की त्याची भीती वाटते, तरीही त्याला पाहायचा मोह मात्र आवरत नाही. जिथे-कुठे त्याचं दर्शन घडतं - वाटत राहतं, तो कुणाला तरी संकेतस्थळी भेटायला आलाय. किंवा कुणाला तरी माहेरपणाला न्यायला तरी... मग उगीचच इकडे-तिकडे पाहतो, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहतो. खास करून त्याच्या वारुळाभोवती...

खरंतर वारुळ हे त्याचं घर नव्हेच. ते मुंग्यांनी केलेलं असतं. पण मुंग्यांनी केलेल्या आयत्या घरात, म्हणजे बिळात नाग जाऊन राहतो आणि तोच त्याचा स्वामी होतो. आता वारुळ आणि नाग हे समीकरण लोकसंस्कृतीत छान रुजलंय. वारुळ हे सर्जनशील भूमीरूपाचं-स्त्रीतत्त्वाचं प्रतीक. तर नाग हे पुरुषतत्त्वाचं चैतन्याचं प्रतीक. 

म्हणूनच आजही भारतीय ग्रामीण महिलांची श्रद्धा आहे की नाग हा त्यांचा भाऊ तरी आहे, किंवा प्रियकर तरी. त्यामुळे शेतात, रानात, वाटेत कुठेही वारुळ दिसलं की, त्या आदराने नमस्कार करतात आणि आपल्या भाऊरायाचं कुशल चिंततात. तसंच त्याची कामनाही करतात.

नागाच्या या मनुष्यरूपाचा आईने लहानपणी माझ्यावर केलेला संस्कार अजून पुसला गेलेला नाही. किंबहुना मनात खोलवर रुजलेल्या त्या श्रद्धेतून माझी अजून सुटका झालेली नाही. पत्रकारितेच्या कामानिमित्ताने कुठेकुठे भटकावं लागतं. कधी हौसेपोटीही भटकणं होतं. या भटकंतीत वाटेत कुठेही वारुळ दिसलं की मी थांबतो. मग ते जंगलात असो वा शेतात. आणि मग माझ्याही नकळत माझी पावलं त्या वारुळाकडे वळतात. वारुळाची आणि त्याच्या आत राहणाऱ्या त्याच्या मालकाची वास्तपुस्त करायला. खरंतर मनात प्रचंड भीती असते. कुठून नाग आला आणि चावला तर, याची. तरीही वारुळ दिसलं की ते खोलवर निरखून पाहण्याचा मोह आवरत नाही.

अलीकडेच खानापूरहून बेळगावकडे येत असताना वाटेवरच्या जंगलात एकदम दोन-तीन वारुळं दिसली आणि मी गाडी थांबवली. जवळ जाऊन ती लालभोर मातीची वारुळं निरखू-पारखू लागलो. त्या वारुळांचे उंचवटे, म्हणजे शिखरं अतिशय सुरेख होती. अगदी आखीवरेखीव. नागाच्या डौलदार चालीला शोभतील अशी. ते निरखणं सुरू असतानाच जवळच्या झुडुपात काही तरी सळसळलं. अन् भीतीने अंगावर काटा उभा राहिला. त्या भीतीचा मनातून निचरा होण्याआधीच पुन्हा झाडात सळसळ झाली. आवाजाचा मागोवा घेत तिकडे पाहिलं, तर एक काळाशार नाग तिथून जात होता. त्याच्या दर्शनाने मन सुन्न झालं. लगेच तिथून बाहेर पडण्याची घाईही झाली.

...अन् तरीही परवा अकलूजजवळच्या वेळापूरच्या वाटेवर शेतात दिसलेलं काळंभोर वारुळ पाहण्याचा मोह आवरला नाहीच. ते पाहण्यासाठी खाली उतरलोच. ते पाहताना उगाचंच वाटत राहिलं, या वारुळातला भाऊराया गेला असेल का कुणा बहिणाबाईला आणायला किंवा आपल्या प्रेयसीला भेटायला...

नाग दिसेल ना दिसेल. त्याचं वारुळ दिसलं की आईने सांगितलेल्या त्याच्या माणूसपणाच्या गोष्टी आठवत राहतातच...


1 टिप्पणी:

  1. सुंदर लिहिलं आहे.
    डोहामधे, वारुळात डोकावून बघण्याचं आकर्षण आणि भिती सनातन आहे बहुधा.
    पहिलं टिपण वाचून मिलेचं ओफेलिया पेंटींग आठवलं.

    उत्तर द्याहटवा