बुधवार, २५ मार्च, २०१५

सर्जनमूर्ती रेणुका

...अन् नेमक्या त्याच क्षणी तिच्या नजरेला चित्ररथ गंधर्वाची त्याच्या स्त्रियांची कामोन्नत जलक्रीडा पडली. भांबावूनच गेली रेणुका. त्यांची क्रीडा बघावी की बघू नये, या संभ्रमात असतानाच तिच्या मनाने आणि डोळ्यांनी दगा कधी दिला ते तिचं तिलाही कळलं नाही.

रेणुकेचं काय चुकलं होतं? साधी मदनबाधा तर झाली होती तिला!

गेली होती नित्याप्रमाणे भल्या पहाटे नव-याच्या म्हणजे जमदग्नीच्या पूर्जेअर्चेसाठी पाणी आणायलाच. पण वेळ पहाटेची होती. चित्त थोडं चंचल होतं. दूर नदीवरून येणा-या वा-याच्या वेगवान झुळका तिची वस्त्रप्रावरणं उडवत होत्या. खूपच हलकं वाटत होतं रेणुकेला. पण नेमक्या या मनोवस्थेनेच घात केला. रेणुका पोहोचली नदीवर. तिने नेहमीप्रमाणे नदीत स्नान करून स्वत:ला शूचिर्भूत करून घेतलं. नदीच्या पहाटेच्या थंडगार पाण्याने आधीच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते..

.. अन् नेमक्या त्याच क्षणी तिच्या नजरेला चित्ररथ गंधर्वाची त्याच्या स्त्रियांची कामोन्नत जलक्रीडा पडली. भांबावूनच गेली रेणुका. त्यांची क्रीडा बघावी की बघू नये, या संभ्रमात असतानाच तिच्या मनाने आणि डोळ्यांनी दगा कधी दिला ते तिचं तिलाही कळलं नाही. ती क्षणभर पाहातच बसली चित्ररथाची त्याच्या स्त्रियांची जलक्रीडा. तिच्या मनाने लगेच तिच्या जमदग्नीच्या जलक्रीडेची कल्पनाही केली. पण त्या कल्पनेला धुमारे फुटण्याआधीच रेणुका आली भानावर. तिला माहीत होतं तिचं पहाटेचं परमकर्तव्य.

तिने भराभर नदीतल्या वाळूची घागर करायला सुरुवात केली. पण घागर काही होईना आणि नेहमीप्रमाणे तिच्यासोबत असलेल्या नागाची चुंबळही बनेना. कारण दुस-याचा प्रणय पाहून चित्त चळल्यामुळे लगेच तिचं सत्त्व गेलं म्हणे लयाला. अगदीच घाबरीघुबरी झाली रेणुका. बिचारी भीतभीत पाणी घेताच आश्रमाकडे परतली. रित्या हाताने आलेल्या रेणुकेला पाहून जमदग्नी काय समजायचे ते समजले आणि तिथेच तिला स्वैराचारी ठरवून त्यांनी आपल्या पुत्रांनाच केली आज्ञा मातेचा शिरच्छेद करण्याची.

पहिल्या तीन पुत्रांनी दिला नकार मातेचा शिरच्छेद करायला. पण चौथा जमदग्नी म्हणजे परशुरामाने केलं लगेच पित्याच्या आज्ञेचं पालन पितृकर्तव्य म्हणून. काय झालं हे मातेला विचारण्याचं साधं सौजन्यही दाखवलं नाही त्याने. मात्र मातेचा शिरच्छेद केल्यावर प्रसन्न होऊन पित्याने वर माग म्हणताच, त्याने पुन्हा रेणुकेला जिवंत करण्याची मागणी केली. म्हणजे परशुरामाने दोन्हीकडून डाव साधला. एकीकडे पित्याच्या आज्ञेचं पालन करून पित्यालाही खूश केलं आणि मातेला जिवंत करण्याचा वर मागून मातृप्रेमीही ठरला.

पण रेणुका नाहीच झाली जिवंत पूर्ण रूपाने. कारण आपलं काय चुकलं, हेच तिला कळलं नाही शेवटपर्यंत. चित्त चळलं हे तिलाही मान्य होतंच, मात्र आपण परपुरुषाची इच्छा बाळगली नाही, यावरही ठाम होती ती. त्यात नवरा आणि मुलगा दोघांनीही एकप्रकारे अविश्वासच दाखवला तिच्यावर. ही खंत असेलच तिच्या मनात. बहुधा म्हणूनच पुन्हा जिवंत होण्याची संधी चालून आलेली असतानाही, ती नाहीच झाली पूर्ण जिवंत. जगाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्जनभागाला तिने चैतन्य दिलं. पण मनाचा कायम दगडच केला. कदाचित आपल्या मनीच्या वेदना कुणाला कळणार नाहीत, असंच तिला वाटलं असेल. अर्थात, मनाचा दगड करताना सर्जनाचा उत्सव करायला ती विसरली नाही. ती प्रकटही झाली त्याच रूपात. खरं तर सर्जनशीलता हाच रेणुकेचा विशेष होता. गर्भात पडलेलं कसलंही बी रुजवण्याची क्षमता असलेली भूमीच तर होती रेणुका.

रेणूपासून बनलेली म्हणून रेणुका. सगळ्या सर्जनतत्त्वांना आपल्यातच सामावून घेऊन नवनिर्मिती करण्याची क्षमता तिच्याच ठायी होती. मग सर्जनेशीलतेचं प्रतीक असलेली रेणुका दुस-या कुणाचा प्रणय बघून चळली, तर त्यात बिघडलं कुठं? बरं दुस-याचा प्रणय बघून तिने मनोमन इच्छा कुणा परपुरुषाची नव्हतीच केली. तिने इच्छा जमदग्नीचीच धरली होती आणि तरीही तिला शिक्षा मिळाली शिरच्छेदाची. मोठाच अन्याय झाला रेणुकेवर. स्थळपुराणांनी किंवा तिच्यावर रचल्या गेलेल्या महात्म्यांनी नाहीच फोडली वाचा तिच्या या दु:खाला. पण लोकमानस तिच्या या दु:खावर हळुवार फुंकर घालायला विसरलं नाही. स्त्री पुराणातली असो नाही तर लौकिकातली-आधुनिकातली, तिची आणि तिच्या भावनांची उपेक्षा ठरलेलीच. म्हणूनच सीता असो वा अहल्या त्यांची दुखरी नस लोकमानसालाच उमगली. म्हणून तर चित्ररथ गंधर्वाला पाहून क्षणभर विचलित झालेल्या रेणुकेला हे लोकमानस म्हणतं-

बये गं रेणुका कसं चळलं तुझं मन
काल सपनामधी तुझ्या आला व्हता कोन?
यावर उत्तर देताना रेणुका म्हणते-
पतिव्रता मी नारी देते उत्तर द्यावं ध्यान
सपनात व्हता जमदग्नी आनि दुसरा कोन?

लोकमानसाला, अनागर संस्कृतीला सापडणारी स्त्रीमनाची ही उत्तरं नागर संस्कृतीला कधीच सापडत नाहीत. ती शोधण्याचा साधा प्रयत्नही ते करत नाहीत. कारण तसा प्रयत्न केला, तर तेच उघडे पडण्याचा धोका अधिक असतो. म्हणून मग आहे ते लपवण्याकडेच त्यांचा कल असतो. रेणुकेचं खरं रूप लपवण्यातही हाच डाव आहे. रेणुका मुळातच भूमी म्हणजे सर्जनतत्त्व धारण करणारी योनी असल्यामुळे ती लौकिकात जिवंत राहिली, ती जननावस्थेतील रूपातच. मात्र स्त्रीचं-मातेचं हे जननस्थानदेखील पुरुषांना लाजिरवाणं वाटलं. पुराणात रेणुकेचं जन्मजात सर्जनत्व लक्षात घेता तिला व्यभिचारी ठरवून जमदग्नीने तिचा शिरच्छेद करायला लावला आणि आता कलियुगात सर्जनाचं प्रतीक असलेल्या रेणुकेच्या जननस्थानाला शेंदूर फासून त्याला मुखवटय़ाचा आकार देण्यात आलाय. म्हणजे दोन्हीकडे तिच्या सर्जनाचा संकोचच!

(पुराणातल्या नायिकांच्या चरित्रावर 'वेगळा' प्रकाश टाकणा‍ऱ्या 'प्रहार'मधील माझ्या सदरातील एक लेख)

1 टिप्पणी:

  1. फारच छान! पुराणातील पुरूष प्रधान संस्कृति वर प्रकाश टाकणारा उत्तम लेख! Share केल्याबद्दल धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा