मंगळवार, ५ जुलै, २०१६

आषाढ बिलोरी ऐना…


एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
 

केवळ आषाढाच्या भरवशावर संपूर्ण सजीव सृष्टी सारा वैशाखवणवा सहन करते. आषाढ उंबरठ्यावर आहे, हे तिला दिसत असतं. बघता-बघता आषाढउभ्या धारेने कोसळेल आणि आपल्याला न्हाऊ-माखु घालेल याची तिला खात्री असते. खरंतर आषाढाच्या आधी ज्येष्ठच असतो, वैशाखाला बिलगून. पण तो वैशाखाच्या एवढा कह्यात असतो की, त्याचं स्वतंत्र अस्तित्वच जाणवत नाही. वास्तविक रोहिणीसारखी सुरुवातीची पावसाळी नक्षत्र ज्येष्ठातच लागतात. त्यामुळे गावोगावच्या कृषिकर्मांना सुरुवातही ज्येष्ठातच होते. पण जोवर आषाढधारांनी संपूर्ण सृष्टी धुऊन निघत नाही, तोवर सृष्टी आणि भारतीय जनमानसातही चैतन्य संचारत नाही, वैशाखाने आणलेली मरगळ दूर होत नाही. मात्र एकदा का आषाढधारा झडझडून बरसून गेल्या की मग सृष्टीचं, मनामनाचं रुप पालटतं. एक नवी उमेद, नवा उत्साह त्यांना व्यापून उरतो. जणू आषाढाचं सर्जनशीलत्व त्यांच्यात उतरतं. त्यांच्या कल्पनेला-प्रतिभेला नवे धुमारे, नवे पंख फुटतात...
... जसे आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाच्या प्रतिभेला फुटले होते. कालिदासाच्या मेघदूतातल्या यक्षाला का माहीत नव्हतं, हत्ती जसा मस्तीत डोंगरांना टकरा देतो, तसा आपल्यासमोर डोंगराच्या शिखराला येऊन भिडलेला हा मेघ निर्जीव आहे...! परंतु प्रियाविरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाला त्या आषाढघनाने भारावून टाकलं. आषढघनांबरोबर आलेल्या आषाढधारांनी त्याला सजर्नत्व बहाल केलं आणि मग... यक्षाने त्या श्यामलसुंदर घननीळालाच बनवला आपल्या निरोप्या. आपला दूत. प्रियेला संदेश घेऊन जाणारा... पाण्याने संपृक्त झालेल्या त्या मेघाला यक्ष म्हणतो-
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद, प्रियायाः
संदेशं मे हर घनपतिक्रोधविश्लेषितस्य... म्हणजे पाण्याने ओतप्रोत भरलेल्या हे मेघा, मी तुला शरण आलेलो आहे. माझ्यासारख्या विरहाग्नीने पोळणा‍ऱ्यांना तुझाच आसरा आहे. मग नेशील का माझा निरोप? आणि मेघाच्या उत्तराची वाटही न पाहता यक्ष त्या मेघाला आपल्या प्रियेचं वास्तव्य असलेल्या अलकानगरीचा मार्ग सांगायला सुरुवातही करतो. हा मार्ग कसा कुठून-कसा जातो आणि मार्गात मेघाला कोणकोण भेटेल, याचं यक्षाने म्हणजेच कालिदासाने जे अप्रतिम वर्णन केलंय, त्याच्या अनुभूतीसाठी मेघदूत प्रत्यक्षच वाचायला हवं. कारण ते वाचताना केवळ मेघच तो सारा प्रवास करत नाही, त्याच्या सोबती-संगतीने वाचकही प्रवास करतो. मेघदूत वाचताना क्षणभर भारतीय मनालाच विसर पडतो की, मेघ निर्जीव आहे. पण यक्ष आणि पर्यायाने कालिदासाला सुचलेली ही कविकल्पनाच इतकी बहारदार आहे की, ही कविकल्पना भारतीय साहित्यातील चिरंतन-सुंदर कल्पना बनून गेलीय. म्हणूनच तर कालिदासाच्या या कल्पनाविलासाचा मोह कुणाकुणाला पडला नाही? सा‍ऱ्यांनाच पडला. कविकुळातील महोदयांना पडलाच. पण काहीशा रुक्ष क्षेत्रांत काम करणार्यांनाही पडला. मराठीतच मेघदूताचे कितीतरी अनुवाद उपलब्ध आहेत. कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, वसंत बापट, शांता शेळके यांसारख्या महारथींनी हे अनुवाद केलेले आहेतच, पण अर्थशास्त्रज्ञ असलेल्या सी. डी. देशमुखांनाही मेघदूताचा मोह सुटला नाही. त्यांनीही मेघदूताचा नितांतसुंदर अनुवाद केला आहे. पैकी बा.भ. बोरकर यांना तर संस्कृतही येत नव्हतं. पण मेघदूत त्यांच्या मनाला असं भिडलं की, ते त्यात गुरफटतच गेले. त्यांना मेघदूतातील काव्याचा रात्री चैतन्यमय भास व्हायचा आणि सकाळी ते तो कागदावर उतरवून काढायचे. इतके ते मेघदूताशी तादात्म्य पावले होते. कुसुमाग्रजांनी तर मेघदूताविषयी असे उद्गार काढलेत की-
‘एखाद्या निर्जन बेटावर जाताना एकच काव्य बरोबर नेण्याचे जर माझ्यावर बंधन घालण्यात आले तर मी ‘मेघदूत’ या काव्याचीच निवड करेन. कारण रसिकाच्या मनाला अथपासून इतिपर्यंत मंत्रमुग्ध करण्याचे, एक वेगळे भावविश्व त्याच्या सभोवार विणून त्याला उन्मनावस्थेत पोहोचविण्याचे सामर्थ्य मेघदूतात जितके आहे, तितके अन्यत्र आढळणे फार कठीण आहे...’
कालिदासाच्या मेघदूताने भारतीय जनमन असं व्यापून टाकलं आहे. ही किमया त्याच्या प्रतिभेची आहेच. पण त्याची प्रातिभशक्ती जागविणा‍‍‍ऱ्या आषाढाचीही आहे. मेघदूताचा लेखनकाल कुणालाच ठाऊक नाही. जिथे कालिदासाच्या काळाविषयी अजून एकमत झालेलं नाही, तिथे मेघदूत नेमकं कोणत्या काळात (मासात) लिहिलं गेलं, याविषयी सांगणं कठीणच. पण खचितच तो आषाढमास आणि आषाढाचा पहिला दिवस असेल. आषाढाच्या त्या पहिल्याच दिवशी आषाढघनांनी केलेल्या दाटीने कालिदास वेडावून गेला असेल. आषाढ बिलोरी ऐना होऊन कालिदासाच्या तना-मनात उतरला असेल आणि मग सा‍ऱ्या सृष्टीचं प्रतिबिंब त्यात पडून कालिदासाच्या लेखणीतून अलगद शब्द झरले असतील-
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्टसानुं
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श... म्हणजे आषाढाच्या पहिल्या दिवशी त्या यक्षाला तो मेघ दिसला, जो एखाद्या हत्तीप्रमाणे पर्वताच्या शिखराला ढुशा देत होता...
आषाढ म्हटला की भारतीय मनाला कालिदासाचं मेघदूत हे असं हटकून आठवतं. त्या मेघदूताचं गारुड अजून कमी झालेलं नाही, होणारही नाही. कारण चेतनगुणोक्ती अलंकाराचं (अचेतनावर सचेतनाचा आरोप करण्याचं) एवढं सुंदर उदाहरण भारतीय साहित्यात दुसरं नाही. म्हणूनच आषाढ म्हटला की, मेघदूत आठवतं आणि मेघदूताचा उल्लेख निघाला की आषाढसरी बरसायला सुरुवात होते.
अन् तरीही आषाढ लागला की थोडंसं भानावरही यावं लागतं. कारण कालिदासाला आषाढाच्या पहिल्याच दिवशी पाऊस भेटला, तसा इथल्या शेतकरी राजाला भेटेलच असं नाही. अन् कधीकधी तर पहिल्याच दिवशी नाही, आषाढ सरत आला तरी भेटत नाही. शेतकरी राजाच नव्हे, तर शहरांतील लोकही आकाशाकडे पाहत बसतात. वरून जाणारे कोरडे ढग दिसले की चुकचुकतात. शेतक‍ऱ्याला शेतीच्या पाण्याची चिंता, तर शहरी माणसाला रोजच्या वापरासाठीच्या पाण्याची.
तरीही आषाढ लागूनही पावसाने ओढ दिली की, धास्तावतो तो भारतीय शेतकरीच... कारण त्याचा गावगाडाच पावसावर आणि त्यातून पिकणा‍ऱ्या शेतीवर अवलंबून असतो. आज शहरातला माणूस नेट-इंटरनेटसारख्या सोयीसुविधांत गुरफटून गेला असेल कदाचित... पण भूक लागली की त्याला अन्नच खावं लागतं. अन्नाविना जगण्याचं तंत्र अजून तरी विकसीत व्हायचंय. निदान तोपर्यत तरी भारतातल्या शेतक‍ऱ्याने आपल्या खळ्यात पिकवलेल्या धनधान्यावरच त्याला अवलंबून राहावं लागणार आहे. आणि भारतातली ऐंशी टक्के जनता अजूनही ग्रामीण भागातच आहे. साहजिकच पावसाची ओढ त्याला दुखावते, चिंताग्रस्त करते. जणू भूमिपुत्राच्या गळ्यालाच फास लागतो. म्हणूनच आषाढाला सुरुवात झाल्यापासूनच तो पाऊसदेवाला आळवायला सुरुवात करतो. जमीन सारवतो, जमिनीवर सुरेखशी रांगोळी रेखतो आणि एका भांड्यात पाणी घेऊन ते सारवलेल्या-सजवलेल्या भूमीवर ठेऊन त्या पाण्याची पूजा करतो. भांड्यातलं हे पाणी त्याच्यासाठी आकाशातलं सर्जनशील पाणीच असतं. ते पावसाच्या रुपाने धरतीवर महामूर बरसावं म्हणूनच त्याची ही पूजा चाललेली असते. कधीतरी वरुणदेव त्याची ही पूजा मान्य करतो आणि एखाद्या साळसूद मुलासारखा धरतीवर बरसतो. पण कधी कधी तो लहरी, हट्टी मुलासारखाही वागतो. अडून बसतो आणि बरसतच नाही. मग मात्र त्याची वेगवेगळ्या पद्धतीने आळवणी करण्याशिवाय शेतकरी राजाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.
     पावसाला थोडा जरी विलंब झाला की, शहरी भागांत मंदिरांतून यज्ञयाग करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यासाठी यज्ञातील समिधांवर किलोकिलोने तूप ओतलं जातं. उच्चरवात मंत्रघोष केले जातात. यात पैशाची किती नासाडी होते, ते कुणीच सांगत नाही. म्हणूनच मग शहरांतून होणा‍ऱ्या या वैदिक विधी-विधानांपेक्षा गावाकडे होणारे पाऊसविधी बरे वाटतात. त्यात खर्च काहीच नसतो. फक्त निसर्गाला केलेलं आवाहन असतं. लोकपरंपरेने चालत आलेले पाऊसदेवाच्या आळवणीचे असे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागत तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळेच पाऊस पडतो, हा भ्रम आहे. पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी ऐक्य, साम्य शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एकप्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधीमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते. ही लोकभावना आदिम असते.


     रोहिणी गेल्या, मृग नक्षत्रही कारेडंच आलं नि गेलं की, महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यात धोंडी-भुंडी या अज्ञात लोकदेवतांच्या नावाने गा‍ऱ्हाणं गायला सुरुवात होते. गावागावातली मुलं एकत्र येतात आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत गावभर हुंदडतात. याला धोंडी काढणं असंही म्हणतात. मुलांची एक मिरवणूकच निघते. मिरवणुकीतील दोन मुलं निर्वस्त्र असतात. त्यांनी आपल्या अंगाभोवती फक्त कडुलिंबाच्या पाल्याच्या डहाळ्या गुंडाळलेल्या असतात. या दोघांच्या खांद्यावर एक आडवी काठी देऊन त्या काठीला मध्यभागी एक बेडूक उलटा लटकावलेला असतो. या उलट्या लटकावलेल्या बेडकाला गावभर फिरवलं जातं. मिरवणुकीची सुरुवात गावच्या मंदिरातून होते. त्यावेळी केवळ छोटी मुलंच नाही, जाणती माणसंही उपस्थित असतात. मंदिरातून निघाल्यावर
धोंडी धोंडी पाणी दे
धोंडीच्या दिवसात
पाणी भारी येऊ दे
पीक मोठं होऊ दे ... असं म्हणत ही बालसेना गावातील प्रत्येकाच्या घरी जाते आणि ही धोंडी दारात आल्यावर घरातघरातील महिला रिवाजानुसार प्रथम धोंडीच्या काठीवर आणि बेडकावर लोटाभर पाणी ओततात. नंतर हळद-कुंकू वाहून बेडकाची पूजा करतात. यावेळी प्रत्येक घरातून आपापल्या ऐपतीनुसार गहू, ज्वारी किंवा इतर धान्याचा शिधा मुलांना दिला जातो. असं गावातील प्रत्येक घर घेऊन झालं, की ही मिरवणूक पुन्हा देवळात येते. तिथे मिरवणूक काढलेल्या बेडकाला मुक्त केलं जातं. नंतर मिरवणुकीत मिळालेला शिधा एकत्र केला जातो आणि कुणाच्या तरी घरुन जाडसर दळून आणून तिखट-मीठाची फोडणी देऊन तो गावच्या मंदिरातच शिजवला जातो. या शिजवलेल्या प्रसादाला गावकरी कण्या म्हणतात. या कण्यांचाच नैवेद्य गावदेवाला दाखवून नंतर तो प्रसाद म्हणून सा‍ऱ्या गावाला वाटला जातो. हा प्रसाद खाताना आता मोठा पाऊस येईल असंच प्रत्येकाला मनोमनी वाटत असतं. कारण उलट्या टांगलेल्या बेडकाचं तरी डराव डराव वरुणदेवापर्यंत पोचलं असेल, असा लोकमानसाचा समज असतो.
     विदर्भात धोंडीच्या नावाने पावसासाठी गा‍ऱ्हाणं घालायची पद्धत आहे, तर कोकणात हेच गा‍ऱ्हाणं भुंडीच्या नावाने घातलं जातं-
भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली डोंगरात
पाऊस पडला आगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली आगरात
पाऊस पडला डोंगरात... भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली शेतावर
पाऊस पडला माळावर...भुंडे भुंडे पाऊस दे
भुंडी गेली माळावर
पाऊस पडला शेतावर...भुंडे भुंडे पाऊस दे
अशा पद्धतीने भुंडीच्या नावाने हाका मारत मुलं संपूर्ण गावाचं रान-शिवार, घर-दार ङ्गिरतात आणि तिच्याकडे पाण्यासाठी गा‍‍ऱ्हाणं घालतात.
धोंडी आणि भुंडीच्या नावाने निघणा‍ऱ्या या मिरवणुका महाराष्ट्रात कदाचित आणखीही वेगवेगळ्या नावाने निघत असतील. कारण धोंडी काय किंवा भुंडी काय यांचं लोकरहाटीत तसं अस्तित्वच नसतं. त्यांच्या नावाचा दगड किंवा मूर्तीही नसते. लोकरहाटीतलाच एखादा रुढ पण वैचित्र्यपूर्ण स्त्रीवाचक शब्द घ्यायचा आणि तिलाच पाऊसदेवता कल्पून तिच्या नावाने पावसाचं गा‍ऱ्हाणं गायचं. असंच पूर्वापार चालत आलंय.
पाऊस पडावा म्हणून महाराष्ट्रभर केल्या जाणा‍ऱ्या या विधींत खूपच वैविध्यही आहे. कारण प्रत्येक समाजाने आपापल्या समजूतींप्रमाणे निवडलेले हे मार्ग आहेत. म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात गाढवाचं लग्न लावलं जातं, विदर्भात बेडकाची मिरवणूक काढली जाते, तर खानदेशात अनेक ठिकाणी पाऊसविधी म्हणून जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढली जाते. तसंच अहमदनगर जिल्ह्यातल्या गावपरिसरात बेडकांची मिरवणूक किंवा गाढवाच्या लग्नाबरोबरच अंधा‍ऱ्या रात्री काही महिला पावसाचं गा‍ऱ्हाणं गात गावभर फिरतात. त्यांचं हे गा‍ऱ्हाणं म्हणजे पावसाची खरोखर केलेली तक्रारच असते. कारण त्या आपल्या गाण्यातून पावसावर राग काढत म्हणतात-
पाऊसराजानं कुणीकडे केलं काळं
वैतागली नार टाकून गेली तान्हं बाळ...
अशी तक्रार करतच लहानथोर सा‍ऱ्या महिला गावातलं घरन् घर घेतात. ही तक्रारीची गाणी म्हणायचीही त्यांची अशी खास पद्धत आहे. या महिलांचं म्होरकेपण करणारी महिला सगळ्यांच्या पुढे असते. तिच्या हातात घुंगरू बांधलेलं मुसळ असतं. हे मुसळ ती प्रत्येक घराच्या दारात वाजवते आणि त्याच्या ताला-सुरावरच पावसाची गा‍ऱ्हाण्याची गाणी गायली जातात. हे गा‍ऱ्हाणं गाताना मुसळच वापरलं जातं कारण मुसळासारखा पाऊस पडावा, अशी त्यांची इच्छा असते.
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशातील ग्रामीण भागात सर्वत्रच असे पाऊसविधी केले जातात आणि त्यात विविधताही आढळते. मात्र या सा‍ऱ्या विधींमध्ये एक समान आदिम तत्त्व दिसतं- ते म्हणजे सारख्यातून सारखं (होमोजिनियस मॅजिक) निघतं, ही आदिम भावना. या भावनेतूनच आपल्या जी गोष्ट हवी आहे किंवा साध्य करायची आहे, त्यासारखाच एक विधी कल्पनेने करायचा. हे विधी म्हणजे सरळसरळ प्रतीकात्मक विधीच असतात.
आषाढ लागला की असं काय काय आठवायला लागतं. आधी मेघदूत काव्य आठवतं. आषाढसरी चांगल्या कोसळल्या तर मेघदूताची रंगत वाढत जाते. कारण तोवर निसर्गाने कात टाकलेली असते. संपूर्ण आषढच सृष्टीत उतरलेला असतो. हिरवं रान, हिरवं मन आणि सुरेख हिरवी हुरहुर... पण आषढसरी कोसळल्या नाहीत, तर मन भयभीत होतं. त्याला अरिष्टाची चाहुल लागते. एकवेळ आषाढ चांगला गेला तरी तो काहीसा निश्चिंत होतो. कारण पेरण्या झालेल्या असतात. पीकपाणी मार्गी लागलेलं असतं. पण जिथे रुजणंच आषाढाच्या भरवशावर असतं, तिथे आषाढसरी कोसळल्या नाही, तर सारं गणितच चुकून जातं. मग नांगरट, पेरण्या, लावण्या... असं परंपरेनं चालत आलेलं शेतीचं सगळंच वेळापत्रक बिघडून जातं.
... याही परिस्थितीत आषाढाची चाहूल लागली की सर्वप्रथम पंढरपूरच्या वाटेवर वारक‍ऱ्यांची पावलं उमटू लागतात. भक्तांचे जत्थेच्या जत्थे विठोबाच्या दर्शनासाठी धावू लागतात. जणू विठोबा त्यांना पहिल्यांदाच भेटणार असतो. पण विठोबा पहिल्यांदा भेटो किंवा वर्षानुवर्षं, त्याची गोडी, त्याची ओढ थोडीच कमी होते... ती कायमच असते.
आषढाचंही तसंच तर आहे. तो दरवर्षीच येतो, बिलोरी ऐन्याचं स्वप्न दाखवत पावसाचं आवतन घेऊन...
(पुनर्प्रकाशित)

शुक्रवार, १ जुलै, २०१६

श्रीआनंदनायक



२००९ मध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे ऊर्फ अण्णा ८० वर्षांचे झाले, तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मला मिळाली होती. त्या मुलाखतीतला हा काही भाग आता अण्णा नाहीत, पण त्यांनी एकाच आयुष्यात करुन ठेवलेलं काम एवढं आहे की, त्याचा मागोवा घ्यायला आपल्याला कैक जन्मं लागतील   

जाणत्या वयात त्यांनी सुरू केलेलं उत्खननाचं काम आज ८० व्या वर्षात पदार्पण करतानाही अखंडित सुरू आहे. एक उत्खनन संपलं की लगे दुसरं दुसरं झाल की लगेच तिसरं... ही उत्खनन मालिका अव्याहत सुरूच आहे. न थकता न दमता. लवलेशही विश्रांती न घेता. उत्खननात जे जे अमूल्य हाती लागलं ते-ते सारं समाजासाठी उधळून द्यायचं. आपल्याकडे काही राखून झाकून ठेवणं त्यांना पसंतच नाही आणि तरीही त्यांची झोळी कायम भरलेली. अक्षय-अक्षुण्ण कारण उत्खननासाठी त्यांनी ज्या सर्जन-वेदना साहिलेल्या असतात त्या वेदना मातेच्या प्रसववेदनांतक्याच तनामनाच्या रंध्रांचा वेध घेणा‍ऱ्या असतात, साहजिकच बाळ जन्माला आल्यावर मातेला त्याचं मातृत्व कायमचं चिकटतं. तसंच उत्खननात जे जे गसतं ते उधळून दिल्यावरही त्याचं मातृत्व त्यांच्याकडेच उरतं. महत्त्वाचं म्हणजे या उत्खननात जे -जे गवसतं ते, त्यांचंच नाही उभ्या महाराष्ट्राचं जीवन उजळून टाकणारं असतं..
... ते संस्कृतीचं उत्खनन असतं. एका परंपरेचं उत्खनन असतं, पिढ्यान् पिढ्या प्रवास करत आलेल्या लोकमानसाचं उत्खननं असतं आणि या अखंड उत्खननाचा वसा घेणारे असतात ज्ञानमहर्षि रामचंद्र चिंतामण ढेरे र्फ रा. चिं. ढेरे... तपश्चर्येचं तेज आणि ओज काय असतं ते रा. चिं. ढेरे यांच्याकडे पाहिल्यावरच कळतं. रामतीर्थाच्या गुहारूपी मंदिरात ढेरे यांना अंतःस्फूर्तीने शिवप्रिया असलेल्या श्रीआनंदनायकीचं दर्शन घडलं. ढेरेंना भेटल्यावर-पाहिल्यावर आपल्यालाही श्रीआनंदनायक भेटल्याचा आनंद होतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सार आणि तत्त्व शोधण्यातच आनंद मानणारा श्रीआनंदनायक!
आयुष्यालाही व्यापून उरलेली ही लोकसंस्कृती रा. चिं. ढेरे यांना त्यांच्या बालपणी आजोळच्या गावी गवसली. मावळातलं एक खेडं असलेलं त्यांचं आजोळगाव निगडे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोसकसंस्कृतीचं  लघुरूप होतं. पहाटे दारात येणा‍ऱ्या पिंगळ्यापासून उत्तररात्री रंगणा‍ऱ्या गोंधळ-जागरणापर्यंत आणि कीर्तनापासून तमाशापर्यंत त्यांनी सारं काही त्या छोट्या गावातच एकलं-पाहिलं. लहानपणी कलेल्या-पाहिलेल्या आणि मनाच्या सांदीकोप‍ऱ्यात साठवून ठेवलेल्या या लोकसंस्कृतीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न ते गेली साठ-सत्तर वर्षं करत आहेत.
लोकसंस्कृतीचं उत्खननं एवढं आवश्यक आहे?
निश्चितच. आदिमतेपासून आताच्या आधुनिकतेपर्यंत वाटचाल करणा‍ऱ्या  मानवी संस्कृतीचा वेध घ्यायचा असेल तर, आपल्याला  लोकसंस्कृतीलाच शरण जायला पाहिजे. कारण लोकसंस्कृतीच्या गाभ्यातच मानवी संस्कृतीच्या बदलाचे अंतःस्तर तपासता येतात. महाराष्ट्र किंवा पर्यायाने भारत तर मानवी संस्कृतीचं मूळ शोधण्यासाठीचं उत्तम केंद्र आहे, कारण केवळ भारतातच आदिम युगापासून  आत्ताच्या आधुनिक युगापर्यंत झालेल्या मानवी विकासाचे अवशेष पाहायला मिळतात. आजच्या नागर संस्कृतीत ते अवशेष पटकन नजरेस पडणार नाहीत. पण अनागर संस्कृतीकडे तुम्ही डोळसपणे पाहायला लागलात की विविध सामाजिक स्तर रूढी परंपरांच्या रूपाने जिवंत असल्याचं दिसतं. उदाहरण द्यायचं झाल तर दांडेकर पुलाच्या पलीकडे रामकृष्ण मठात मामा दांडेकर यांचा पौर्वात्य-पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास चालायचा, तेव्हा त्याच पुलाच्या अलीकडच्या वेश्यावस्तीत अगदी आदिम काळातील म्हणता येईल असा अहेवपुनव आणि रांडपुनवचा उत्सव साजरा व्हायचा. म्हणजे दोन संस्कृती आजूबाजूला नांदायच्या. पण त्याची महती आणि माहिती तथाकथित आधुनिकांना कधीच कळली नाही. आजही माझ्या लोकसंस्कृतीच्या संशोधनाकडे अनेकजण तुच्छतेने पाहतात. पण आयुष्याचा होम करून मी जे गेली अनेक दशकं संस्कृतीच्या मुळाचा शोध घेतोय, तोच घ्यायला आता परदेशी अभ्यासक  मोठ्या प्रमाणावर भारतात येत आहेत.ढेरे अतिशय शांतपणे, सात्त्विकतेने, पण ठामपणे  लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचं महत्त्व उलगडून दाखवत असतात.
लोकसंस्कृतीची अशी मुळं तपासतच आजवर रा. चिं. ढेरे यांनी महाराष्ट्राच्या  बहुविध संस्कृतीचा, विधिविधानांचा आणि देवदेवतांचा अनन्यलक्ष्यी शोध घेतला आहे. विशेषतः भावभक्तिचा मळा असलेल्या पंढरपूरचा विठोबा, आत्मक्लेशातून भक्तांना भेटणारा जेजुरीचा खंडोबा, महाराष्ट्राच्या शौर्याची तेजशलाका असलेली तुळजापूरची श्रीतुळजाभवानी आणि भोसल्यांचं कुलदैवत असलेल्या शिखर-शिंगणापूरच्या महादेवाचा अनेकलक्ष्यी धांडोळा घेऊन त्यांनी मूळ लोकदेवता असलेल्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या झालेल्या या देवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची प्रक्रिया प्रथमच समाजाच्या निदर्शनास आणली.
लोकदेवतांचं हे उन्नयन कोण,  का आणि कसं करतं? याचं उत्तर देताना रा. चिं. ढेरे म्हणतात, लोकदेवतांच्या सांस्कृतिक उन्नयनाची प्रक्रिया दीर्घ स्वरूपाची असते आणि हा उद्योग त्या त्या काळातला उच्च संस्कृतीचा अभिमान बाळगणारा वर्ग करत असतो. यामुळे छोट्या समूहातील लोकदेवतेचं उदात्तीकरण होऊन उच्चसंस्कृती असलेल्या देवतांमध्ये ती नांदायला लागते. या उदात्तीकरणासाठी  उच्च संस्कृतीचे पुरोहित स्थळमहात्म्य वगैरे रचून मूळ लोकदेवतेची प्रतिष्ठा  वाढवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रातील विठोबा, खंडोबा, तुळजाभवानी, रेणुका या देवतांचं असंच उन्नयझालेलं  आहे. विठोबा हा मूळचा दक्षिणेकडील गोपजनांचा देव हे. जेजुरीचा खंडोबादेखील दक्षिणेकडून लेला धनगर समाजाचा देव हे. तसंच तुळजाभवानी किंवा रेणुका या मूळ मातृदेवता हेत. आज त्यांचं जे स्वरूप पाहायला मिळतं, ते त्यांचं मूळ स्वरूप नाही. त्यांचं मूळ रूप पाहायचं तर त्या जिथून आल्या तिथेच आपल्याला सश्रद्ध भावनेनं जायला हवं. देवतांच्या उन्नयनाचा अथवा स्थितीगतीचा वेध हा एका अर्थानं त्या समाजाच्याही स्थितीगतीचा वेध असतो. साहजिकच या देवतांच्या विकसनप्रक्रियेची उकल ही समाजेतिहासाला अत्यंत साहाय्यभूत ठरते. मी देवतांच्या उन्नयन प्रक्रियेचा अभ्यास कायम याच भावनेतून केला. त्यात कुणाच्या श्रद्धा दुखावण्याचा बिलकूल हेतू नव्हता.
मात्र सांस्कृतिक उन्नयनाचा हेतू सर्व देवतांच्या बाबतीत नेहमीच सफल होतो, असं नाही. विठोबाच्या बाबतीत तो सफल झाला मात्र खंडोबाच्या बाबतीत तो अर्धसफल झाला. त्यामागचं कारण सांगताना  ढेरे म्हणतात, ही उन्नयन प्रक्रिया त्या-त्या ठिकाणी असलेल्या त्या-त्या विशिष्ट समाजाच्या बळावर निर्भर असते. एखाद्या लोकदेवतेचं कोणत्या देवतेच्या रूपात उन्नयन होणार, हे त्या त्या समाजाती ताकदच एकप्रकारे ठरवत असते. उदाहरणार्थ विठोबाचं वैष्णवीकरण झालं, कारण त्या परिसरात वैष्णवजनांचा प्रभाव अधिक होता. तसंच खंडोबाचं शैवीकरण झालं. मात्र खंडोबाचा गाजावाजा अधिक झाला नाही, कारण देवतेच्या प्रचार प्रसारात भक्तांचा मोठा वाटा असतो. वैष्णवीकरण झालेल्या विठोबाला नामदेव-ज्ञानदेव-तुकारामांसारखे भक्त भेटले, परिणामी विठोबाचं स्थान सांस्कृतिकदृष्ट्या अधिक उन्नत झालं. याउलट खंडोबाला तसे भक्त न भेटल्यामुळे आजही खंडोबाच्या उपासनेत त्याच्या मूळ उपासनेतले बगाड किंवा मांडीला आकडा टोचून  घेण्यासारखे आत्मक्लेशात्मक विधी कायम  राहिले. उन्नयनाची प्रक्रिया नेमकी कशी होते त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे नेवाशाचं मोहिनीराज मंदिर. वस्तुतः हे मंदिर खंडोबापत्नी म्हाळसेचं आहे. म्हाळसा ही शिवपत्नी. पण खंडोबावर रागावल्यामुळे ती आपल्या माहेरी म्हणजे नेवाश्याला आली, पण तिथे असलेल्या वैष्णवांच्या प्राबल्यामुळे म्हाळसेचं मूळ अस्तित्व पुसलं गेलं. त्यांनी तिला मोहिनी करून विष्णूचं एक रूप करून टाकलं. त्यामुळे आज या मूर्तीकडे मोहिनीरूपातील विष्णू म्हणून पाहिल जातं.
लोकसंस्कृती किंवा लोकदेवतांच्या या विकसनाचा अभ्यास रा. चिं. ढेरे एखाद्या साधकाच्या वृत्तीने करतात. तिथे शास्त्रज्ञाची सत्यान्वेषी मर्मदृष्टी असते. पण ते आपल्या अभ्यासाची उकल केवळ या दृष्टीने  करत नाहीत. उलट तर्काधिष्ठि  वास्तवापेक्षा भावसत्ये धिक महत्त्वाची असल्याचं ते मानतात. कारण संस्कृतीची-प्रकृतीची अनेक गुह्य केवळ  या भावसत्यांनीच उलगडतात, असं त्यांना वाटत. आणि त्यांनी याच  पध्दतीने आत्तापर्यंत लोकसंस्कृतीची व लोकदेवतांच्या उन्नयनीकरणाची गुह्य उकलली आहेत.
हे भावसत्य म्हणजे नेमकं काय?

शोधात आणि संशोधनात नेहमीच शास्त्रीयदृष्ट्या योग्य असलेल्या तर्काला महत्त्व दिलं जातं. पण हा निर्णय सगळ्याच गोष्टींना लागू होत नाही. सगळीकडेच शास्त्रीय तर्क उपयोगी पडत नाही. काही वेळा भावविश्वाचाही आधार घ्यावा लागतो. विशेषतः आपला संशोधनविषय जेव्हा मानवी श्रद्धेशी निगडित असतो, तेव्हा भावसत्याचा आधार घ्यावा लागतो. कारण श्रद्धाविषयाच्या गाभ्यात आस्थेने प्रवेश केल्यावरच त्या विषयाचं आकलन होऊ शकतं. माणूस केवळ बुद्धिजीवी प्राणी नाही. बुद्धी आणि  विवेकाने त्याचं आयुष्य बंदिस्त असलं, तरी मूलतः ते भावनांवरच आधारलेलं असतं. साहजिकच त्यामुळे लोकसंस्कृती किंवा देवतांच्या विकसनाचा विचार करताना केव तर्काधिष्ठित बुद्धी वापरुन चालत नाही. भावनेचीही मदत घ्यावी लागते. कारण श्रद्धेच्या मुळाशी बुद्धीपेक्षा भावनाच अधिक असते आणि हा जगातल्या सर्व धमेतिहासतज्ज्ञांचा अनुभव आहे. रा. चिं. ढेरे संशोधनात तर्काधिष्ठित सत्याबरोबरच भावनेचं बळ कसं महत्त्वाचं असतं, ते समजावत असतात.
परंतु त्यांनी स्वतः केवळ भावनेचं हे बळ कधीच पुरेसं मानलं नाही. जिथे जिथे शास्त्रकाट्याची कसोटी वश्यक होती, तिथे तिथे त्यांनी ती स्वीकारली. किंबहुना लहानपणी आपल्या आजोळगावी जे जे संवेदनशीलतेनं त्यांनी टिपलं, तेच ते आजतागायत शास्त्रीय मांडणी करुन पुन्हा सांगत आहेत. म्हणून तर  दैवतशास्त्राच्या आधारे महाराष्ट्रातील देवतांची पुनर्मांडणी करण्याचं श्रेय त्यांना जातं. दैवतशास्त्र ही इतिहासाला पूरक अशी उपयुक्त शाखा असल्याचं महाराष्ट्रात त्यांनीच प्रथम आपल्या संशोधनातून सिद्ध केलं. अर्थात दैवतांच्या पुनर्मांडणीचं त्यांनी आरंभलेलं हे ज्ञानसत्र नेहमीच सगळ्यांना रुचलं असं झालं नाही. उलट अनेकांनी त्यांच्यावर मर्मभेदी टीकाही केली. विशेषतः त्यांनी लज्जागौरीच्या निमित्ताने सर्जनसोहळ्याचा आणि मातृतत्त्वाचा गौरव केला, तेव्हा सनातन्यांच्या प्रचंड रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. लज्जागौरीत त्यांनी आदिम काळापासून मूर्तिरूपात चालत आलेल्या सर्जनावस्थेचा शोध घेतला होता. पण विषयाची महती न कळलेल्यांनी त्यांच्यावर ढेरे यांनी अक्षरांचा नाइटक्लब चालवला आहे, अशी टीका केली होती. अर्थात या किंवा अशा प्रकारच्या कोणत्याच टीकेला ढेरे कधी भ्याले नाहीत. त्यांना आपल्या अक्षरांचा श्रम ठाऊक होता. ढेरे म्हणतात - वेदपूर्व काळापासून भारतात सर्जनावस्थेतील स्त्री-प्रतिमेची पूजा सुरू आहे. आजही आदिम अवस्थेतील अनेक परंपरांमध्ये तिला भजलं-पुजलं जातं. मी या मातृतत्त्ववाची नीट मांडणी करुन तिला शोभनावस्था आणली. जगाच्या निर्मितीचं केंद्र असलेल्या सर्जनस्थळांचा गौरव करण्याचाच माझा प्रयत्न होता. पण आपल्याकडचे सनातनी सर्जनस्थळाला का लाजतात  ठाऊक नाही?’
विषयातून विषय निघत जातो. ढेरे न थकता, लोकसंस्कृतीत रुजलेल्या परंपरांचा वेध घेत राहतात. त्यांच्या समवेत लोकसंस्कृतीच्या वाक-वळणांवरुन चालणं म्हणजे आपल्यासाठी आनंदनिधानच असतं. मात्र कुठल्या तरी टप्प्यावर त्यांचा हात सोडून आपण निघून जातो. पण त्यांचं संस्कृतीचं उत्खनन सुरूच असतं. कारण तोच त्यांचा ध्यास आणि श्वासही आहे!
(मूळ प्रहार दैनिकात प्रकाशित झालेली मुलाखत)