बुधवार, २० मे, २०१५

दोन टिपणं : पाणी आणि नागाची


पाण्याची ओढ आणि भीती

.

ज्याची भीती वाटते, त्याचीच ओढ माणसाला का लागते? हे कसलं जीवघेणं आकर्षण आहे? काय नातं आहे भीतीचं न् ओढीचं? की एक मन नको नको म्हणत असताना, दुसरं मन तेच पुनःपुन्हा करायला धजावतं... ? पाण्याविषयी अशीच ओढ न् भीती मनात खोलवर रुजलीय. एकीकडे पाण्यात जाणंही नकोसं वाटत असताना, दुसरीकडे मात्र पाण्याच्या गूढगर्भी जाऊन त्याचं अंतरंग जाणून घ्यावंसं वाटतं. एका क्षणी पाण्याला दूर लोटावंसं वाटत असताना, दुसऱ्याच क्षणी त्यात गुरफटून जावंसं वाटतं.

कधी निर्माण झाली असेल, पाण्याची ही ओढ न् भीती मनात? काय नातं असेल पाण्याचं नि माझं? की जीवनदायी पाणी अचानक मरणदायी वाटू लागावं!

आठवणींचे डोह उपसायला लागलं की थेट बालपणात जायला होतं. शांत मौनाची रात्र असते. आईच्या कुशीत नितांतगाढ झोप लागलेली असते...

... आणि अचानक पाण्याचे तरंग भोवती उमटू लागतात. आधी मजा वाटते, पाण्यात हात आपटत थबक थबक करताना. पण लवकरच लक्षात येतं, पाणी नेहमीप्रमाणे जमिनीवर पसरलेलं नाही. त्यानं कोंडाळं केलंय आपल्याभोवती. मग आधीची पाण्याच्या ओढीची जागा भीती घेते आणि लहानग्या जीवाचा एकच आटापिटा सुरू होतो, जीव वाचवण्याचा. तो बालजीव जोरजोराने पाण्यात हात आपटू लागतो, पाणी पसरून जावं म्हणून. पण पाणी नाहीच हटत. ते घालत राहतं वेढा आणि घुसमटत जातो मग जीव...नि तोंडातून फुटते एक प्राणांतिक किंकाळी!

ती किंकाळी ऐकून आई जागी होते नि विचारते- बा सपान पाह्यलास? नीज, घाबरू नकोस. सटवाय आली असंल माझ्या लेकराला खेळवायला!

तो सटवाईचा खेळ होता की कुणाचा ठाऊक नाही, पण पाण्याची ओढ आणि भीती तिथेच निर्माण झाली एवढं नक्की! जी पुढे वाढतच गेली... किंबहुना वाढत्या वयात पावलोपावली भेटत राहिली. कधी गावातल्या नदीत असलेल्या डोहाच्या निमित्ताने, कधी आईनेच दाखवलेल्या तिच्या माहेरच्या विहिरीच्या निमित्ताने, तर कधी भटकंतीत गावोगावी भेटणाऱ्या तलावांच्या निमित्ताने.

नदी, डोह, विहीर, तलाव... सगळ्याच एका परीने पाणवठ्याच्या जागा. सगळ्यांची तृष्णा भागवणाऱ्या. पण तहानलेल्यांची तहान भागवतानाच, अडल्या-नडलेल्यांच्या जीवाचा स्वाहादेखील करणाऱ्या. म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारकही. पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा चित्तचक्षुचमत्कारिक कथा आईने लहानपणी कितीतरी सांगितलेल्या.  स्वप्नांत पाहिलेल्या पाण्याची ओढ अन् भीती त्या कथांतून अधिकच गडद होत गेलेली.

आजही सगळ्यात पहिला आठवतो तो, तिने दाखवलेला गावच्या नदीतला गिऱ्होबाचा डोह. खोल खोल काळंशार पाणी असलेला. सबंध विश्वातला काळोख जणू त्या डोहाच्या तळाशी साठवलेला असावा, असं तो डोह पाहून वाटायचा. त्या काळोख्या पाण्याची भीती आजही मनातून गेलेली नाही. पण त्या काळ्याशार पाण्यातच काहीतरी सर्जनशील होतं, असं मात्र कायम वाटत आलंय. कदाचित विश्वाचं आर्त त्यातच सामावलेलं होतं की काय कुणास ठाऊक... आणि आर्ततेतच सर्जन दडलेलं असतं.

तिने दाखवलेली माहेरची विहीरही खास होती. तिच्या माहेरच्या वाटेवरच होती. पहिल्यांदा बालसुलभ वृत्तीने डोकावलो विहिरीत, तिने खसकन् मागे ओढलं. पण नंतर त्या विहिरीची कथा सांगितली. त्या विहिरीचा तळ खुणावतो म्हणे कुणाकुणाला. त्या विहिरीत एक मासा होता आणि त्याच्या नाकात मोती होता, म्हणे... तो मासा कुणाला दिसला की त्याला विहिरीत उडी घेण्याचा मोह व्हायचा.

लोकरहाटीतल्या पाण्याच्या आणि पाणवठ्याच्या अशा अनेक गोष्टी आई सांगायची. तिच्या तोंडून त्या ऐकताना सगळ्यात आधी त्या सगळ्याची भीती वाटायची. पाणी आपल्याला त्याच्याकडे खेचून घेतंय असं वाटत राह्यचं. पण पाण्याच्या गोष्टींचा शेवट ती गोड करायची, सात आसरांची गोष्ट सांगून. ती सांगायची- पाणवठ्यांच्या तळाशी कितीही बुडालेले आत्मे असले, तरी त्यांच्या काठाशी मात्र असतात सात आसरा. या आसरा म्हणजेच जलअप्सरा. पाण्यात उतरताना त्यांची आठवण ठेव, त्या सगळ्यांपासून तुझं रक्षण करतील!

...तेव्हापासून पाण्याची भीती असली, तरी आईने सांगितलेल्या जलअप्सरा असतीलच, पाठीशी, याची खात्रीही असते....

................................

नागाच्या माणूसपणाच्या गोष्टी


लहानपणी श्रावणात कधीतरी गावाला असताना आईबरोबर नाग पूजायला गेलो होतो. गावाबाहेर नदीच्या काठावर कळकीचं बेट होतं. त्या बेटात कंबरभर उंचीचं आडवं पसरलेलं वारुळ होतं. लालभोर मातीचं. आडव्या पसरलेल्या त्या वारुळात लहान-मोठ्या उंचीची आठ-दहा शिखरं होती. आडवा पसरलेला छोटा हिमालयच जणू! आईसकट जमलेल्या सगळ्या महिलांनी पूजा करून वारुळावर लाह्या-फुलं उधळली. लोटीत आणलेलं दूध वेगवेगळ्या शिखरांत ओतलं. अन् नंतर वारुळाभोवती फेर धरून साऱ्याजणी गाणी म्हणू लागल्या. गाणी रंगात आलेली असतानाच वारुळातल्या एका शिखरात काहीतरी हालचाल दिसली. थोड्याच वेळात दहाचा आकडा असलेला फडा उभारून काळा कुळकुळीत नाग बाहेर आला. मी घाबरून पटकन आईला बिलगलो. तसं लोकरहाटीतल्या श्रद्धेला जागून ती लगेच म्हणाली- घाबरू नको. आम्हा बहिणींना भेटायला आलाय तो. आलाय तसा जाईल. ज्यांना भाऊ नसतो, त्यांना तोच तर येतो माघारी म्हणून... त्यानंतर आई कितीतरी गोष्टी सांगत राहिली. नागाच्या माणूसपणाच्या! कधी तो भाऊ म्हणून कसा येतो, तर कधी प्रियकर म्हणून कसा येतो, त्याच्याही. आणि तेव्हापासून नाग हा माझ्या कल्पनासृष्टीतला एक अविभाज्य घटक झालाय. तो मला सर्पकुळातला वाटतच नाही. आपल्यासारखाच हाडामांसाचा माणूस वाटतो. तो दिसला की त्याची भीती वाटते, तरीही त्याला पाहायचा मोह मात्र आवरत नाही. जिथे-कुठे त्याचं दर्शन घडतं - वाटत राहतं, तो कुणाला तरी संकेतस्थळी भेटायला आलाय. किंवा कुणाला तरी माहेरपणाला न्यायला तरी... मग उगीचच इकडे-तिकडे पाहतो, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहतो. खास करून त्याच्या वारुळाभोवती...

खरंतर वारुळ हे त्याचं घर नव्हेच. ते मुंग्यांनी केलेलं असतं. पण मुंग्यांनी केलेल्या आयत्या घरात, म्हणजे बिळात नाग जाऊन राहतो आणि तोच त्याचा स्वामी होतो. आता वारुळ आणि नाग हे समीकरण लोकसंस्कृतीत छान रुजलंय. वारुळ हे सर्जनशील भूमीरूपाचं-स्त्रीतत्त्वाचं प्रतीक. तर नाग हे पुरुषतत्त्वाचं चैतन्याचं प्रतीक. 

म्हणूनच आजही भारतीय ग्रामीण महिलांची श्रद्धा आहे की नाग हा त्यांचा भाऊ तरी आहे, किंवा प्रियकर तरी. त्यामुळे शेतात, रानात, वाटेत कुठेही वारुळ दिसलं की, त्या आदराने नमस्कार करतात आणि आपल्या भाऊरायाचं कुशल चिंततात. तसंच त्याची कामनाही करतात.

नागाच्या या मनुष्यरूपाचा आईने लहानपणी माझ्यावर केलेला संस्कार अजून पुसला गेलेला नाही. किंबहुना मनात खोलवर रुजलेल्या त्या श्रद्धेतून माझी अजून सुटका झालेली नाही. पत्रकारितेच्या कामानिमित्ताने कुठेकुठे भटकावं लागतं. कधी हौसेपोटीही भटकणं होतं. या भटकंतीत वाटेत कुठेही वारुळ दिसलं की मी थांबतो. मग ते जंगलात असो वा शेतात. आणि मग माझ्याही नकळत माझी पावलं त्या वारुळाकडे वळतात. वारुळाची आणि त्याच्या आत राहणाऱ्या त्याच्या मालकाची वास्तपुस्त करायला. खरंतर मनात प्रचंड भीती असते. कुठून नाग आला आणि चावला तर, याची. तरीही वारुळ दिसलं की ते खोलवर निरखून पाहण्याचा मोह आवरत नाही.

अलीकडेच खानापूरहून बेळगावकडे येत असताना वाटेवरच्या जंगलात एकदम दोन-तीन वारुळं दिसली आणि मी गाडी थांबवली. जवळ जाऊन ती लालभोर मातीची वारुळं निरखू-पारखू लागलो. त्या वारुळांचे उंचवटे, म्हणजे शिखरं अतिशय सुरेख होती. अगदी आखीवरेखीव. नागाच्या डौलदार चालीला शोभतील अशी. ते निरखणं सुरू असतानाच जवळच्या झुडुपात काही तरी सळसळलं. अन् भीतीने अंगावर काटा उभा राहिला. त्या भीतीचा मनातून निचरा होण्याआधीच पुन्हा झाडात सळसळ झाली. आवाजाचा मागोवा घेत तिकडे पाहिलं, तर एक काळाशार नाग तिथून जात होता. त्याच्या दर्शनाने मन सुन्न झालं. लगेच तिथून बाहेर पडण्याची घाईही झाली.

...अन् तरीही परवा अकलूजजवळच्या वेळापूरच्या वाटेवर शेतात दिसलेलं काळंभोर वारुळ पाहण्याचा मोह आवरला नाहीच. ते पाहण्यासाठी खाली उतरलोच. ते पाहताना उगाचंच वाटत राहिलं, या वारुळातला भाऊराया गेला असेल का कुणा बहिणाबाईला आणायला किंवा आपल्या प्रेयसीला भेटायला...

नाग दिसेल ना दिसेल. त्याचं वारुळ दिसलं की आईने सांगितलेल्या त्याच्या माणूसपणाच्या गोष्टी आठवत राहतातच...


सोमवार, ११ मे, २०१५

लावणी 'शास्त्रीय' होऊ शकते?

महाराष्ट्राने शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्याची चांगली जोपासना केली आहे.राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्व गाजवणारे कलाकार इथल्या मातीत जन्माला आलेले आहेत.तरीही महाराष्ट्राचं स्वतःचं असं शास्त्रीय नृत्य आकाराला आलेलं नाही. मात्र आजवर पांढरपेशा समाजाने गावकुसाबाहेर ठेवलेल्या लावणीत शास्त्रीय नृत्याची सगळी लक्षणं दिसतात...
(संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर, छाया : श्रेयांश जाधव)
(संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेत्या लावणी कलावंत शकुंतलाबाई नगरकर, छाया : श्रेयांश जाधव)
शास्त्रीय संगीत असो वा शास्त्रीय नृत्य, या कलांच्या संगोपन-संवर्धनात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आहे. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर १९व्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तरेतून ख्यालगायकी शिकून महाराष्ट्रात आले आणि इथे महाराष्ट्र देशी संगीताचं सुवर्णयुग अवतरलं. तसंच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पं. मोहनराव कल्याणपूरकर, आचार्य पार्वतीकुमार यांसारख्या नृत्यगुरुंनी महाराष्ट्रात कथक, भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यांची पायाभरणी केली आणि आज उभा महाराष्ट्र विविध शास्त्रीय नृत्यांचं प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्राची भूमीच अशी आहे की इथे कलांची नीट निगराणी आणि जोपासना होते. इतर कुठल्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्राची रसिकता संपन्न आणि जाणकार आहे. त्यामुळेच शास्त्रीय संगीतातील अनेक नामवंत बुजुर्गांनी महाराष्ट्राची कायम सराहनादेखील केली आहे... आणि म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की, शास्त्रीय संगीत-नृत्याची जोपासना करणा‍ऱ्या महाराष्ट्रात स्वतःचं शास्त्रीय नृत्य का आकाराला आलं नाही? महाराष्ट्राला स्वतःची अशी खास नृत्यशैली नव्हती का? किंवा एकही अशी नृत्यशैली नव्हती, जी इतर शास्त्रीय नृत्यांच्या शेजारी ठामपणे उभी राहील? तर याचं उत्तर ठामपणे ‘अशी नृत्यशैली महाराष्ट्रात होती आणि आहे’, असंच द्यावं लागेल. महाराष्ट्रात नृत्यशैली तर अनेक आहेत आणि त्या प्रादेशिकतेनुसार भिन्न भिन्न आहेत. परंतु ‘शास्त्रीय नृत्य’ या नामाभिधानाला साजेशी अशी एकच नृत्यशैली महाराष्ट्रात आहे आणि ती म्हणजे, तमाशा या लोककलाप्रकाराचं एक उपांग असलेली आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व जपणारी — लावणी! मात्र आजतागायत महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेल्या लावणीला शास्त्रीय साज चढवण्याचा प्रयत्न कुणी केलेला नाही आणि ज्या कुणी क्वचित केला, त्यांना धमकी दिली गेली — ‘ही महाराष्ट्राची मोकळीढाकळी लोककला आहे, तिला तशीच ठेवा.’ यातल्या ‘मोकळीढाकळी’ या शब्दाला वेगळाच वास होता. जर लावणी मोकळीढाकळी राहिली नाही, तर तिचा (लावणीचा आणि लावणीनर्तकीचा) मोकळाढाकळा आस्वाद आम्हाला घेता येणार नाही, असा गर्भित हेतू त्यामागे होता. मात्र लावणीला शास्त्रीय बाज चढवण्यामागे असे कुणाकुणाचे अंतस्थ हेतू असले, तरी लावणीत शास्त्रीय नृत्य होण्यासाठीचे निकष खरोखरच आहेत की नाहीत, हे मात्र नक्कीच तपासून पाह्यला पाहिजे. कारण कुणी कितीही स्वतःहून ठरवलं, म्हणून लावणीला शास्त्रीय नृत्याचा दर्जा प्राप्त होणार नाही. त्यासाठी संगीत नाटक अकादमीने आखून दिलेल्या निकषात तुमची नृत्यशैली बसायला हवी. काय आहेत, हे संगीत नाटक अकादमीचे निकष? तर, संगीत नाटक अकादमीने भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा ग्रंथ यासाठी प्रमाण मानला आहे. वास्तविक भरतमुनींनी आपल्या नाट्यग्रंथात आजच्या कुठल्याही शास्त्रीय नृत्यशैलींचा उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांनी आपल्या ग्रंथात दाक्षिणात्य, अर्धमागधी, अवंती आणि पांचाली या चार नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख केलेला आहे. या नृत्यप्रवृत्तींचा मागोवा घेतला, तर दाक्षिणात्य या नृत्यप्रवृत्तीत दक्षिणेकडच्या नृत्यशैलींचा समावेश होतो. अर्धमागधी नृत्यप्रवृत्तीत आजच्या इशान्येकडील ओडिसी, मणिपुरी किंवा शास्त्रीय नृत्यांच्या यादीत नव्याने समावेश झालेल्या सत्तारिया या नृत्यांचा समावेश होऊ शकतो. अवंती किंवा पांचाली या नृत्यशैली म्हणजे नेमक्या कोणत्या, याबद्दल मात्र संशोधकांमध्ये एकमत नाही. तसंच नाट्यशास्त्रात या नृत्यप्रवृत्तींचा उल्लेख असला, तरी त्यांची एकच सर्वसमावेशक किंवा वेगळेपणाची व्याख्या त्यात नाही. त्यामुळे भरतमुनींनी नाट्यशास्त्रात सरसकट नृत्याविषयी जे विवेचन केलं आहे, तेच शास्त्रीय नृत्यासाठीचे निकष मानले जातात. उदाहरणार्थ भरतमुनींनी नर्तकाला (स्त्री-पुरुष दोन्ही) नट मानून त्याने आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनयातून व्यक्त झालं पाहिजे, त्याने आपल्या अंग-उपांगांचा भावप्रदर्शनासाठी वापर केला पाहिजे, त्याने आपल्या नृत्यात एकल आणि संयुक्त हस्तमुद्रांचा वापर केला पाहिजे, तसंच त्याच्या सादरीकरणात नवरसांचा (भरतमुनींनी प्रत्यक्षात आठच रस सांगितले आहेत) परिपोष असला पाहिजे, असं म्हटलं आहे, भरतमुनींनी कुठल्याही प्रकारच्या नर्तनासाठी सांगितलेले हे निकषच, आजच्या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचे निकष आहेत. याच निकषांवर भरतनाट्यम, कथक, ओडिसी, कुचिपुडी, मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी आणि आसामचं सत्तारिया या आठ नृत्यशैलींची आज भारतीय शास्त्रीय नृत्यांत गणना केली जात आहे. ...आणि हेच निकष लावायचे, तर महाराष्ट्राची लावणीदेखील बहुतांशी हे सगळेच निकष पूर्ण करते. तब्बल साडेचारशे वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राची लावणी कुठेच मागे नाही. भावप्रदर्शनासाठी लावणीनर्तिका आपल्या अंगउपांगांचा वापर करते, त्याला लावणीच्या परिभाषेत ‘अदा’ म्हटलं जातं. शास्त्रीय नर्तनात चेह‍ऱ्यावरील भावाभिव्यक्तीला ‘अभिनय’ म्हणण्याची पद्धत आहे, लावणीपरंपरेत त्याला ‘भावकाम’ म्हणतात. गोल फिरण्याला कथकच्या शास्त्रीय परंपरेत चक्री म्हटलं जातं, तर लावणीवाले तिला ‘गिरकी’ म्हणतात. शास्त्रीय नृत्यात ज्याप्रमाणे तबला किंवा घटमवर तोडे वाजवून पदन्यासातलं कौशल्य दाखवलं जातं, त्याचप्रमाणे लावणीनृत्यात ढोलकीवर तोडे वाजवून नर्तकी आपलं पदन्यासकौशल्य दाखवते. एवढंच नव्हे, तर शास्त्रीय संगीताप्रमाणेच शास्त्रीय नृत्यात जसं धीम्या आणि जलद संगीतावर नृत्याचं सादरीकरण होतं, तसंच ते लावणीतही होतं. खडी म्हणजे उभ्याने सादर केलेली लावणी ही गतिमान नृत्यासाठी प्रसिद्ध आहे, तर बैठकीची लावणी संथ लयीतील अदाकारी सादर करते. अगदी शास्त्रीय नृत्याप्रमाणेच लावणीत हस्तमुद्राही आहेत. फक्त या हस्तमुद्रांना आजवर नाव देण्याचा प्रयत्न झाला नाही. तसंच शास्त्रीय नृत्यातून जसं विविध रसांचं दर्शन घडवलं जातं, तसंच ते लावणीतूनही घडतं. फक्त लावणीचा कल श्रृंगाररसाकडे अधिक आहे. कारण ती रसिकाश्रयी कला आहे. आणि खरं सांगायचं तर आज ज्या नृत्यशैली ‘शास्त्रीय नृत्य’ या अभिधानाला पोचल्या आहेत, त्या सा‍ऱ्याच नृत्यशैलींचा गाभा हा मूलतः शृंगाररसाचाच होता. कारण या बहुतांशी नृत्यशैली मूळच्या देवदासी नृत्याचंच परिष्कृत रूप आहे. भारतातील देवदासीपरंपरा प्राचीन आहे. देवपत्नी म्हणून त्यांना जेव्हा रोज देवासमोर, त्याची झोपायची वेळ झाली की, रंगभोग सादर करावा लागायचा, तो रंगभोग वैषयिकच असायचा. आज जरी त्याला आध्यात्मिकतेचा आणि सात्त्विकतेचा मुलामा चढवण्यात आलेला असला, तरी देवदासींचं मूळ गाणं आणि नृत्याचा आशय श्रृंगारिकच होता. त्याचे अनेक दाखले आजही दक्षिणेतील मूळ परंपरेत सापडतात. महाराष्ट्रातला त्याचा एक उत्तम दाखला म्हणजे नवरात्रीत आजही जेजुरीच्या कडेपठारावर (गडावर नव्हे), जिथे खंडोबाचं मूळ ठाणं आहे; तिथे लावणीपरंपरा जपणा‍ऱ्या कलावंत महिला जातात आणि त्याला पारंपरिक श्रृंगारिक लावण्या ऐकवतात. मुख्य म्हणजे द‌क्षिणेकडे किंवा भारतात सर्वत्रच देवासमोर सादर होणारा रंगभोग कला म्हणूनच नावाजला गेला आणि रक्षिलाही गेला. पण विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मात्र त्याला अश्लील ठरवून तो त्यागला गेला. परिणामी देवदासींचंच नृत्य पुढे शास्त्रीय म्हणून ओळखलं जायला लागलं, परंतु त्याचा श्रृंगारसाचा आत्मा मात्र त्यातून काढून टाकण्यात आला. कारण तो श्रृंगार पांढरपेशा समाजाला मानवणारा नव्हता. हाच श्रृंगाररसाचा आत्मा लावणीला बाधक ठरू शकतो. शास्त्रीय नृत्यासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्वच निकषांवर लावणी कदाचित पात्र ठरेल. परंतु तिचा थेटपणा मात्र संगीत नाटक अकादमीच्या समितीवर बसलेल्यांना मान्य होणार नाही. अर्थात लावणीला शास्त्रीय नृत्य म्हणून मान्यता मिळावी म्हणून महाराष्ट्रातून आजवर रीतसर प्रयत्न झालेले नाहीत. तसंच शास्त्रीय नृत्याच्या रूपबंधात लावणीला बांधण्याचा प्रयत्नही कुणी केलेला नाही. तसा प्रयत्न झालाच, तर मात्र लावणीपुढे श्रृंगारिकतेचं काय करायचं, हा प्रश्न उभा राहू शकतो. कारण याच कारणासाठी आंध्रप्रदेशातील विलासिनीनाट्यम या देवदासींच्या नृत्यावर ते प्राचिन असतानाही शास्त्रीय नृत्य म्हणून मोहोर उमटलेली नाही. तसंच दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर कुणी लावणीला शास्त्रीय नृत्याच्या कसोटीत बांधण्याचा प्रयत्न केला, तर ही कला आजवर ज्या समाजाने जपली, तो कोल्हाटी समाज याला मान्यता देणार का? कारण आजही तमाशा किंवा लावणी हाच या समाजाचा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय आहे. तेव्हा महाराष्ट्राचं शास्त्रीय नृत्य म्हणून लावणी या नृत्यशैलीचा विकास होऊ शकतो. पण तो कोण आणि कसा करणार हा खरा प्रश्न आहे! 
(१० मेच्या 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित झालेला माझा लेख)

बुधवार, ६ मे, २०१५

व्हक्का माझा आंबा पिक्का, कोण घेईल त्याचा डोकाच मोडू दे…


व्हक्का माझा आंबा पिक्का
व्हक्का माझा आंबा पिक्का...
वारा गपगार पडलेला असायचा. वा‍ऱ्याचं पानही हलत नसायचं. सगळं चिडीचूप. एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखं. अशा शांत-टळटळीत दुपारी अचानक 'धप्' असा आवाज व्हायचा. अन् तो आवाज विरायच्या आत अख्ख्या घराला घुमवून टाकणारी काकूची आरोळी कानावर पडायची- 'कार्ट्यानू धावा, आंबा पडलाय.' की घरातल्या पोरांची टोळधाड आवाडात धावत सुटायची. लांबोड्याच्या झाडाखाली खरोखरच आंबा पडलेला असायचा. हिरवाजर्द आणि हातभर लांबीचा. जो पहिला पोचायचा, तोच तो आंबा उचलायचा. तो अख्खा आंबा मग त्याच्याच मालकीचा. तिथे वाटणी बिटणी काही नाही. 'जो उचलेल, तो खाईल' हाच खासा न्याय. मग उचलणाराही एखाद्या विजयी वीराप्रमाणे लांबोडा चोखून चोखून खायचा. डोळे मिचकावत. इतरांना दाखवत. या लांबोड्याची खासीयत म्हणजे याची साल एकदम पातळ होती. अगदी नरम-मुलायम. त्याच्यावरून हात फिरवतानाही गुदगुल्या व्हायच्या. अलगद हात फिरवून झाला की, मग त्याच्यावर हलकेच गाल घासायचे. लांबोड्याच्या सालीचा, पातळपणा-नितळपणा मनाला सुखावून जायचा. मात्र साल कितीही पातळ असली, तरी लांबोडा कधीच फुटायचा नाही. लांबोड्याचं झाड हे सरळसोट वाढलेलं. किमान तीस-पस्तीस फूट. पण कितीही उंचावरून खाली पडला, तरी त्याच्यावर साधा ओरखडाही उमटलेला नसायचा. अलगद खाली आल्यासारखा यायचा आणि जमिनीवर पडताना 'धप्' असा आवाज करायचा. हा आवाज हीच लांबोडा पडल्याची पक्की खूण. एरव्ही कितीही वारा सुटलेला असो, फांद्या इकडून तिकडे गदागदा डोलत असोत, पण नाजूक सालीचा अन् नाजूक देठाचा लांबोडा पडायचाच नाही. रात्रीचा आणि दुपारचा शांत प्रहर मात्र त्याच्या आवडीचा. सगळं शांत असल्यावरच तो धप् आवाज करत जमिनीवर आदळायचा. हा आवाजही सगळ्यांना ऐकू जाईल असा. गपगुमान पडण्याचा त्याचा स्वभावच नव्हता.
दुपार असेल, तर डोळ्यावर कितीही झोप असली तरी नुस्ता धप् आवाज यायची खोटी; काकूची बोंब ऐकताच आम्ही धावत सुटायचो. रात्रीच्या नीरव शांततेत मात्र त्याचे धप्- धप् आवाज कितीही आले, तरी काळोखात तिकडे जाण्याची कोणाची शामत नव्हती. मग पहाट होण्याची वाट बघायची. या वाट बघण्यातच अनेकदा रात्र सरायची. कोंबडा आरवला की थोड्या वेळानं झुंजुमंजु व्हायचं. बाहेर थोडं धुंदुरकच दिसायचं. पण आता जीवाला अधिक थोपवणं शक्य नसायचं. अंथरुणातनं घेतलेली पहिली उडी थेट लांबोड्याच्या बुंध्याशीच जाऊन पडायची. लांबोड्याच्या बुंध्याशी पिकलेल्या आंब्यांचा सडा पडलेला असायचा. ते पटकन् कसे गोळा करायचे तेच कळायचं नाही. मग अंगात घातलेल्या शर्टाचीच खोळ व्हायची आणि त्यात लांबोड्याचे आंबे गोळा केले जायचे. या गोळा केलेल्या आंब्यांचा फन्ना उडवेपर्यंत न्हेरीचा वकात कधी व्हायचा तेच कळायचं नाही. आयंची घरातून हलकेच हाक यायची. 'न्हेरी करून जा, मला नह्यवर धुवायला जायचंय.' की लगेच घरात हजर. एका अॅल्युमिनियमच्या ताटलीत आयन गरमगरम खिमाट वाढलेला असायचा. सोबत कांद्यात कुस्करलेला कुरकुरीत कोलीम. मग थेट जेवणासारखाच न्हेरीवर ताव मारला की स्वारी पुन्हा बाहेर आंब्यांखाली हुंदडायला मोकळी...
... आणि आमच्या आवाडात फक्त लांबोडा तेवढा थोडाच होता.
लांबोड्याला खेटून असलेला दुसरा एक जाड आंबा होता. एकच खाल्ला तरी पटकन पोट भरणारा. शिवाय एक केसरी लिटी होती. एक दुधी लिटी होती. झालंच तर आमच्या आवाडाच्या बाहेर, आमच्या मालकीचे नसलेले, पण पडलेले आंबे खाण्यासाठी कुणाचीही आडकाठी नसलेले अनेक आंबे होते. मिरमि‍ऱ्या होता. साखरी लिटी होती. गोडांबा होता. पिठांबा होता. ढेरांबा होता... आणि रानात तर काय आंबेच आंबे. नाना त‍ऱ्हांचे, नाना चवीचे. एका आंब्याची चव दुस‍ऱ्या आंब्याला नाही. प्रत्येक आंबा जणू काही स्वत:च्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासारखा. जेवढी आंब्याची झाडं, तेवढ्या त्याच्या चवी. आज कुणाच्याही पेटीतला, कुठलाही हापूस काढला, तरी जगाच्या पाठीवर त्याची चव सारखीच लागते. पण बांधा-बांधावर पडलेल्या झडलेल्या कोयांतून निर्माण झालेल्या रायवळी-गावठी आंब्यांची लज्जतच न्यारी!
केवळ ही लज्जत चाखण्यासाठीच, परीक्षा संपायच्या आधी गावाचे वेध लागायचे. खरंतर गावचा एसटीचा प्रवास नको वाटायचा. कारण प्रवासात पोटात मळमळून हमखास उलट्या व्हायच्या. त्यामुळे एरव्ही गावाला म्हटलं की नकारघंटा असायची. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आमच्या आवाडातले, परक्यांच्या तना‍ऱ्यातले, पायवाटेवरचे आणि रानातल्या आडवाटांचेही आंबे खुणावत असायचे. सकाळी पाचला मुंबई सेंट्रलवरून सुटलेली एसटी दुपारी तीन-चार वाजता गावी पोचायची. एसटीच्या प्रवासाने सगळे थकलेले असायचे. प्रत्येकाला जागा मिळेल तिथे आडवं व्हायचं असायचं. मी एकटाच काय तो ताजा-तवाना असायचो. घरात शिरल्या शिरल्या सामान टाकून मला आवाडातल्या आंब्यांच्या झाडांखाली पळायचं असायचं. मी तसंच करायचो. आमच्या वटाणात सामान टाकलं की उडी मारून काकूच्या वटाणात जायचो. दुसरी उडी अंगणात मारायचो आणि तिसरी उडी थेट आवाडातल्या आंब्यांच्या बुंध्यात.
आमच्या घरामागचं हे आवाड म्हणजे देवराईच होतं जणू! तिथे रामफळ, पपनस, पेरू, शेकट आणि आंब्याची झाडं होती. उंचच उंच आणि सरळसोट वाढलेली. ठरावीक उंचीवर झाडांच्या फांद्यांची अशी दाटी झालेली की आवाडावर एक आच्छादनच तयार झालेलं असायचं. त्या आच्छादनातून सूर्याची एक तिरीपही खाली जमिनीपर्यंत पोचायची नाही. ऐन उन्हाळ्यातही आवाडातली माती थंडगार असायची. एकप्रकारचं कोंदट, गूढ, पण आश्वासक वातावरण असायचं आवाडातलं. मग मातीचा, वातावरणातला हा हवाहवासा थंडगारपणा पायात आणि मनात रुजवत मी आंब्यांच्या बुंध्यांना गिरक्या घ्यायचो. एकप्रकारे मी आलो असल्याची त्यांना दिलेली ही वर्दीच असायची. ही वर्दी दिल्यावर मग माझा पाय तिथे ठरायचा नाही. 'आता महिनाभर आहोत सोबत', असं म्हणून मी ललीच्या मागावर निघायचो.
ललिता माझ्यापेक्षा दोनेक वर्षांनी मोठी असलेली बहीण, गावीच माझ्या काकूकडे असायची. ती गुरं घेऊन रानात जायची. रान म्हणजे तिचं दुसरं घरच जणू. या रानाचं पानन् पान तिला ठाऊक असायचं. काजू, आंबे, करवंद, अळू, कुम्हला, तोरणा, ओवळा अशा रानातल्या कितीतरी फळांच्या अनवट जागा तिला माहीत असायच्या. रोज संध्याकाळी गुरं घेऊन घरी येताना तिची टोपली नानाप्रकारच्या रानमेव्याने भरलेली असायची. हे ठाऊक असल्यामुळेच तिला शोधण्याची मोठी उत्सुकता असायची. रानात गुरं घेऊन जाण्याच्या बहुतेक वाटा नदीकडून फुटलेल्या असायच्या. मग सगळ्यात आधी नदी गाठायची. तिथे पाणी भरणा‍ऱ्या किंवा रानातून येणा‍ऱ्या-जाणा‍ऱ्यांना विचारायचं- 'गुरा कुटं गेलीत हाय ठाऊक?' कुणी ना कुणी नेमकी जागा सांगत असे. मग त्याने दाखवलेल्या बोटाने चालायला सुरूवात करायची.
हळूहळू नदीची वहिवाटीची वाट नजरेआड व्हायची. गच्च रान अंगावर यायचं. मनात धाकधूक निर्माण व्हायची. पुढे जाऊ की थांबू असं व्हायचं. ललीचा शोध तर घ्यावासा वाटे, पण पुढे जायचीही भीती वाटे. मग तिथेच थांबून मी कानोसा घेत असे. एवढ्यात लांब कुठेतरी गुरांचा आवाज ऐकू यायचा. त्यांचं हंबरणं, त्यांना घातलेली साद कानावर पडायची. मग तिथेच एखाद्या बांधावर उभा राहून मी जोरात ओरडत असे- 'अगो लली गो......' , 'अगो लली गो......' , 'अगो लली गो......'
असं चार-पाच वेळा झाल्यावर मग समोरून प्रतिसाद मिळायचा- 'कोन हाय रं...?'
'अगो मी मकून.....'
'कंदी रं आलास? आयं-बाबा पण आलंयत?'
'हो गं हो...'
बरीचशी प्रश्नोत्तरं अशी लांबून झाली की, मग लली आहे त्याच वाटेनेपुढे यायला सांगायची. मात्र काही अंतर चालून गेलं तरी ती किंवा गुरं कुणीच दिसायचं नाही. मी कितीही हाका मारल्या, तरी तिचा प्रतिसाद मिळायचा नाही. मग मी घाबरून रडकुंडीला यायचो. अगदी रडण्याच्याच बेतात असायचो अन् एवढय़ात कुणी तरी येऊन भॉक करायचं. आधी मी दचकून घाबरायचोच. पण नंतर हसत सुटायचो. कारण ती लली असायची. मग ती मला घट्ट आवळायची. माझे पटापट मुके घ्यायची. माझी छोटी जीवणी हाताच्या चिमटीत घेऊन म्हणायची- 'ही बघा याची केवढीशी मुस्कुरी.' नंतर गुरं चरत असतील, तिथे नेऊन झाडाखाली ठेवलेल्या टोपलीवरली पानं पटकन् बाजूला करून म्हणायची- 'हे बघ क्काय?'
टोपली आंब्यांनी भरून ओसंडत असायची. लाल, केशरी, गडद पिवळे आंबेच आंबे. लगेच देठाकडचा भाग दगडावर ठेचून तिथून आंबा थोडा पिळून ती आंब्याचा चिक काढून टाकायची आणि मला द्यायची. मग मी थांब म्हणेस्तोवर तिचा हा उद्योग सुरूच राह्यचा. घरी निघताना तोंड-हात आंब्याच्या रसाने माखलेले असायचे...
... तिथूनच ख‍ऱ्या अर्थाने माझे आंब्यांचे दिवस सुरू व्हायचे.
त्यानंतर महिनाभर घराच्या आवाडात-रानात नुस्ता आम्रमहोत्सवच सुरू असायचा. नाना त‍ऱ्हेचे, नाना वासाचे, नाना रंगाचे आणि नाना चवीचे रायवळी म्हणजे गावठी आंबे घरात यायचे. नुस्त्या टोपल्याच्या टोपल्या आंब्यानी भरलेल्या असायच्या. त्यासाठी कधी एक दमडीही खर्चावी लागायची नाही. हे आंबे कापून फोडी करून खाण्यात मजा नसायची. रायवळी आंब्यांची गंमत ते चोखून खाण्यातच. देठाकडचा भाग काढून टाकायचा नि आंबा थेट तोंडाला लावायचा. आंबा लहान असो वा मोठा तो चोखून खायचा. यातही काही आंबे फक्त रसाचे असायचे. त्यात गर कमी आणि रसच जास्त. यांचा आकारही साधारण असायचा. याला आम्ही मग आंब्याऐवजी लिटी किंवा बिटकी म्हणायचो. आमच्या घराच्या आवाडात असलेली आंब्याची दोन झाडं याच रूपातली होती. पैकी एका लिटीतला रस केसरी धम्मक होता, म्हणून तिला आम्ही केशरी लिटी म्हणायचो. तर दुस‍ऱ्या लिटीतला रस अगदी दुधासारखा पांढराधम्मक आणि चवीलाही तसाच होता, त्यामुळे तिला आम्ही दुधीलिटी म्हणायचो.
 एक जाड मोठा आंबा, लांबोड्या आणि केशरी व दुधीलिटी घराच्या आवाडातच असल्यामुळे कुठेच न जाताही आंब्याच्या मोसमात भरपूर आंबे खायला मिळायचे. पण प्रत्येक रायवळी आंब्याची चव वेगवेगळी असल्यामुळेच नव्यनव्या चवी धुंडाळल्या जायच्या. यातूनच काही घराजवळच्या आणि काही रानातल्या खास आंब्यांचा आम्हाला शोध लागला होता. आमच्या घराच्या जवळ घर असलेल्या गोरिवले यांचा तनारा (म्हणजे गवत साठवायची जागा), आमच्या आवाडाच्या जवळच होता. या तना‍ऱ्यात गोरिवलेंची दोन आंब्यांची झाडं होती. या दोन्ही आंब्यांची चव सारखी होती, पण इतरांपेक्षा ती एकदम भिन्न होती. या आंब्यांचा रस गोड आणि काहीसा तुरट लागायचा. या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळेच या आंब्याला सगळेजण मिरमि‍ऱ्या म्हणायचे आणि त्याच्यासाठी या झाडांखाली मुलांची झुंबड उडालेली असायची.
 मिरमि‍ऱ्यापासून जवळच एक साखरी लिटी होती. अगदी साखरेसारखी गोड. पाटलांच्या मालकीची. सरळसोट उंच गेलेल्या या झाडावर, पिकल्यावर हिरव्या आणि गडद लाल होणा‍ऱ्या लिट्यांचे घुडच्या घुड लोंबकळत असायचे. एखाद्याने उंचच उंच भिरकावलेला दगडही पोचणार नाही, इतकी साखरीची उंची होती. या लिटीच्या लिट्या दिवसा क्वचितच पडत. सकाळी मात्र झाडाखाली लिट्यांची पाखर असायची. नदीवाटेवर असल्यामुळे भल्या पहाटे पाणी भरायला जाणा‍ऱ्या सासुरवाशिणी आधी या झाडाखाली डोकवायच्या आणि मगच पुढे जायच्या. या सासुरवाशिणींना आंब्यांच्या दिवसात साखरी लिटीने कधीच विन्मुख पाठवलं नाही. दिवसा पडणा‍ऱ्या साखरीच्या लिट्या मात्र आम्हा मुलांच्या वाट्याला येत. मात्र दिवसभरात साखरीची एखादी लिटी खाल्ली, तरी पुरे होत असे, एवढा तिचा रस गोड होता.
याशिवाय गावाच्या आडवाटेवर पीठांबा, गोलांबा होता. पिठांब्याचा रस पिठासारखा, म्हणून तो पिठांबा, तर गोलांबा म्हणजे या झाडाचं फळ अगदी गोल गरगरीत होतं. याशिवाय एक केसांबाही होता. या आंब्याची बाठी आणि साल दोन्ही केसाळ होते. तो खाताना किवा चोखतानाही त्याचे केस दातात अडकायचे. पण त्यामुळेच त्याला केसांबा हे नाव मिळालं. रानातल्या झाडांवर चढण्यासाठी कुणाची परवानगी लागायची नाही. पण गावातली आंब्याची झाडं कुणाकुणाच्या मालकीची होती. या आंब्यांचं पडलेलं फळ खायला कुणी मनाई करत नसे, पण झाडावर चढता मात्र येत नसे. अशा वेळी मग वारा येऊन झाडावरचं पिकलं फळ खाली पडण्याची वाट पाहावी लागे. त्यात झाडाखाली पाच-दहा पोरं असतील, तर फळाची आशाच सोडलेली बरी, अशी स्थिती असायची. अशा वेळी आंबे झाडावरून पटापट पडावेत म्हणून प्रत्येकजण एक क्लृप्ती करत असे. जो-तो जवळच्याच करंवंदीची पाचेक पानं एकत्र करून ती कंरवंदाच्याच काट्याने आंब्याच्या झाडाला टोचत असे आणि म्हणत असे -
'व्हक्का माझा आंबा पिक्का,
कोण घेईल त्याचा डोकाच मोडू दे.'
एकप्रकारे पडणारा आंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी केलेली ती भाकणूक असायची. अर्थात प्रत्येकजणच आंब्याला अशी कंरवदाची पानं टोचत असल्यामुळे वा‍ऱ्याने आंबा खाली पडला की, प्रत्येकजणच तो उचलायला धावत असे आणि या उचलाउचलीत आंबा एखाद्यालाच मिळत असे, डोकी मात्र अनेकांची फुटत. पण यातच गंमत असायची. पुढ्यात नुस्तेच कुणी आणून टाकलेले आंबे खाण्यात मजा नसायची. जोवर आपली रग त्यात जिरलेली नसायची, तोवर ते आंबे खाण्यात मजा यायची नाही. यासाठीच लली गुरं घेऊन रानात निघाली की तिच्या पाठी लागायचो. तिच्याबरोबर रानात जाण्यात एक गंमत असायची. तिच्या देखरेखीखाली रानात हुंदडता यायचं. मला झाडांवर चढता येत नसे. त्यामुळे ती मला खालीच आंबे गोळा करायला उभी करत असे. ती मात्र झाडावर एखाद्या सरडय़ासारखी चढत असे. झाडं उचं असो वा आडवं पसरलेलं. सपासप वर जाऊन ती एकेक फांदी अशा नजाकतीनं हलवायची की फक्त पिकलेले आंबेच खाली पडायचे. बाकीचे झाडावर कशाही उडय़ा मारून फांद्या हलवायचे. त्यामुळे पिकलेल्या आंब्यांबरोबर कच्चे आंबेही खाली पडून फुकट जात. लली मात्र याविषयी जागरुक होती. तिला उगाच आंबे पाडलेले आवडायचे नाहीत. ती म्हणायची- 'पिकलेल्या आंब्याचा देठ नाजूक असतो. जराशी थरथरही त्याच्यासाठी पुरेशी असते.'
केवळ एकच झाड हलवल्याने एवढे पिक्के आंबे पडायचे की जवळची टोपली भरून जायची. मग दुस‍ऱ्या दिवसासाठी ती दुसरं एखादं झाड हेरून ठेवायची. संपूर्ण आंब्यांच्या मोसमात तेव्हा क्वचितच एखाद्या आंब्याचे आंबे पुन्हा खाल्ले असतील. कारण ललिताला एवढ्या रानवाटा ठाऊक असायच्या की कधी कधी दुसरी कुणी त्या झाडाकडे आयुष्यात कधी फिरकलेलं नसायचं. कधी कधी आंब्यावर फार आंबे नसायचे. अशावेळी दगडानेच तो आंबा अचूक टिपला जायचा. मला एखादा आंबा दगडाने टिपायला किमान पंचवीसेक दगड लागायचे. ललिता मात्र पहिल्या दोन-तीन दगडातच तो आंबा अचूक टपकवायची. तिचं ते कसब बघून तेव्हा अवाक् व्हायला व्हायचं.
गुरं घेऊन रानात जाताना एक टोपली आणि गरकाटी तिच्यासोबत हमखास असायची. गरकाटी म्हणजे बांबूच्या (कळकीच्या) लांब दांड्याला पुढे एक जाड कुटकी तिरपी बांधलेली असायची. यामुळे तयार झालेल्या खोबणीत देठ अडकून फळ अलगद आपला पुढ्यात पडायचं. जर झाडावर चढायचं नसेल, किंवा झाड फार उंच नसेल, तर या गरकाटीचा वापर करतात. ललीचं लक्ष नसेल, तर ही गरकाटी हातात घेऊन मी झाडावर लटकणारं एखादं फळ ओढण्याचा प्रयत्न करायचो. पण बांबूच्या पुढच्या लवचीक-पातळ भागापासून ही गरकाटी तयार केलेली असल्यामुळे ती सतत लवायची. परिणामी वा‍ऱ्याने हलणारा फळाचा देठ आणि सतत लवणारी गरकाटी यांचा मेळ जुळवून  आणणं, म्हणजे एक कसबच. मी हातात घेतलेल्या गरकाटीच्या खाचेत फळ कधीच अडकायचं नाही. ललिता मात्र गरकाटीने एका हिसक्यात वरचं फळ जमिनीवर उतरवत असे.
 रोज रानातून येताना ललीची टोपली आंब्यांच्या दिवसात आंब्यांनी भरलेली असायची. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नुस्तं आंबे ओरपणं सुरू असायचं. कितीही खाल्ले तरी कंटाळा यायचा नाही आणि कितीही खाल्ले तरी कुणी ओरडायचं नाही. तेव्हा ललिताची टोपली म्हणजे मला कामधेनू किंवा कल्पवृक्षासारखीच वाटायची. कायम रानमेव्याने भरलेली. ललिताचं लग्न होईपर्यंत उन्हाळ्याचे दिवस म्हणजे माझ्यासाठी खरोखरच 'आंब्यांचे दिवस' होते.
 ... त्यानंतर मात्र कधीच मनसोक्त आंबे खाल्ले नाहीत. गावाकडे जाणं होतं राहिलं, तरी रानातून आंबे आणणारं घरात कुणी उरलंच नाही. ललिताच्या लग्नाच्या दरम्यानच घरामागच्या आवाडात दोघा चुलत्यांनी गुरांसाठी मोठा वाडा बांधला. तो बांधताना मध्ये येतात म्हणून आवाडातली बहुतेक सर्व झाडं तोडली गेली. त्यात लांबोड्यासकट सगळी आंब्याची झाडंही गेली. गच्च देवराई एकदम रिकामी झाली. सारं आवाडच भकास वाटू लागलं.
वीसेक वर्षं तरी झाली असतील. आवाडातली देवराई ओकाबोकीच होती. सुट्टीत गावी जाऊन कधी आवाडात धाव घ्यावी, तर भगभगीत आभाळच यायचं स्वागताला. ते उजाड माळरान बघताना जीव कसनुसा व्हायचा. शेवटी सातेक वर्षांपूर्वी मीच दोन कलमी आंब्यांची झाडं लावली आवाडात. एक-दोन इतरही आणखी कसली तरी.
 ... आणि बघता बघता झाडं वाढत गेली की! या कलमी आंब्यांच्या जोडीला आता दोन रायवळी आंबेही तरारलेत. सोबत सीतफळ, शेवगाही अचानक भरतं आल्यासारखी वाढताहेत. माळरानाची पुन्हा देवराई होतेय. संसाराच्या जंजाळ्यातून, मुलांच्या वाढीतून मोकळी झालेली ललीही आता माहेरी खेपा टाकून येता-जाता झाडांवरून हात फिरवतेय.
...सरलेले आंब्याचे दिवस पुन्हा येणारसे दिसतायत...!

( 'ऋतुरंग' दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख )